निरोप शेवटचा !!!

मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार !!! आणि ते ही तुझ्या स्टाईल मध्ये . ३ उदगारवाचक चिंन्हासहित :)

का ? इतका का आश्चर्याने पाहतो आहेस ? याशिवाय काही वेगळ अपेक्षित होत का माझ्या तोंडून ? नक्कीच असेल . पण मी त्यातील काही बोलायचं नाही असं ठरवलंय . माझं मौन हिचं तुझी शिक्षा .

अभिनंदन यासाठी की तू मला हरवलस आणि आभार … मला भानावर आणल्या बद्दल .  इतके वर्ष माझं मन याच साखरेत घोळत पडलं होत , विश्वास आणि प्रेम असेल तर घट्ट धरलेला हात कधीही सुटत नाही . पण असंच नसतं नेहमी हे तू सिध्द करून दाखवलस . नाहीतर कोण जाणे अजून किती दिवस त्या उसन्या साखरेची गोडी मला समाधान देत राहिली असती .

प्रत्येकाचं स्वप्न असतं , मनाजोग स्वतःच एक घर असावं . पण त्या होऊन ही सुंदर गोष्ट म्हणजे  दुसऱ्याच्या मनात घर करून राहण . तुझ्यामुळे ही सुंदर गोष्ट माझ्या वाट्याला आलीये . तुझ्या आयुष्यातील माझ्या जागेला दुसरी पर्यायी व्यक्ती नाही … ती जागा आजपासून रिकामीच राहील . वर्षाच्या ३६५ दिवसांपैकी एकतरी दिवस तू नक्की ती पोकळी बघून झुरशील . डोळे भरून आठवण काढशील माझी . आणि तीचं मी बांधलेल्या नात्याची विजयी सलामी ….

तुझी आठवण यापूर्वी ही प्रिय होती मला …… आता पूर्वी पेक्षा जास्त येईल . कदाचित रोज . मी काहीच गमावलं नाहीये . I did not loose anything . You lost me .

परिस्थिती माणसाला काहीही करायला भाग  पाडते म्हणतात त्यामुळे तुझ्याकडे सगळ्याची कारणं ही असतीलच की . झाल्या प्रकारात तुझी कितपत चूक आहे मला कल्पना नाही . नसेलही कदाचित . माझा जाणून घेण्याचा प्रयत्नही नाही . मी मात्र विनाकारण होरपळले .  माणसांवर जीव लावल्याची खूप मोठी किंमत मोजली मी . " यापुढे कुणावरही डोळे झाकून प्रेम करू नकोस " या शिकवणी बद्दल कसे आभार मानू तुझे . समोर उभा असणारा प्रत्येकजण चांगलाच आहे आणि चांगलाच वागेल असंच मानायची मी . तू मला या जगाची खरी ओळख पटवून दिलीस .

तुला असणारी माझी गरज ज्या दिवशी संपेल त्या दिवशी मी स्वतः एक भक्कम निर्णय घेईन याची कल्पना आधीच होती तुला . हो भक्कम … मुद्दामच कठोर हा शब्द वापरायच टाळल . आठवतंय तुला …… तूचं म्हणाला होतास " तू कठोर नाहीस . लगेच हळवी होतेस. फार लवकर मनाला लागतात तुझ्या गोष्टी " . तुझं हे वाक्य मला खोटं पडायचं नाही म्हणून … भक्कम निर्णय म्हटलं

ओंजळीतील सुकलेली फुलं टाकून देण्याच धाडस मला दिलंस . निदान तुझ्यामुळे ओंजळ तरी रिकामी झाली माझी . नवीन फुलं वेचायला जागा रिकामी झाली . वर्षाच्या अखेरीस सगळ मागे सोडून पुढे वाटचाल करायचं ठरवलंय मी . पुन्हा सगळ्याची नव्याने सुरुवात . पाटी कोरी असली की लिहिलेली अक्षर ठळक उमटतात म्हणे .

असा का अनोळखी नजरेने न्याहाळतो आहेस मला . माझं हे रूप पाहायला मिळालं नाही तुला पूर्वी कधी हा तुझा चांगुलपणा म्हणून . केल्या काही दिवसात बरंच काही बदललस तू . मग मी ही थोडी बदलले तर कुठे बिघडलं . मी ही स्वीकारलाच ना तुझा नकार ? एक ही प्रश्न न करता . आता माझा कोरडेपणा तू ही गोड मानून जप .

