आईची गौराई




गेले १ तास फेर धरलाय आम्ही आणि माझी आई …झिम्मा न मोडता एकसारखी गाणी सांगतेय . "कराड कोल्हापूरच्या गौरी " पासून ती सुरु करते

गौराई आलीया पावनी
तिच्या बापानं देखिली
वडील माझ्या बापा काय देशील लेयाला ?
जोडवी पडल्यात तबकात
घे ग चिलीम …. काढ ग कुलूप
जागा मामाच्या मंदिरी
आरसा ठेविला सामोरी
सोनियाचा करंड कुंकू लेतिया कपाळी
असमाने चढविल , वारा जरीची चोळी
सार लेण झाल खंर
दुधा तुपाच ताट म्होर
उद्या शंकर यील की
एका रातीची वस्ती करून म्होर घालून न्हील की
गौराई आलीया पावनी .

माझ्या दीदीच हे आवडीच गाण .  

गौरीदिवाशी ती अगदी गौरीसारखी नटायची . ही गौराई नटायला जरा जास्तंच वेळ घ्यायची  पण आईन हे गाण सांगायला सुरु केल की सगळा शृंगार अर्ध्यावर टाकून झिम्मा धरायला आलीच धावत ……. नाकातील नथ हातात राहिली तरी चालेल पण या गाण्याला ती चुकवत न्हवती

तिला गौराई म्हणायचं कारण म्हणजे आमच्या शेजारच्या काकू . त्या म्हणतात "अंजू , तुझी थोरली गौरी आणि धाकटी गंगा आहे बघ " (गौरी बडबड करते , खेळते आणि गंगा शांत राहते …… म्हणजे गाणी सांगताना :) )

आईने हे गाण आज सांगायला सुरु केल्या बरोबर तिची आठवण झाली . लग्न होऊन सासरी गेली तशी आमच्या घरच्या गौरीच्या खेळाचा रंग उतरला . तिच्या इतक्या हौसेनी महिना महिना अगोदर पासून डाव नाही रंगत आता अंगणात . हो पण गणपतीच्या ५ दिवसात रंगतो आणि तो हि तिच्यामुळे .

तिच्या सासरच्या गौरीला नटवून थटवून , जेवायला घालून , भानुरा वाजवून तिला झोपवून गौरीच्या रात्री दीदी तिच्या सासूबाई बरोबर दरवर्षी येते . माहेरची गौरी जागवायला :) 

तिचं त्या दिवशीच माहेरी येण अगदी पाहण्यासारखं असत . मला तर हसायलाच येत बाई . आणि मी काही तिला चोरून वैगरे हसत नाही . फक्त काकीच्या पदराचा आडोसा घेते इतकंच :P  

मग ओठांची कमान एका बाजूने दाबून वाकवत , कपाळाला आठ्या पाडत,  मान नको इतकी हलवून लगेच ती म्हणते कशी "लग्न होऊन सासरी जाशील तेव्हा कळेल मी का धावत येते उंबर्यापर्यंत :) " घोड्यावर स्वार होवून आल्यासारखी धावतच घरात प्रवेश करते . घरातल्या  गौरी-गणपतीला डोकं टेकून नमस्कार करते . तिच्या मते ' प्रत्येकाच्या घरची गौराई हा जगातील सगळ्यात  जागृत देवी . कोणाचीही इच्छा अपूर्ण ठेवत नाही . शेवटी माहेरवाशीण आहे ती . माहेरी भरभरून देवून जाते :) ' मग आज्जीला , बाबांना , आईला , काकीला नमस्कार करते . हो …… आमच्या घरची रीत आहे . वयाप्रमाणे नमस्कार करायचे :) . वाहिनीच्या आणि तिच्या काय खाणाखुणा चाललेल्या असतात ते फक्त त्याच दोघींना माहीत .  

गौरीच्या दिवशी ती सासरी जेवत नाही . सकाळपासून उपवास करून आमच्या घरी म्हणजे माहेरी आल्यावर गौरीला ठेवलेल्या नैवेद्याच्या ताटातलीच वडी, कढी,  भाजी भाकरी खाते . आणि हे करण्यापासून तिला कधीही कुणीही अडवलं नाही . आजीची शिकवण आहे ही . घरातली मुलं बाळ जेवली की देवाला नैवेद्य पोहचला अस समजायचं . देव देव्हाऱ्यात बसून राहत नाही . तुमच्या मुलांच्यात मनसोक्त खेळत असतो तो . रांगायला यायला लागल्या पासून मी ही देव्हाऱ्यातील साखरेची वाटी आज्जीची बाप्पाची आरती करून झाल्याझाल्या संपवायची :)

