सायलीची वेल आणि वटवृक्ष


वटपौर्णिमा म्हटलं की डोळ्यासमोर येतं एक भलंमोठं वडाच झाडं . आजूबाजूला  लोम्बकळणाऱ्या  पारंब्या , त्याचा तो डेरेदारपणा , कोसभर पसरलेली थंडगार सावली , जाडच्या जाड बुंधा आणि त्या भोवती मनोभावे सूत गुंडाळणाऱ्या सुवासिनी ... लहानपणी आईबरोबर पूजेसाठी वडाला जायचे तेव्हा खुप आवडायचं हे लांबून पहायला  .

प्रत्येकीने गुंडाळलेले सूत तो वड सांभाळून ठेवायचा पुढे खुप दिवसांपर्यंत ... सूत रुतल्याचा कधी तक्रारीचा सूर नाही की झालेला गुंता सोडवण्याचा अट्टाहास नाही . जसं आहे तसं स्वीकारून त्याचा सांभाळ करणं कित्ती अवघड असतं हे स्वतःच कुटुंब सांभाळण्याची वेळ आली की मगचं लक्षात येत आपल्या .

हो .... वडाच झाड म्हणजे कुटुंबासारखाच नाही का ... घराला आधार देणारा , सगळं ओझं पेलून धरणारा त्याचा बुंधा म्हणजे कुटुंबातलं सगळ्यात मोठं , वयस्कर  आणि जबाबदार व्यक्तिमत्व . सूत गुंडाळणाऱ्या त्या घराच्या सुना ... त्यांच्यावर प्रेम आणि आपुलकी बांधून ठेवण्याची जबाबदारी . लोम्बकळणाऱ्या पारंब्या म्हणजे त्या जेष्ठ व्यक्तीला भार सांभाळायला मदत करणारे आणखीन दोन चार हात .

खोलवर गेलेली मुळं हाच त्याचा जगण्याचा अनुभव जो त्याला उभं राहायला ताकद देतो आणि हेंदकाळणाऱ्या पारंब्या हे त्याच सगळ्यात मोठं समाधान ..... मदतीला , आधाराला कुणीतरी आपलं असल्याची जाणीव


पण या दर वर्षीच्या पूजेत मी असाही एक वड पाहिलाय ज्याला एकही पारंबी फुटली नाही इतक्या वर्षात . डेरेदार घेराचा भार त्याने आपल्या एका बुंध्यावर संभाळलाय गेली कित्येक वर्ष  आणि आपल्या सावलीत अनेकांना आसराही दिलाय .  खरं कौतुक मला याचंच वाटत . कुणाच्याही आधाराशिवाय कुठल्याही अपेक्षेशिवाय तो इतक्या भक्कमपणे , ताठ कण्याने उभारतो वर कुठली तक्रारही नाही .

" एक खांबी तंबू "  म्हणजे काय हे यांच्याकडे पाहून कळत . सगळा भर एकावर . वादळ , पाऊस , ऊन सगळं एकट्याने सांभाळायचं . बरं .... आश्चर्य याचच वाटत , का बरं पारंब्या फुटल्या नसतील याला ? याच्या  कुटुंबातलं कुणीच उभं राहू नये आधाराला ? कुणालाच भार हलका करावासा वाटू नये ? का असेल हे याच्या नशिबी ?

पण एक सांगू .... यालाही वटपौर्णिमेच्या गुंडाळलेली सुते आहेतच की . वाहिलेल्या दुर्वा आहेत , तांदूळ , फळाची ओटी आहे . कापसाचं नाजूक वस्त्र आहे .... सगळं सगळं आहे आज त्याला :)
हो ... पारंब्या नसल्या तरी कुणीतरी आहे जे त्याच्यासाठी प्रेम बांधून ठेवण्याची जबाबदारी दरवर्षी न चुकता उचलत .

एखाद्या शांत संध्याकाळी कधीतरी जाऊन बसा त्याच्या सावलीला ... मग सांगेन तो त्याची कहाणी तुम्हाला . अहो ..... सांगावी कशाला लागते ? ओळखणारा एका नजरेत ओळखेल असं त्याच जिणं .