अरे हो …… एक निरोप द्यायचा होता . राहूनच गेलं बघ . तुला भेटलं की हे असं सगळ विसरायला होत. मी तुझ्यावर चिडले आहे हे ही .  :) असो .
निरोप हा की …… तुझ्या बद्दलच्या माझ्या सगळ्या भावना मेल्या . तू मारल्यास . पुन्हा कुणाच्या भावनांच्या खुनाचा गुन्हा माथ्यावर घेऊ नको . उजळ माथ्याने जगायला हिम्मत नाही तर मनाचा प्रामाणिकपणा जास्त गरजेचा असतो . एकटा असताना तुझंच मन तुला खात राहील असं पुन्हा कधीही वागू नको .

निघते मी …."येते " अस म्हणायचं टाळल . आता पुन्हा मागे वळून पाहणार नाही असं ठरवलंय . कितीही इच्छा होवो . माझ्या जाण्याने सुखावला असशील तर तू तरी आनंदी रहा.
 " चल , निघू मी ? " असंच विचारायचे ना नेहमी ? आज नाही विचारलं . सवयी प्रमाणे चुकून तू "नको" म्हणालास तर ……. तुझं मन मोडायची ताकद अजूनही नाही एकवटली माझ्यात .

गळ्यात दाटलेला आवंढा गीळ . निरोपाचा हुंकार ही फुटेनासा झालाय तुला . डोळे ओले करू नकोस . समोरचं उभी आहे मी अजून . पुन्हा डोळ्यात प्रतिबिंब दिसेल माझंच . मी गेल्यावर कोसळ कित्ती कोसळायचा तो .

नवीन वर्षाची सुरुवात नव्याने कर . तुझ्या आनंदासाठी माझ्या शुभेच्छा !!!

:)




नवनीतची वही

ते दिवसच मंतरलेले . नवनीत ची एखादी नवी कोरी वही . तिचा तो नवेपणाचा पुन्हा पुन्हा हुंगावा वाटणारा वास . पहिल्या पानाच्या डोक्यावर ।। श्री ।। आणि त्या खालोखाल स्वतःच कोरून लिहिलेलं नाव . त्याच्या बाजूला फुलांची नाजूक नक्षी ……
हिरोचा शाई पेन . कितीही कंटाळून लिहिलं तरी सुरेख अक्षर येणार हा विश्वास ते चकाकणार सोनेरी टोपण नेहमीच देत रहायचं . शेजारी शाईने भरलेली दौत . टोकाला रंग बदलून निळं झालेलं एखादं कापड

शब्दांची फौजच्या फौज चालत यायची डोक्यात . खळखळून हसायला लावणार सुख असो वा डोळ्यात टचकन पाणी यावं असं मन चिरत जाणार दुखः असो … मनात काहीही साचून राहायचं नाही . असंच्या असं कागदावर उतरायचं . जितक्या उस्फुर्तपणे मनामध्ये वाहायचं तितक्याच उत्कटतेने लेखणीतूनही उमटायचं .

कदाचित साचून राहण ही अवस्थाच अनोळखी होती त्या दिवसात . खळखळत्या झऱ्यासारख शब्द वाहत राहिले की मन स्वच्छ आणि निर्मळ राहत म्हणे . सलणारी सल , खोलवर झालेले घाव , डोळ्यांसमोर तुटलेला विश्वास , दुरावत जाणारी माणसं हे सगळ जेव्हापासून मनात साचायला सुरु झाल तेव्हापासून गढूळ होण हे त्याबरोबर आलंच .

गाठीला गाठ बांधत शब्द कधीही मनाभोवती कुंपण करून उभे राहायचे . मग ते कागदावर उतरल्या वाचून त्या कुंपणातून सुटका नाही …. अगदी मध्यानी रात्र असो वा स्वयंपाकावेळचे कामाचे गुरफटलेले तास असोत .

त्या नवनीतच्या वहीची त्यामुळे केव्हाही गरज पडायची . सुचेल तसं उमटवत जायचं त्यात अन पुन्हा केव्हा वेळ मिळेल रिकामा तेव्हा त्याला सजवत बसायचं . कदाचित याच सवयीमुळे , २४ तास उपलब्ध सुविधा …. सारखी ती वही गादीवर पडून असायची . एखाद गुपित सामावून घेतलं असेल तिने तर मग उशीच्या खाली सापडायची . पण तिने कधी साथ नाही सोडली .

मन रिकाम करणारी सखीचं होती ती .पण हल्ली सगळंच चित्र बदललंय . मन सोडा साधं पाय रिकामे करायलाही जमेना झालंय . अपार्टमेंटच्या जगात राहणारी माणसं आपण . जोडीदार नाही म्हणून घरातून बाहेर पडायचे बंद झालो आणि मनाचं म्हणाल तर त्याची धास्ती वाटते म्हणून ते ही रिकाम करायला धजत नाही .