दीदीपेक्षा मी लहान असल्याचा एक तोटा म्हणजे गौरी घरी आणतेवेळी मला तिच्या बाजूला फक्त उभं राहावं लागायचं . माझ्या हातात कधीच नाही दिलं तिने . "मी लग्न होऊन गेल्यावर घेशिल की तूच गौराई घरात " असं म्हणायची . तो मुहूर्त आज आला :) 



हळदी कुंकवाची बोट लावलेली , पोवत घातलेल्या गौरीच्या डहाळ्याचा तो गार , ओला स्पर्श ज्यावेळी तुमच्या हाताला , कमरेला होतो त्या क्षणापासून तिच्याबद्दल आपुलकी आणि प्रेम वाटायला लागत . या वर्षी पहिल्यांदा जाणवलं हे मला . दीदी नेहमीप्रमाणे आजही घरी धावत आली तर हसायला नाही येणार मला . ही गोष्ट फारच साहजिक आहे .      

पण आज अजून नाही आली . बराच उशीर झालाय तिला .  आईचं ही लक्ष खेळापेक्षा उंबऱ्याकडेच जास्त आहे .

" आईची गौराई आली  ……."

वरच्या मजल्यावरून चोरून चोरून गौरीचा खेळ पाहत बसलेला माझा भाऊ बोलला … (खेळ पाहतोय कसला ???? टिंगल टवाळ्या करत असेल  ……  
" तुझ्या काय अंगात येत काय ग गौरीचं खेळताना ? " या आमच्या बंधुराजांच्या  गोड (????) प्रश्नावर दीदीच नेहमीच उत्तर "होय , का ? येतोस लिंबू द्यायला . की अंगारा द्यायला बसतोय ? माझा असिस्टंट म्हणून :P " ) 

माझ्या भावाने अगदी हळू आवाजात बोललेलं "आईची गौराई "हे वाक्य बरोब्बर आईच्या कानात पडल्या पडल्या तिचा गाणी सांगायचा सूर बदलला . 

" गौराई आलीया पावनी "तिने अर्ध्यावरच सोडलं . झिम्म्याच्या टाळ्या आपोआप जोरात पडायला लागल्या . आमच सगळ अंगण एका क्षणात नव्याने जिवंत झाल्यासारख वाटायला लागलं . 

काकीने घागर आणून ठेवली . वाहिनीची खडे शोधायची अन जोडाव्या काढायची गडबड …… घागर वाजली पाहिजे ना :) आजीने घरातल्या गौरीच्या समोरचं नैवेद्याच्या ताटात अजून चार वड्या आणि अर्धी भाकरी आणून ठेवली .

एकदम उत्साह आल्यासारखं आईने नवीन गाण्याला सुरुवात केली . 

" उप्परमाळी सांडल्या तुरी 
वेचता वेचता दमल्या पोरी 
आज गौराई आली खरी " 

 आईची गौराई आली  ……. :) 


सर्वपित्री


फोटो सौजन्य : गुगल

आज सर्वपित्री अमावस्या. तिच्या घरचा म्हाळ . रिकाम्या भिंतीवर नजर खिळवून ती नुसतीच बसून होती . नेमकं आपल्याला काय होतंय हे तिचं तिलाही कळेना . डोळ्यातील पाणी खाली सांडू नये म्हणून चाललेला कसोशीचा प्रयत्न . 

कधीही न पाहिलेल्या सासू - सासऱ्या बद्दल तिला वाटणाऱ्या आपुलकीची आणि एकटेपणाची कुणीतरी चेष्टा करेल किंवा तिच्या त्या भावनेबद्दल शंका व्यक्त करेल या भीतीनेच ….तिने हि तगमग कोणाजवळ ही बोलून दाखवली नाही   

तसं पहायला गेलं तर एकदा …. हो फक्त एकदाच…तिच्या आईजवळ बोलली होती ती हे सगळ 
"इतरांना सासू सासरे असतात म्हणून अडचण आणि मला नाहीत म्हणून "  

यानंतर तिच्या आईने तिला जे काही समजावलं . त्यानंतर हा विषय तिने कधीही कोणाजवळ ही काढला नाही . आभाळभर रिकामेपणा साचलेल्या लेकीच्या छपराला तिने कोणत्या शब्दात आसरा दिला हे फक्त त्या माउलीलाच ठाऊक . याच शब्दांच्या शक्तीवर आणि आधारावर सासू सासऱ्याविनाच सासर तिच्या लेकीने आजवर पेललंय . 