त्या वडाच्या भोवती एक सायलीचा वेल वाढलाय . त्याच्या त्या डेरेदार बुंध्याला करकचून मिठी मारून वर वर चढत फांद्यांपर्यंत पोहोचलाय  आणि आपली  उंचीची सगळी स्वप्नं त्याच्या त्या कर्तृत्वावर ओवाळून टाकत त्याच्या आधारासाठी फांद्यांपासून खाली जमिनीकडे झेपावत पुन्हा मातीत येऊन रुजलाय ...... मातीत पाय घट्ट रोवून उभा ... वडाच्या सोबतीसाठी

पारंब्या न फुटल्याच दुःख कधीही जाणवलं नाही त्या वडाला या सायलीच्या वेलामुळे . अहो ... आता तुम्ही म्हणालं , इतकास वेल तो  त्यात तो सायलीचा म्हटलं की त्याहून नाजूक ... तो कसला आधार देतोय या वटवृक्षाला ?
बरोबर .... अगदी बरोबर .   नाहीच देऊ शकत आधार तो त्याला . इतकी त्याची ताकदही नाही  आणि प्रयत्नही नाही . तो बिलंगलाय फक्त त्याच्या साथीसाठी .
माझ्यासोबत कुणीतरी आहे ही भावनांचं जगायला स्फूर्ती देऊन जाते .

परवा कुणीतरी एकाने म्हणे वडाच्या बुंध्यावर वार केला .रोज  त्याच्याच सावलीला बसणाऱ्याने केलेला असा हा वार अगदीच वर्मी बसला त्याच्या . 
उन्मळून पडायला तुटणं गरजेचं नसतंच .... एकटेपणाची भावनांचं उध्वस्त करायला पुरेशी असते ... मग तो वृक्ष असो वा माणूस 

पण छे ..... वटवृक्ष  आहे तो . उन्मळून पडणं त्याला शोभतही नाही आणि आवडतही नाही . जिथेजिथे घाव झालाय तिथेतिथे सायलीची वेल  जाऊन बिलगली  आणि सगळे घाव भरून काढले . पण त्याला ढासळू दिलं नाही .  

घाव करणारा पुन्हा सावलीत बसण्याचं धाडसही नाही करणार परत . पारंब्या फुटल्या नसल्या म्हणून काय झालं ? वर चढणारी वेल त्याच्यासाठी खाली उतरली यातच समजायला हवी होती तिची ताकद  :) 

असो ... वार बऱ्यापैकी भरत आलेत आणि सायलीचं मूळ ही अजून घट्ट झालय. तंबू एकखांबी असेल तर पारंब्यांची ताकदही एका खोडात एकवटलेली असते . देणार कधी कुणासाठी कमी माप भरत नाही . 
    
या वटपौर्णिमेदिवशी बांधलेल्या सूतांनी सायली आणि वडाच एकत्र राहणं कायमसाठी पक्क केलं . प्रेमाच्या माणसांनी येऊन  स्वतःच्या आरतीच्या ताटातलं प्रेम आणि आपलेपणा त्याच्या मुळावर वाहीला आणि त्याला  जगण्याची ताकद दिली. 

त्या वडाच्या कर्तृत्वावर आणि पावित्र्यावर पावसाच्या थेंबाइतका स्वच्छ विश्वास ठेवणाऱ्या सगळ्या सुवासिनींचे आणि त्यांच्या यजमानांचे ही सायलीची वेल आज हात जोडून मनापासून आभार मनात होती  . 

आजवर आधार देणार वटवृक्ष पहिला होता . प्रेमाच्या आधारावर आभाळाला पोहोचलेला पहिल्यांदाच पाहतेय ... खूप कौतुकाने . :)

आई जगदंबे ..... हाच वड पुढची सगळी जन्म पुजण्याचं भाग्य मला मिळू दे.  :)

   



आईची भाकरी

इतके वर्ष झाले तरी काही काहीच बदललं नाहीये . लग्न झालं घर बदललं , माणसं  , जागा , नाती , जबाबदाऱ्या , काम , अडचणी , भावना , कुटुंब सगळं बदलू शकत आयुष्यात ...

बस्स ..... मानेखाली हात धरून २ महिन्याच्या बाळाला  मान ताठ करायला शिकवणारी आई आणि ताठ झालेली मान आयुष्यभर कुणासमोरही वाकू द्यायची नाही ही शिकवण देणारे बाबा ..... कधीही बदलत नाहीत .