पोकळी सापडली की कोणत्याही आधाराविना उभा राहिलेलं , गच्च भरून आलेलं आभाळ ही कोसळायला सुरु होत . रिकाम होण्याच्या आशेने … म्हणूनच की काय हल्ली आपण ही पोकळीच तयार होऊ देत नाही मनात . रिकाम होईल , व्यक्त होईल या भीतीने . दिवसातले सगळे तास ठाचून भरलेले असतात कामाने …. विचार करायला , व्यक्त व्हायला वेळ मिळूच नये या एकाच कारणासाठी आपण स्वतःला खूप व्यग्र  घेतलंय .

सकाळी ८ ची बस पकडायची असेल तर ७:३० गजर असतो … पुढच्या अर्ध्या तासात पटकन आवरायचं … बस मधेही कानात काहीतरी लटकावून आवडीची असो वा नसो पण गाणी ऐकायची . पुढचा दिवस ऑफिसच्या कामात आपली जागा शोधून ऐसपैस बसतो . संध्याकाळी घरी आल्यावर हातात टीव्ही चा रिमोट अथवा laptop …. रात्री झोप ही लागत नाही हल्ली धड . दिवसभर साचून राहिलेलं बाहेर कुठे पडलय हो अजून ? हे वेळापत्रक रोजचंच झालंय . त्याला मोडावं इतकी हिम्मत नाही राहीली .

नवनीतची जुनी वही कपाटाच्या खालच्या कप्प्यात … अडगळीच्या सामनाबरोबर . पापण्यांचा असहकार सुरु झाला की ताजेल्या रात्री कप्पा आवरायला घेतल्यावर आपसूकच हात त्या वहीकडे जातो . मलाही मिळाली अशाच एका रात्री माझी जुनी सखी , वही .


कधी एके काळी माझ अक्षर इतक सुंदर होत हे विसरूनच गेले होते मी . एक एक पान उघडून वाचायला सुरु केल तश्या सगळ्या आठवणी उलगडत गेल्या . हे सगळ मी लिहिलंय ? विश्वासच बसत न्हवता . बऱ्याच दिवसांपासून अडगळीत पडल्यामुळे परकं वाटत होत . मी इतकं छान लिहू शकते याचा नव्यानेच शोध लागला त्या रात्री …. पुन्हा एकदा.

त्या रात्री लक्षात आलं … हल्ली डोक इतकं जड का वाटतंय ? मन इतकं कोरड का पडलंय ? साचून राहिलेलं गढूळ का झालंय ? डोळ्यातला पाऊस मला एकटी असतानाच का गाठतो ? माणसावर विश्वास ठेवायची आता का इतकी भीती वाटतेय ? का कोणासामोरच व्यक्त नाही करत मी स्वतःला ? आणि इतर बरेच अन्नुतरीत राहिलेले प्रश्न

सकाळी उठून पहिला एक नवनीत ची वही विकत घेणार आहे … हिरोचा पेनही बरेच दिवस नाही वापरला . जड झालेलं डोकं हलकं करायला रोज एक पान लिखाण पुरेसं आहे ना ? पूर्वीचे ते दिवस परत आणायचा विचार करतेय ? कसा वाटतोय ?

मी दादा झालोय....

आई ही अशी एकच व्यक्ती असते जिला आपल्या मुलाच्या प्रत्येक गोष्टीच कौतुक …. अगदी त्याच्या रडण्याच्या स्टाईल पासून त्याच्या फुगणाऱ्या गालापर्यंत. त्यामुळे ही गोष्ट इथे लिहिताना मी ही एक अशीच आई आहे , जिला आपल्या पिल्लाच्या कौतुकाचा मोह आवरता आला नाही ……. असं समजायला काहीच हरकत नाही :)

खंर सांगायचं तर लिहायला बसले की मी कोणत्याही विषयावर लिहू शकते …… कोणत्याही या अर्थाने कितीही क्षुल्लक विषयावर …. ज्याचा तुम्ही आम्ही कधी इतका विचारही केलेला नसतो किंबहुना हे विषय अगदी सहजपणे दुर्लक्ष केलेलं असत .

प्रस्तावना आवरती घेत पोस्ट ला सुरुवात केलेली बरी , नाहीतर हे सगळ सुरुवातीलाच रटाळ वाटायला लागेल .

……….

……….


