निरोप शेवटचा !!!

मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार !!! आणि ते ही तुझ्या स्टाईल मध्ये . ३ उदगारवाचक चिंन्हासहित :)

का ? इतका का आश्चर्याने पाहतो आहेस ? याशिवाय काही वेगळ अपेक्षित होत का माझ्या तोंडून ? नक्कीच असेल . पण मी त्यातील काही बोलायचं नाही असं ठरवलंय . माझं मौन हिचं तुझी शिक्षा .

अभिनंदन यासाठी की तू मला हरवलस आणि आभार … मला भानावर आणल्या बद्दल .  इतके वर्ष माझं मन याच साखरेत घोळत पडलं होत , विश्वास आणि प्रेम असेल तर घट्ट धरलेला हात कधीही सुटत नाही . पण असंच नसतं नेहमी हे तू सिध्द करून दाखवलस . नाहीतर कोण जाणे अजून किती दिवस त्या उसन्या साखरेची गोडी मला समाधान देत राहिली असती .

प्रत्येकाचं स्वप्न असतं , मनाजोग स्वतःच एक घर असावं . पण त्या होऊन ही सुंदर गोष्ट म्हणजे  दुसऱ्याच्या मनात घर करून राहण . तुझ्यामुळे ही सुंदर गोष्ट माझ्या वाट्याला आलीये . तुझ्या आयुष्यातील माझ्या जागेला दुसरी पर्यायी व्यक्ती नाही … ती जागा आजपासून रिकामीच राहील . वर्षाच्या ३६५ दिवसांपैकी एकतरी दिवस तू नक्की ती पोकळी बघून झुरशील . डोळे भरून आठवण काढशील माझी . आणि तीचं मी बांधलेल्या नात्याची विजयी सलामी ….

तुझी आठवण यापूर्वी ही प्रिय होती मला …… आता पूर्वी पेक्षा जास्त येईल . कदाचित रोज . मी काहीच गमावलं नाहीये . I did not loose anything . You lost me .

परिस्थिती माणसाला काहीही करायला भाग  पाडते म्हणतात त्यामुळे तुझ्याकडे सगळ्याची कारणं ही असतीलच की . झाल्या प्रकारात तुझी कितपत चूक आहे मला कल्पना नाही . नसेलही कदाचित . माझा जाणून घेण्याचा प्रयत्नही नाही . मी मात्र विनाकारण होरपळले .  माणसांवर जीव लावल्याची खूप मोठी किंमत मोजली मी . " यापुढे कुणावरही डोळे झाकून प्रेम करू नकोस " या शिकवणी बद्दल कसे आभार मानू तुझे . समोर उभा असणारा प्रत्येकजण चांगलाच आहे आणि चांगलाच वागेल असंच मानायची मी . तू मला या जगाची खरी ओळख पटवून दिलीस .

तुला असणारी माझी गरज ज्या दिवशी संपेल त्या दिवशी मी स्वतः एक भक्कम निर्णय घेईन याची कल्पना आधीच होती तुला . हो भक्कम … मुद्दामच कठोर हा शब्द वापरायच टाळल . आठवतंय तुला …… तूचं म्हणाला होतास " तू कठोर नाहीस . लगेच हळवी होतेस. फार लवकर मनाला लागतात तुझ्या गोष्टी " . तुझं हे वाक्य मला खोटं पडायचं नाही म्हणून … भक्कम निर्णय म्हटलं

ओंजळीतील सुकलेली फुलं टाकून देण्याच धाडस मला दिलंस . निदान तुझ्यामुळे ओंजळ तरी रिकामी झाली माझी . नवीन फुलं वेचायला जागा रिकामी झाली . वर्षाच्या अखेरीस सगळ मागे सोडून पुढे वाटचाल करायचं ठरवलंय मी . पुन्हा सगळ्याची नव्याने सुरुवात . पाटी कोरी असली की लिहिलेली अक्षर ठळक उमटतात म्हणे .