खर पहायला गेल तर जीव ओवाळून टाकावा इतका चांगला दीर आणि कधीही कोणाही जवळ तक्रार करू नये इतका गुणी नवरा साथीला होते तिच्या . पण म्हणतात ना 'ज्याची त्याची दुखणी ज्याची त्यालाच माहित असतात . आणि ती एकट्यानेच सहन करायची असतात…करावी लागतात  '

कुणाच्या घरी कधी हळदी कुंकवासाठी ती गेली की कोपऱ्यात नटून बसलेल्या त्या घराच्या सासूबाईकडे बघून तिला अगदी हेवा वाटायचा . हळद कुंकू कुठल्या बोटाने लावावं ? नारळ ओटीत घालताना कसा घालावा ? विड्याच्या पानच टोक कोणत्या बाजूस अन देठ कोणत्या बाजूस असावं ? अशा बारीकसारीक गोष्टी हक्काने सांगायला तिच्याही घरी कोणीतरी जेष्ठ व्यक्ती असायला हवी होती अस सारखं वाटायचं . अंगणात एकट्याच खेळणाऱ्या तिच्या बाळकृष्णाला गोष्टी सांगायला , गालावरून हात फिरवत कडकड बोटे मोडायला त्याच्या वाट्याला आजी आजोबा असायला हवे होते हे जाणवायचं  

पण हे वाटण , जाणवण सगळ मनातल्या मनात . ओठांच्या पाकळ्या उघडून आजपर्यंत एकही शब्द बाहेर पडला नाही . तिचा हा संवाद एकटीचाच असायचा . स्वतःपुरता मर्यादित . "ओरडणाऱ्या का असेनात पण मला सासूबाई हव्या होत्या , ज्यांच्या नजरेला चुकून जरी नजर मिळाली तरी भीती वाटावी इतके कडक का असेनात पण मला सासरे हवे होते " 

कधीतरी तिच्या माहेरवाशिणी मैत्रिणी एकत्र जमायच्या . त्यांच्या रंगलेल्या गप्पा ' सासू ' या विषयावर येउन नेहमी थांबायच्या . मग त्या एकमेकीना सांगत राहायच्या घराच्या ' त्या ' दोन व्यक्तींमुळे होणारी अडचण , त्रास , अवघडलेपणा …… आणि बरच काही . हिच्याकडे पाहून कुणीतरी अगदी सहज बोलून जायचं  "बरंय बाई  तुझ. हे असले प्रकार तुझ्याकडे नाहीत " या वाक्यावर तिच्याकडे खोट्या हसण्याव्यतिरिक्त काहीही उत्तर नसायचं . ज्या भावनांचा कल्लोळ तिच्या मनात उठायचं ते वादळ तिच्या मैत्रिणींना समजणार न्हवत .     

मी ही सहजच केला होता आज तिला फोन . तिच्या पहिल्याच वाक्यात आवाज खोल गेल्याचा जाणवला . गळ्यात दाटलेल्या हुंदक्यामुळे तिला धड बोलताही येईना . "काय झालंय ग ???" न राहवून शेवटी विचारलंच मी . "आज सर्वपित्री " इतकच बोलली ती यावर . 

तिला काहीही न समजावता मी फोन बंद केला . बाप्पाजवळ हात जोडून उभी राहीले आणि एकचं मागण मागितलं 

"हवं तर सगळ वैभव लुटून ने पण कोणाची जिवाभावाची माणसं नको नेत जाऊ अशी ज्यांची जागा उभ्या आयुष्यात दुसर कुणीही नाही घेऊन शकत . "

मुर्तीतला देव मुका का असतो ?? हे आज कळल मला :) 


गणपती बाप्पा मोरया




रायाच्या घरात बाप्पाची इवलुशी मूर्ती . आणि त्याच्याभोवती त्याने पूर्ण टेबलभर केलेली भलीमोठी आरास . त्याच्या कोकणातल्या घरातला गणोबाही मोठा असेल त्याहून .  पण आता तो गणोबाही दूर आणि कोकणही .

नोकरी निमित्ताने त्याने देश सोडल्या दिवसापासून तो काही गोष्टी अजूनही न चुकता करतो . काचेच्या पेल्यातून  का होईना पण सूर्याला अर्घ्य देतो . पांढऱ्या शुभ्र रंगाच जानवं हाताच्या दोन्ही बोटात एका विशिष्ठ पद्धतीने अडकवून सूर्याला दाखवून मगच परिधान करतो . ऑफिस मधून परतल्यावर न चुकता संध्या . आणि सकाळी उठल्यावर गणपती बाप्पाचं स्तोत्र .