एका गुप्त आणि कुतूहलपूर्ण विषयावर पिल्लने आजीशी केलेली हितगुज ,  त्यांच्याच भाषेत लिहायचा हा एक वेगळा प्रयत्न  

दिवस … गणेश चतुर्थी
आजी …… आज आमच्या घरी गणपती बाप्पा आलेत राहायला . जर्मनी मध्ये आल्यापासून पहिल्यांदाच कुणीतरी राहायला आलाय घरी . खूप मस्त वाटतंय . तुझ्या घरी मी आल्यावर जितके लाड तू माझे करतेस तेवढेच लाड आई ही करतेय बाप्पाचे . मोदक काय , लाडू काय, खीर काय …. मज्जाच मज्जा  :) मी नी बाबा एकदम खुश . बाबा ने बाप्पासाठी भरपूर गुलाबांचा गुच्छ आणलाय …… कसल्ला मस्त वास सुटलाय म्हणून सांगू तुला घरात … ये की ग तू ही इकडे एकदा …
बर ऐक ना …… तू एकदा म्हणाली होतीस आठवतंय ? तुला काय हवं असेल तर बाप्पा कडे माग . तो सगळ देतो आपल्याला . मी सकाळ पासून विचार करतोय , काय मागू याच्याकडे ? काही सुचतच नाहीये बघ लवकर .

दिवस …… गणेश चतुर्थी चा तिसरा
आजी , रात्रभर विचार करून मी आज ठरवलंय बाप्पा कडे काय मागायचं ते . जे मी फक्त तुला सांगेन . बर नको , बाबा ला ही सांगतो . तो ही मला फार आवडतो . आज सकाळची आरती झाल्या झाल्या बाप्पा समोर डोक टेकून मी सांगणार आहे …. आम्हाला एक बेबी हवंय . :) देईल काय ग तो ? डॉक्टर काकांसारखा याच्याकडे ही असेल का फ्रीज बाळांनी भरलेला ?

दिवस …. गणेश चतुर्थी चा पाचवा
अग आज गंमतच झाली बर का ……. आमचे बाप्पा पाहायला माझा जर्मनीतील एक मित्र आणि त्याचे आई बाबा आले होते . आरती झाल्या झाल्या मी ठरल्या प्रमाणे बाप्पा कडे बेबी मागून घेतलं . डोक टेकून नमस्कार केला आणि त्याला सांगितलं "बाप्पा , आम्हाला एक बेबी दे " … आणि काय झाल काय माहित ? सगळे एकदमच शांत झाले . नंतर माझ्या मित्राचे आई बाबा , माझ्या बाबाकडे बघून हसत होते. बाबा कडे पाहिलं तर तो भुवया उंचावून हसत हसत काहीतरी आईला विचारात होता … आणि आई , बाबाकडे डोळे मोठे करून बघत होती . अग तिला सवयच आहे , मी भात नाही खाल्ला की माझ्याकडेही अशीच डोळे मोठे करून पाहते . बाबा प्रसाद खाणार नाही म्हटला असेल म्हणून डोळे मोठे केले असतील कदाचित तिने …… जाऊ दे , मी माझ्या मित्राला ही सांगितलं तू ही मग बाप्पा कडे हवं ते . देईल तो . त्याने चॉकलेट मागितलं . वेडाच आहे … ते काय बाबा कडूनही मिळेल        

मार्च महिना -  तारीख २०
आई आज फार दमल्या सारखी वाटत होती ग …. कदाचित बर नाही वाटत आहे तिला . बाबा आज असं का सांगत होता ? पिल्ला आता आई ला त्रास नको देऊ . एकटा झोपायला शिक . माझ्या हाताने भरवेन ह मी तुला भात , खायचा पटकन . मला शाळेत सोडून कदाचित ते दोघे डॉक्टरकडे गेले होते . मी औषध पहिली टेबलवर . माझ्यासाठी घेतो का हा बाबा सुट्टी ? आई साठी बरी घेतली लगेच आज . मोठी आहे ती . कित्ती काळजी करतो तिची .

मार्च महिना - तारीख २७
आई चा वाढदिवस आहे का ग आज ? नाही ना. झाला की काही दिवसांपूर्वीच  …… मग बाबाचा ? त्याचा ही नाही . त्याचा अजून खूप लांब आहे म्हणे . माझा असेल मग :)
माझाही नाही …… मग बाबाने केक का आणला आज ?
असंच …….बाबा असंच कधी केक नाही घेऊन येत . दुसर काहीतरी आणतो माझ्या आवडीच . मला केक नाही आवडत ग .
आई खूप छान दिसत होती आज . बाबा तिला जवळ घेऊन बसला होता . दोघे काहीही बोलत न्हवते पण मला Thank you म्हणाले . मी काय केल ग ?