असा का अनोळखी नजरेने न्याहाळतो आहेस मला . माझं हे रूप पाहायला मिळालं नाही तुला पूर्वी कधी हा तुझा चांगुलपणा म्हणून . केल्या काही दिवसात बरंच काही बदललस तू . मग मी ही थोडी बदलले तर कुठे बिघडलं . मी ही स्वीकारलाच ना तुझा नकार ? एक ही प्रश्न न करता . आता माझा कोरडेपणा तू ही गोड मानून जप .

अरे हो …… एक निरोप द्यायचा होता . राहूनच गेलं बघ . तुला भेटलं की हे असं सगळ विसरायला होत. मी तुझ्यावर चिडले आहे हे ही .  :) असो .
निरोप हा की …… तुझ्या बद्दलच्या माझ्या सगळ्या भावना मेल्या . तू मारल्यास . पुन्हा कुणाच्या भावनांच्या खुनाचा गुन्हा माथ्यावर घेऊ नको . उजळ माथ्याने जगायला हिम्मत नाही तर मनाचा प्रामाणिकपणा जास्त गरजेचा असतो . एकटा असताना तुझंच मन तुला खात राहील असं पुन्हा कधीही वागू नको .

निघते मी …."येते " अस म्हणायचं टाळल . आता पुन्हा मागे वळून पाहणार नाही असं ठरवलंय . कितीही इच्छा होवो . माझ्या जाण्याने सुखावला असशील तर तू तरी आनंदी रहा.
 " चल , निघू मी ? " असंच विचारायचे ना नेहमी ? आज नाही विचारलं . सवयी प्रमाणे चुकून तू "नको" म्हणालास तर ……. तुझं मन मोडायची ताकद अजूनही नाही एकवटली माझ्यात .

गळ्यात दाटलेला आवंढा गीळ . निरोपाचा हुंकार ही फुटेनासा झालाय तुला . डोळे ओले करू नकोस . समोरचं उभी आहे मी अजून . पुन्हा डोळ्यात प्रतिबिंब दिसेल माझंच . मी गेल्यावर कोसळ कित्ती कोसळायचा तो .

नवीन वर्षाची सुरुवात नव्याने कर . तुझ्या आनंदासाठी माझ्या शुभेच्छा !!!

:)




नवनीतची वही

ते दिवसच मंतरलेले . नवनीत ची एखादी नवी कोरी वही . तिचा तो नवेपणाचा पुन्हा पुन्हा हुंगावा वाटणारा वास . पहिल्या पानाच्या डोक्यावर ।। श्री ।। आणि त्या खालोखाल स्वतःच कोरून लिहिलेलं नाव . त्याच्या बाजूला फुलांची नाजूक नक्षी ……
हिरोचा शाई पेन . कितीही कंटाळून लिहिलं तरी सुरेख अक्षर येणार हा विश्वास ते चकाकणार सोनेरी टोपण नेहमीच देत रहायचं . शेजारी शाईने भरलेली दौत . टोकाला रंग बदलून निळं झालेलं एखादं कापड

शब्दांची फौजच्या फौज चालत यायची डोक्यात . खळखळून हसायला लावणार सुख असो वा डोळ्यात टचकन पाणी यावं असं मन चिरत जाणार दुखः असो … मनात काहीही साचून राहायचं नाही . असंच्या असं कागदावर उतरायचं . जितक्या उस्फुर्तपणे मनामध्ये वाहायचं तितक्याच उत्कटतेने लेखणीतूनही उमटायचं .

कदाचित साचून राहण ही अवस्थाच अनोळखी होती त्या दिवसात . खळखळत्या झऱ्यासारख शब्द वाहत राहिले की मन स्वच्छ आणि निर्मळ राहत म्हणे . सलणारी सल , खोलवर झालेले घाव , डोळ्यांसमोर तुटलेला विश्वास , दुरावत जाणारी माणसं हे सगळ जेव्हापासून मनात साचायला सुरु झाल तेव्हापासून गढूळ होण हे त्याबरोबर आलंच .

गाठीला गाठ बांधत शब्द कधीही मनाभोवती कुंपण करून उभे राहायचे . मग ते कागदावर उतरल्या वाचून त्या कुंपणातून सुटका नाही …. अगदी मध्यानी रात्र असो वा स्वयंपाकावेळचे कामाचे गुरफटलेले तास असोत .