घरातले सगळे आपापल्या कामात मग्न असतात आणि अशावेळी एकदमच स्वयंपाक खोलीतून धाप धाप असा आवाज यायला सुरु होतो  .. त्यासोबत बांगड्याचा किणकिणाट ...त्याच लयीत चालणार

 ज्यांनी भाकरीची चव चखलीये त्यांना उठून आत जाऊन पाहण्याची गरजच नाही . बांगड्याचा आणि हात आपटण्याच्या लयीवरूनच समजून जात  . त्याच्या लगेच लक्षात येत .

 आई भाकरी थापतेय 

तांदळाच्या , ज्वारीच्या , नाचणीच्या , बाजरीच्या कित्ती प्रकार त्यातले रे बाबा ...
ते पीठ चाळणीने चालून कोंडा बाजूला ठेवायचा .... हो ..टाकून नाही द्यायचा काही . शेजारच्या आजीच्या कोंबड्या आवडीने खातात भिजवलेला कोंडा . त्याच्यासाठीच हा खाऊ

मग त्या चालेल्या कोरड्या पिठाला पाणी लावून लावून उभं आडवं दाबून , हाताच्या पंजाने दाबून , बोटात धरून , परातीत आपटून , मर्दुन भाकरीसाठी पीठ मळायचं . मऊ लुसलुशीत , एकही भेग न पडलेलं , कुठेही चिकटपणा नसणार , जो देईल तो आकार अलगद घेणार भाकरीच पीठ मळता  आलं की अर्धा किल्ला सर केला असा समजायचं  

मग परातभर पसरलेलं ते कोरडं पीठ , त्यावर आईने अलगद हाताने फिरवलेला गोळा मध्यभागी जाऊन बसतो . आणि मग माझी आई त्या धाप धाप आवाजाच्या लयीत गोल गोळ्याची पातळसर परातभर मावेल अशी भाकरी थापते .
थापताना ना कुठे लय चुकते ना कुठे भाकरी


भाकरी थापायलाही खूप सवय असावी लागते बरं का . इतक्या सहज सहजी जमणार काम न्हवे ते .हात फक्त डावीकडून उजवीकडे फिरवायचा . फक्त हातांसोबत भाकरीही फिरली पाहिजे परातीत . :D

पिठात एकदा हात घालून बघाच हो नक्की मग लक्षात येईल ... आई नेमकं काय दिव्य करत असेल .

खरी कसोटी तर याच्या पुठे आहे राव
भाकरी थापली तर खरी  .... पण  थापलेली  भाकरी परातीतून उचलून तव्यात टाकायची कशी ?????
याच कौशल्य शिकवायला शेजारी आईचं उभी असली पाहिजे .

भाकरी करायला शिकताना किती भाकऱ्या मोडल्या , किती परातीतच राहिल्या , किती तव्याच्या काठाशी येऊन पडल्या आणि कित्ती करपल्या याच गणित कुठल्याही मुलीकडे नसतं . बस्स .... ज्या दिवशी ती न तुटता तव्यात जाईल तो दिवस सुवर्णदिवस :)
तव्यातल्या भाकरीकडे पाहून टाकलेला एक मोठा उसासा ... अख्ख्या जगाचं ओझं खाण्यावरून उतरल्याचा अनुभव आणि मागे उभ्या असलेल्या आईने दिलेली शाबासकी

हो आणि आता ती फुगलीही पाहिजे ... ट ट ट ....म  

हाताची बोट पालथी घालून तापलेल्या भाकरीवरून पाणी पसरता पसरता बोट कधी तापतात कळताच नाही .
आणि इतक्या सगळ्या पर्यंत जर कुठल्या नवशिक्याची भाकरी मोडली नसेल तर मग भाकरी करणारी तव्याच्या प्रेमातच पडते .
आणि त्या प्रेमाचे रंग मग तिच्या गालावर, केसावर , कपड्यावर उठलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरून सगळ्या गावभर दिसतात .

" पोरगी भाकरी शिकतेय हो आमची. एक दोन दिवसात जमतंय बघा . :) "
आई आपली उगाच दारात उभी राहून दवंडी पिटते सगळ्या गावभर . आधीच टेन्शन कमी त्यात आता शेजारच्या कोंबड्यावाल्या आजी चवीला मागणार एक भाकरी .