एप्रिल महिना
आज आई मला ही घेऊन गेली होती दवाखान्यात तिच्या बरोबर . डॉक्टर विचारात होते मला …. तुला कुणाशी खेळायला आवडेल ? Boy की  Girl ???
मी बोललो नाही काही … पण संध्याकाळी आल्यावर बाबाला सांगितलं . Girl ला फुटबाल नाही खेळता येत . आई कशी तिरकी मारते . मला boy शी खेळायला आवडत .  तू कसा मस्त खेळतोस माझ्याशी . तुझा ball लांब पर्यंत जातो

मे महिना - तारीख ४
अग आजी , मी आणि आई तुझ्याकडे येतोय . बाबा कसा काय तयार झालाय आईला सोडून राहायला काय माहित ?   तो तिला सोडून राहत नाही कधी एकटा .  पण मला एकदम छान वाटतंय . तिकीट ही बुक झालाय आमचं Sunday च .
आई रात्री बाबाला समजावत होती …. नीट राहा , लवकर या मी वाट पाहतेय , पिल्लाची काळजी करू नका  वेळच्या वेळी जेवत जा . जास्त खाऊ नका बाहेरचं , पोट बिघडेल . औषधांची पाकिटे वरच्या डब्ब्यात ठेवली आहेत . बंर वाटत नसेल तर मला फोन करा, मी सांगेन कुठली घ्यायची गोळी . आजारी पडू नका …  वगैरे वगैरे. मला फार बओर झालं . झोपलो जाऊन मी आत एकटाच .

मे महिना - तारीख ८
अग आजी , जर्मनीच्या डॉक्टरनी आमचं बेबी चुकून तुझ्या इथे पाठवलय म्हणे . ते घ्यायला आम्ही येतोय इंडियाला . बाबानेच सांगितलं मला सकाळी अंघोळ घालताना . गेल्या  महिन्या पासून सगळ तोच करतो माझं….
आई शपथ , काय मस्त आहे हा बाप्पा …… :)    मागितलं की खरंच देतो . पण अड्रेस चुकला बहुतेक :) असो , आम्ही येतोय

 
मे महिना - तारीख १०
आलो की ग तुझ्या घरी मी …. तुझ्या इथे राहायला आवडत ग मला पण झोपणार मी माझ्या मम्माजवळच . शेजारच्या राऊला मी सांगितलं बेबी घेऊन जाणार आहे आम्ही परत . तर तो म्हणाला लगेच नाही मिळत ते . पोटात असत मम्माच्या भरपूर दिवस लागतात म्हणे …… वेडा आहे ग तो … आपल्या गणपती बाप्पा ची ओळख नाहीये त्याची .

जून महिना
आजी , नको न खायला घालू मम्मा ला इतक . तिचं पोट बघ मोठ मोठ होतंय . तिला आवडत नाही पोट मोठ झाल्यावर . बाबाला ओरडायची ती . सूर्यनमस्कार घालायला लावायची . सांग तू ही तिला घालायला .

तुझ्या इथली नवी शाळा खूप सुंदर आहे ग . मला नवीन मित्र मिळाले . पियुशा , माझी शाळेतली मैत्रीण ग …. सांगत होती तिच्याही आई ने बेबी बॉय आणलाय . म्हणे पोटातून बाहेर येत ते . दिवसभर मैत्रीणीना ती हेच सांगत होती . बाळ असं रडत , असं झोपत , दुध पीत . या मुली फार बडबड करत असतात स्कूलमध्ये . मी उद्या नाव सांगणार आहे टीचरना

जुलै महिना
अग आजी , आज आपण ज्या डॉक्टर काकांकडे गेलो होतो ना त्यांच्या फ्रीजमधुनच आणलय म्हणे मम्मा ने मला. त्यांना भेटायचं होत मला म्हणून घेऊन आलीये ती आज मला इकडे . अग , खरच खूप छान आहेत हे काका . मस्त गप्पा मारत बसले होते माझ्याशी . पेरूही दिला त्यांनी मला खायला . त्यांच्या झाडाचा आहे म्हणे . गोड आहे .
आणखी एक गम्मत आहे … अग , ती पियुशा खरंच सांगत होती वाटत . बाळ पोटात असत . डॉक्टर काकांनी दाखवलं मला आज स्क्रीनवर . अजून छोट आहे म्हणे . दिवाळीला देतील आपल्याला . तोवर मोठ होईल . आजी ……. आपल बाल काळ आहे वाटत ग …. स्क्रीनवर तसच दिसत होत मला . मी विचारलं तर काका खूप हसत होते मला .  