घरातून बाहेर पडताना उंबऱ्याजवळ आईच्या पायाशी आशीर्वाद घेण्यासाठी वाकला अन आईला पावलांवर ओलसरपणा जाणवला . हनवूटी वर केल्यावर त्याच्या भरल्या डोळ्यात तिला एकटेपणाच आभाळ दिसलं . ती तशीच आत निघून गेली . लगबगीने काहीतरी पदरात झाकून आणल . अन त्याच्या हातात ठेवत म्हणाली "कित रडतला ???? ह्यो बाप्पा …… तुले सोबत करीन " .  हीच ती बाप्पाची इवलुशी मूर्ती . जी रायाने इथे आलेल्या दिवसापासून पुजली . मिळेल त्या सामानाची पूजा मांडली . शेवटी भाव महत्वाचा

लोकं परदेशी राहायला जातात म्हणजे नक्की काय होत हो ? फुलपाखरू हातातून सुटताना बोटांवर रंग सोडून जात तसंच काहीसं होत असावं त्याचं . देश सुटतो पण संस्कार आणि सण सावलीसारखे जगभर घेऊन फिरतात . जगाच्या पाठीवर कुठेही जा …… "गणपती बाप्पा ……. " ओरडल्यावर "मोरया " ची आरोळी देणार नाही असा एकही भारतीय शोधून सापडायचा नाही .

आज गणेश चतुर्थी …. गेले आठवडाभर रायाची एकट्याची जी धावपळ दिसत होती ती यामुळेच . ६ खोल्यांच्या घरी एकटाच राहतो  असं नाहीच म्हणता येणार . कारण एक खोली त्याच्या बाप्पाची आहे . छोटस टेबल त्यावर ती देखणी मूर्ती . २१ च मोठ होईल म्हणून ५ च वस्त्र . हळद , कुंकू , अक्षता , धूप  आणि साखरेची वाटी . बसं …… इतकंच  असत तिथे . संकष्टीला दिव्यांऐवजी २ मेणबत्या पेटवून आरती मात्र नक्की करतो .  ऑफिसच्या कामातून त्याला आरास करायचं सामान शोधायला वेळ नाही मिळत आणि तसही तो जिथे राहतो तिथे मिळतही नाही फारस काही . बाप्पाच्या पूजेसाठी लागणार सगळ तो घरी आल्यावर स्वतः तयार करतो . पुठ्ठ्याची गुलाबाची फुलं , कोल्ड कॉफी चे रिकामे राहिलेले पेले कापून बनवलेली फुलपाखर जी त्याच्या भिंतींवर अगदी खऱ्या सारखी वाटतात . कॉर्नफ्लेक्स चे बॉक्स एकमेकावर रचून त्याने त्याच्या बाप्पाच्या आसनाची तयारीही केली . काय सुरेख चौरंग बनवला होता त्याने …… आणि त्यावरच्या चंदेरी कागदामुळे तर तो अजूनच छान वाटत होता .


काल घरी परत येताना त्याने गुलाबाची मिळतील तितकी सगळी फुलं विकत आणली . बाप्पाची खोली घमघमत होती सुगंधाने . रायाच्या इथल्या बाप्पाला नवीन नवीन फळ नैवेद्याला मिळतात . म्हणजे कोकणातल्या सारखं पेरू , सीताफळ नाही मिळालं इथे म्हणून चेरी , प्लम , रासबेरी , लिची अशी इथल्या हंगामाची फळ त्याने पूजेसाठी आणून ठेवली

रोज ७ चा गजर बंद करून ८ वाजता उठणारा राया आज ५ च्या ठोक्याला अंथरुणातून बाहेर ……. बाप्पाची ओढ दुसर काय . अभ्यंग आटोपून तो पूजेला बसला . राया पूजा करायला बसला की कुणीही नुसतं पहात राहावं त्याच्याकडे असा दिसतो . राया गणपतीसामोर हात जोडतो तेव्हा पाहावं . त्याच्याकडे पाहताना खुद्द गणपतीला काय वाटत असेल ?? वक्रतुंड महाकाय म्हटल्याशिवाय घरातून पाऊलही बाहेर न काढणाऱ्या लेकरासाठीच सगळ देवपण घेऊन किती समाधान वाटत असेल . बाप्पाची कुठेही कधीही कोंडी नाही केली त्याने . सुखं  मिळाल ते बाप्पाच्या आशीर्वादाने आणि दुखः पूर्वजन्मीच उरलेलं माप म्हणत वेळोवेळी त्याने बाप्पाची सुटकाच केली अस म्हणावं लागेल . राया पूजा करणार म्हटल्यावर बाप्पा आसनावर आपणच विराजमान होत असेल . आपल्याला या गोष्टी कशा दिसायच्या ?