त्या नवनीतच्या वहीची त्यामुळे केव्हाही गरज पडायची . सुचेल तसं उमटवत जायचं त्यात अन पुन्हा केव्हा वेळ मिळेल रिकामा तेव्हा त्याला सजवत बसायचं . कदाचित याच सवयीमुळे , २४ तास उपलब्ध सुविधा …. सारखी ती वही गादीवर पडून असायची . एखाद गुपित सामावून घेतलं असेल तिने तर मग उशीच्या खाली सापडायची . पण तिने कधी साथ नाही सोडली .

मन रिकाम करणारी सखीचं होती ती .पण हल्ली सगळंच चित्र बदललंय . मन सोडा साधं पाय रिकामे करायलाही जमेना झालंय . अपार्टमेंटच्या जगात राहणारी माणसं आपण . जोडीदार नाही म्हणून घरातून बाहेर पडायचे बंद झालो आणि मनाचं म्हणाल तर त्याची धास्ती वाटते म्हणून ते ही रिकाम करायला धजत नाही .

पोकळी सापडली की कोणत्याही आधाराविना उभा राहिलेलं , गच्च भरून आलेलं आभाळ ही कोसळायला सुरु होत . रिकाम होण्याच्या आशेने … म्हणूनच की काय हल्ली आपण ही पोकळीच तयार होऊ देत नाही मनात . रिकाम होईल , व्यक्त होईल या भीतीने . दिवसातले सगळे तास ठाचून भरलेले असतात कामाने …. विचार करायला , व्यक्त व्हायला वेळ मिळूच नये या एकाच कारणासाठी आपण स्वतःला खूप व्यग्र  घेतलंय .

सकाळी ८ ची बस पकडायची असेल तर ७:३० गजर असतो … पुढच्या अर्ध्या तासात पटकन आवरायचं … बस मधेही कानात काहीतरी लटकावून आवडीची असो वा नसो पण गाणी ऐकायची . पुढचा दिवस ऑफिसच्या कामात आपली जागा शोधून ऐसपैस बसतो . संध्याकाळी घरी आल्यावर हातात टीव्ही चा रिमोट अथवा laptop …. रात्री झोप ही लागत नाही हल्ली धड . दिवसभर साचून राहिलेलं बाहेर कुठे पडलय हो अजून ? हे वेळापत्रक रोजचंच झालंय . त्याला मोडावं इतकी हिम्मत नाही राहीली .

नवनीतची जुनी वही कपाटाच्या खालच्या कप्प्यात … अडगळीच्या सामनाबरोबर . पापण्यांचा असहकार सुरु झाला की ताजेल्या रात्री कप्पा आवरायला घेतल्यावर आपसूकच हात त्या वहीकडे जातो . मलाही मिळाली अशाच एका रात्री माझी जुनी सखी , वही .


कधी एके काळी माझ अक्षर इतक सुंदर होत हे विसरूनच गेले होते मी . एक एक पान उघडून वाचायला सुरु केल तश्या सगळ्या आठवणी उलगडत गेल्या . हे सगळ मी लिहिलंय ? विश्वासच बसत न्हवता . बऱ्याच दिवसांपासून अडगळीत पडल्यामुळे परकं वाटत होत . मी इतकं छान लिहू शकते याचा नव्यानेच शोध लागला त्या रात्री …. पुन्हा एकदा.

त्या रात्री लक्षात आलं … हल्ली डोक इतकं जड का वाटतंय ? मन इतकं कोरड का पडलंय ? साचून राहिलेलं गढूळ का झालंय ? डोळ्यातला पाऊस मला एकटी असतानाच का गाठतो ? माणसावर विश्वास ठेवायची आता का इतकी भीती वाटतेय ? का कोणासामोरच व्यक्त नाही करत मी स्वतःला ? आणि इतर बरेच अन्नुतरीत राहिलेले प्रश्न

सकाळी उठून पहिला एक नवनीत ची वही विकत घेणार आहे … हिरोचा पेनही बरेच दिवस नाही वापरला . जड झालेलं डोकं हलकं करायला रोज एक पान लिखाण पुरेसं आहे ना ? पूर्वीचे ते दिवस परत आणायचा विचार करतेय ? कसा वाटतोय ?