ऑगस्ट महिना - तारीख २२
आज बाबाचा वाढदिवस आहे . लक्षात आहे ना आजी तुझ्या ? कि विसरलीस .
बाबाने केक आणला नाहीये . तो इकडे आला की आम्ही दोघे जाणार आहे त्याचा केक आणायला . मी विचारलं त्याला "बाबा , तुला काय गिफ्ट हवंय ? सांग …. मी देतो तुला लग्गेच . " तो म्हणाला "माझ्या पिल्लाचा एक गोड गोड पा …" दिला मी :)
आणखी एक बाळाच्याही वाटणीचा
आईचा देऊ का विचारलं तर म्हंटला " नको ,  मी घेईन तिच्याकडून तिचं तिचं गिफ्ट " . जाऊ दे ……. मला काय करायचं .
तो आल्यावर एक मस्त केक आणणार आणि मी तो कापणार … मेणबत्त्या फुंकायला खूप भारी वाटत मला :)


महिना सप्टेंबर
कस्सला भारी गणपती बाप्पा येतो ग तुझ्या घरी . माझ्या जर्मनीच्या घरी खूप छोटा होता . हा एकदम छान आहे दिसायला . पण याला बालगणेश का म्हणतात ? बाळासारखा दिसतो म्हणून ? आजोबा सांगत होते रात्री …. मी आलो होतो त्या वर्षीही बालगणेश आणला होता म्हणे आणि  या वर्षीही . आपण अजून एक बाळ आणणार ना म्हणून :)
मला खूप मोठे मोठे बाप्पा दाखवून आणले मामा ने . सुपाएवढे कान ,  मोठच्या मोठ पोट, लांबसडक सोंड आणि हातात एक मोदक …… मस्त .
दिसणाऱ्या प्रत्येक बाप्पाला मी Thank You म्हणणार आहे . मी मागितलं होत त्याच्याकडे baby . तो देतोय म्हणे आता दिवाळी पर्यंत .
बाबाने शिकवलंय . कुणी आपल्याला काही दिलं तर त्याला न विसरता Thank You म्हणावं :) . जर्मनीच्या ऑफिस मधले काका म्हणतात "तुझा बाबा एकदम छान आहे ." मी सांगितलं "मला माहितीये हे आधी पासूनच "    

आणि हो … Thank You तुलाही . इतका गोड नटवला होतास तू मला . खऱ्या खऱ्या कृष्णासारखा.  बाबाला खूप आवडलं . म्हणत होता "पुढच्या वर्षी आपण राधा ही नटवून घ्यायची आजी कडून :) " 

महिना ऑक्टोबर
अग अ आजी …… माझा वाढदिवस आहे आज . विसरशील बघ . तसं  मी या आधी बऱ्याच वेळा  झालीये , गिफ्ट ही आणून झालाय . बस्स , आज बाबाने पाठवलेल्या केक ची वाट पाहतोय . त्याने सांगितलाय, " पिल्लाचा आवडीचा केक आणि गिफ्ट पोहोचेल संध्याकाळ पर्यंत " .

आजी , आपल्या बाळाच्या वाढ दिवशीही आणू न आपण केक ? कसला आणायचं ग ? मला खायला देशील ना ? आणि हो …. माझे कसे दोन दोन वाढदिवस असतात बेबीचेही असतील ? एक तारखेने आणि एक दसऱ्याला :)

महिना नोव्हेंबर
आई फारच कंटाळली आहे ग …. माझा अभ्यासही नाही घेत रोज . होमवर्क शिवाय जास्तीच काहीच करून घेत नाही . म्हणे , बसायचा बसायचा कंटाळा येतो . आता हिने केला तर चालतो ग कंटाळा ? मी एक दिवस नाही म्हटलं अभ्यासाला तर ओरडते की लगेच . जाऊ  दे , सगळी मोठी लोकं अशीच असतात . बाबालाही सांगितलं तर तो ही आई ची बाजू घेतो नेहमी .
बरंय … डॉक्टर काका दिवाळीला बेबी देतील . ते माझ्या सारख छोटुस असेल . 