पूजेसाठी आसनावर बसल्या क्षणापासून रायाचे ओठ हालत असतात . लखलखणाऱ्या मखरासमोर पाठीत किंचित झुकून हात जोडून मस्तकी टिळा  लावून बाप्पाकडे एकटक पाहणारी रायाची नजर . त्याचा तो कोकणस्थ ब्राम्हणाचा गोरा वर्ण ज्योतीच्या प्रकाशात पिवळसर दिसायला सुरु होतो. मूर्तीला पंचामृताच स्नान घालताना आज त्याच्या डोळ्यातून पाणी वाहत होत . घराच्या गणपतीची आठवण कासावीस करत होती  त्याचा जीव . गणेश चतुर्थीच्या दिवशीही माझ्या गणपतीला दुर्वांची जुडी आणि आगाड्याच पान नाही मिळालं म्हणून चुटपूटत होता . आता येशुसमोर मेणबत्या पेटवणाऱ्या देशात कुठून उगवेल दुर्वा आणि आगाडा  

पण त्याची नैवेद्याची तयारी पाहून लंबोदर आज खरच भरपेट जेवेल अस वाटण साहजिक होत . स्वयंपाक खोलीत मोदक उकडताना पौरुष्याचा अहंकार त्याला कधीही शिवला नाही . उलट तो म्हणायचं "अन्नपूर्णे इतकं कुठलही काम अवघड नाही . चव उतरावी लागते हाताची त्यात . नुसतं सामान पुरेस असून नाही चालत "त्या मोदकासाठीही त्याला कष्ट घ्यावेच लागले . मोदकपात्र नाही , चाळण नाही . उकडीच्या मोदकाची झाली ना पंचाईत . जिथे लोकं ब्रेड आणि बटर शिवाय दुसर काहीच खात नाहीत तिथे कुठून मिळणार मोदकपात्र आणि चाळण . पण रायाचा गणपती बाप्पा उपाशी पोटी त्याच्या समोर पान मांडून बसला होता …… उकडीच्या मोदकाची वाट पाहत . त्याचं मन मोडवेल तर राया कसला ???? एक स्वछ रुमाल घेऊन त्याने एका भांड्याला घट्ट बांधला आणि केले त्यावर उकडीचे मोदक :) बाप्पा खुश , राया खुश 

कोकणातल्या बाप्पाच्या आरतीलाही तो सकाळी संध्याकाळी हजर राहायचा .पूर्वी  गावी असताना रायाच्या हातात टाळ आणि घंटा असायची आणि आता हातात फोन घेऊन उभा असतो . त्याची आई घराच्या गणपतीची आरती सुरु झाली कि रायाला फोन करते .  तो ही इतक्या लांबून बाप्पाच्या आरतीला टाळ्या वाजवतो . आरती संपली की  त्याच्या घरातल्या  इवलुश्या मूर्तीसमोर "गणपती बाप्पा मोरया " म्हणून एकटाच जोर जोरात ओरडतो . कोकणातल्या बाप्पाच्या मखराचा  लखलखाट रायाच्या घरी अन चेहऱ्यावरच तेज रायाच्या तोंडावर दिसायला सुरु होत . अन मग अजून एखादा थेंब त्याच्या डोळ्यातून वाहत खाली येतो … 

नेमके त्याचवेळी त्याचे बाबा बाप्पाच्या नैवेद्या भोवती पळी पंचपात्र हातात घेऊन पाणी ओवाळत होते . आता त्यात पळी पंचापात्रातील पाणी किती आणि रायाच्या डोळ्यातील पाणी किती हे त्या बाप्पालाच ठाऊक …….  बाप्पाच्या डोक्यावरच लाल गुलाबाचं फुलं त्याच्या उजव्या पायाशी येउन पडलं . नैवेद्य , आरती पूर्णत्वास आली . 

आई डोक्यावरचा पदर सांभाळीत ओठातच पुटपुटली "रायाने मनापासून नमस्कार केला असणार माझ्या . पोहोचला बाप्पा पर्यंत "

 !! गणपती बाप्पा मोरया !!  !! मंगलमुर्ती मोरया !!