मग ती प्रेमाने इतका वेळ तव्यात बसलेली भाकरी अग्निपरीक्षेला उतरल्यासारखी तव्यातून काढायची आणि धगधगत्या ज्योतीवर पालथी करायची .
कुठलही उलथनं , पळी , चमचा न वापरता हाताच्या चिमटीत उचलून पुन्हा फिरवून ज्योतीवर टाकायची .

३ सेकंद आपल्या त्वचेला अग्नी जाणवत नाही हे आईने भाकरी भाजताना उभ्या उभ्या दिलेलं ज्ञान . मग अगदी मनातल्या मनात १.... २.... ३.... मोजत घाबरत घाबरत चिमटीने गरम भाकरी उचलायची . आणि जर  १.... २.... ३.... च गणित चुकलंच तर मग आता पर्यंतची पांढरी शुभ्र भाकरी एका कोपऱ्यात करपलीच म्हणून समजा .  मग काय फुगते ही बया ....

हात भाजू न देता तितक्याच चलाखीने ज्या दिवशी ज्योतीवरून फिरवता येईल त्या दिवशी काम फत्ते......

स्वयंपाकाचा सगळ्यात अवघड किल्ला सर ! हुर्रे ....

उगाच म्हटलंय होय .... आधी हाताला चटके मग मिळते भाकर

मला अजूनही आठवतात ... माझा भाकरीचा हा किल्ला सर होई तोवर रोज संध्याकाळच्या भाकऱ्या माझ्याकडे असायच्या . चौकोनी , त्रिकोणी , तुटक्या , फाटक्या , अर्धवट कच्च्या , करपलेल्या , कडकडीत .... अरे रे .... कसल्या कसल्या नाही केल्या म्हणून सांगू .
पण यातली एकही भाकरी टाकून दिली नाही आईने . तेव्हा प्रत्येकवेळी मला याच नवल वाटायचं आणि अजूनही वाटत . आई आणि बाबा कुठलीही तक्रार न करता खूप आवडीने खायचे माझ्या चुकलेल्या भाकऱ्या .

कधी चिडचिड नाही , कधी रागावणं नाही , वैतागण नाही . उलट रोज प्रोत्साहन मिळायचं
"आग बघ ... कालपेक्षा छान झालीये . जमायला लागली की ग तुला . येईल आठवड्या भारत आई सारखी ट ट ट ..म ... फुगलेली "

मला काय वाटतं .....  भारतातील राहू द्या पण कमीत कमी महाराष्ट्रातील तरी प्रत्येक गृहिणीला भाकरी थापता आलीच पाहिजे .
या मटण , चिकन आणि माश्याच्या कालवनांसोबत भाकरी खाण्यात जी मजा आहे ती चपातीमध्ये नाही हो
काहीही म्हणा ..

आणि पटलं तर शिकून घ्या भाकऱ्या  :)  मदतीला मी आहेच  :p

हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे बाबानी काल मला तांदळाच्या उकडीच्या भाकऱ्या कशा करायच्या हे सांगितलं . माझ्यासाठी नवीन होतं पण माझ्या लेकाला भाकरी आवडते आणि यावेळीही आई बाबानी "जमेल ग तुला . कर  तरी एकदा " म्हटलं म्हणून ही करून पहिली . भारी जमली राव !!

तुम्हाला जर माझी भाकरी माझ्या स्वयंपाकघरात फोटोसहित पाहायची असेल तर इथे क्लिक करा .

थँक क्यू आई बाबा :)

म्हणूनच तर मी सुरवातीलाच म्हटलं

इतके वर्ष झाले तरी काही काहीच बदललं नाहीये . लग्न झालं घर बदललं , माणसं  , जागा , नाती , जबाबदाऱ्या , काम , अडचणी , भावना , कुटुंब सगळं बदलू शकत आयुष्यात ...

बस्स ..... मानेखाली हात धरून २ महिन्याच्या बाळाला  मान ताठ करायला शिकवणारी आई आणि ताठ झालेली मान आयुष्यभर कुणासमोरही वाकू द्यायची नाही ही शिकवण देणारे बाबा ..... कधीही बदलत नाहीत .