दिवस …… दिवाळी पाडवा
ये …… जिंकले , जिंकले …… :) आम्हाला डॉक्टर काकांनी एक गोड गोड बाळ दिलय. बेबी गर्ल …. मी दादा झालो . आर्य दादा ……. :)
हो , ती आता मला दादा म्हणेल . मी तिला मांडीवर घेऊन बसलो होतो . इवलुशे हात, इवलुशे पाय , काळेभोर डोळे , भरपूर केस . खूप खूप मस्त वाटतंय मला आज . गणपती बाप्पा ला आठवणीने Thank You  म्हटलं मी . बाबाने सांगितलाय ना .
बाळ आल्या आल्या पहिला फोन बाबाला केला . काहीच बोलायला सुचेना त्याला :) तो ही खूप खुश आहे .   
मी हाक दिली कि खूप गोड हसते बेबी गर्ल . मी तिला आवडतो  आणि मला ती :) 


माणसांना जीव लावला … इतकाच दोष !!!


वीणा आली होती आज घरी . बऱ्याच दिवसांनी दर्शन झाल आज तिच . आपल्याच मुला बाळांत गुंतलेली असते हल्ली . आज आली तेव्हा थोडी सुकल्यासारखी वाटली . बाकी इतर वेळी वीणा म्हणजे अखंड बडबड हे गणितच मांडल गेलय पण तिला अशी सुकलेली पाहून मनात कुठेतरी खोलवर कळ उठली . एखादी गोष्ट फार मनाला लागल्याशिवाय इतकी शांत नाही होत ती . आणि एकदा का शांत झाली की तिला बोलती करायची म्हणजे एक दिव्यच पार पाडाव लागत .

हातातील सगळी कामं बाजूला टाकून मी तिच्या समोर येउन बसले . नजरेला नजर देण टाळतच होती जणू . खिडकीच्या गाजबाहेरचा वाहणारा वारा शून्य नजरेतून न्याहाळत होती . मीचं विचाराल तिला "चहा घेतेस का आल्याचा  ? बंर वाटत नाहीये का ग तुला ? " . 
तशी शून्यातील नजर एकदम भानावर आल्यासारखी हळुवार हसत मला म्हटली "मंदाताई , जोवर वारा आपल्या घरात वाहत असतो तोवर तो आपला . अन खिडकीचे गज ओलांडून बाहेर गेला की तो बाहेरच्या सोसाट्यात विरघळतो . आपलं शिंपल्यातील सजवलेलं अस्तित्व सोडून फुलाचा सुगंध पसरवायला का म्हणून बाहेर पडत असेल ? अन बाहेरच्या जगालाही अशी कितीशी गरज असते ग त्याची ?  "  

  मला तिचा रोख नक्की कोणावर आहे हे अजून लक्षात येत न्हवत . अगदी तिच्या प्रश्नाला तिच्याच वाक्यात उत्तर द्यावं म्हणून मी ही बोलले "अग , वाराच तो . घरी काय आणि बाहेर काय …. वाहत राहण आणि सुगंध पसरवण इतकच त्याच काम . या चार भिंतीत कोंडलेल शिंपल्याच अस्तित्व काय कामाचं ग ? वाहू दे कि त्याला त्याच्या मर्जीने . बाहेरच्या जगाचच म्हणत असशील तर , तसाही एका झुळुकीने कुणाचंच काही अडणार नसत . पण एखाद्या कोपऱ्यातील एखादी पोकळी असते जी ज्याची त्यानेच भरावी म्हणतात ."  तिच्या लुकलुकणाऱ्या नजरेतून जाणवत होत की तिच्या खऱ्या प्रश्नाला जरी अजून मी स्पर्श केला नसला तरीही तिला हवी त्या कोड्याची उकल मला पहिल्या गाठीत सुटलीये .  

त्यावर तिचा पुढचा प्रश्न " हो…. हे झालं वाऱ्याच आणि झुळूकीच गणित . जे तू सोडवलस. पण मंदाताई , लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलीच ही असच असत ना  ग ? आई बाबांच्या प्रेमाच , शिंपल्याच अस्तित्व सोडून , संसार करायच्या ओढीन माहेरचा उंबरा ओलांडून आपण मुली सासरी जातो . आणि तिथे तिची कोणाला गरजच नसेल तर ? "  इतकच बोलून ती थांबली . पुढंच वाक्य बोलण्याआधी घशात आलेला हुंदका आवरण गरजेच होत . अन हा सारा मुक्याने कोसळणारा पाऊस माझ्यापासून लपवण्याचा एक निष्फळ प्रयत्न चालला होता बिचारीचा . 

तिच्या मनाला पडलेलं कोड या प्रश्नातच आलं लक्षात माझ्या . मी ही समजुतीच्या स्वरात सांगितलं "कशाला मनाला लावून घेतेस वीणा . ज्याला तुझी खरंच गरज आहे तो आहेच कि तुझ्या सोबत . तुझ्या साठी नेहमीच थांबलेला . कशाला हवय तुला अजून कुणी ? आणि अपेक्षाच नाही ठेवल्या की अपेक्षाभंगाच दुःख्ख  ही वाट्याला नाही येत ."

"मंदाताई , पण गुंतलेल्या मनाच काय ? इतक्या सहजासहजी सुटतात हे पीळ ? " ……… काय उत्तरं देणार होते मी तिच्या या प्रश्नाचं ? फाटलेल्या आभाळाला कुठे कुठे म्हणून ठिगळ लावायची ? कधी न कधी उघड पडणारच हृदय   

वीणाला मी गेली ८ वर्ष ओळखते . अगदी तिच्या कॉलेजपासून. दुसऱ्याला कधीही स्वतः होऊन त्रास न देणार व्यक्तिमत्व . आजच्या तिच्या बोलण्यावरून तिच्या लग्नानंतरची  ही ५ वर्ष झरझर डोळ्याखालून सरकली . माणसांना जीव लावला इतकाच काय तो तिचा दोष . 

लग्न होऊन सासरी गेली पण घरी आपलं म्हणणार कुणीच नाही . अगदी उंबऱ्यावरचं माप ओलांडतानाच डोळ्यात टचकन पाणी यावं इतकं जाणवलं तिला . बोलक्या स्वभावामुळे आणि भरल्या घराच्या ओढीमुळे सासरच्या गर्दीचा एक भाग व्हायचा तिचा नेहमीचा प्रयत्न . हो …… गर्दीच म्हणावी लागेल . प्रेमाने बांधलेलं असत ते कुटुंब आणि नुसतेच एका छताखाली कुठल्याही जिव्हाळ्या शिवाय जमा होते ती गर्दी . 

नवऱ्याच्या नोकरीच्या निमित्ताने वीणा सासरच्या मूळ घरापासून लांब राहते . तसं पाहील तर ८ दिवसांपेक्षा जास्त ती कधीच सलग नाही राहिली तिथे . पण आईच घर सोडून आल्यावर हेच आपलं सर्वस्व मानणाऱ्या वीणाला नवीन घरात एकरूप होण्यापासून कुटुंबात नसणारा जिव्हाळा आड येत राहिला .  आपुलकीने कधीच कुणी विचारपूस नाही करत तिची . तीच करत राहते जमेल तसे फोन घरी , तिची गरज म्हणून . भरल्या घरात वाढलेली मुलगी . आपल कुटुंब भरायला पाहते नेहमी आणि हाती पडते ती निराशाच . तिच्या आपलेपणाची परतफेड म्हणून ही जाऊ दे पण दुधावरच्या सायीलाही प्रेम उत्पन्न होऊ नये कोणाला ? याचंच आश्चर्य वाटत राहत नेहमी तिला . 

हृद्य पिळवटून टाकणार दुःख होवो नाहीतर गगनचुंबी आनंद , हे सगळ वाटून घेणार मोहन हा एकमेव व्यक्ती आहे तिच्यासाठी . मोहन …… तिच्यावर तिच्यापेक्षाही जास्त प्रेम करणारा तिचा नवरा . त्याच्याकडे पाहून ती हे सगळे वार हसत पेलत राहते . "बसं ……. प्रेमाचा हात त्याने माथ्यावर ठेवलाय म्हणून मी कुणा दुसऱ्याच्या प्रेमळ नजरेचीही अपेक्षा नाही केली कधी " वीणा नेहमी म्हणते . नजर लागण्याजोगा जोडा . 

हे त्या दोघांमधील प्रेम मला ओळखीच म्हणूनच मी विचारलं तिला  " वीणा …… मनाची इतकीच घालमेल होतेय तर बोल एकदा मोहनशी . बंर वाटेल तुला जरा . तुला समजावण्याची ताकद फक्त त्याच्याच प्रेमात आहे बघ "

"बोलले ग मंदाताई . तो तरी किती समजावेल मला ? आज इतकच म्हणाला ."
 "वीणा , कुणाकडूनही अपेक्षा करणे नाही. तुला जे काही हवं असेल ते माझ्या जवळ माग . आणि तू तरी  अशी किती दिवस राहिली आहेस त्या घरी "

आता मलाही कळेना तिला वाईट काशाच वाटतंय ? प्रेम उधळणारा नवरा आहे की जोडीला . 

यावर तिने जे काही स्पष्टीकरण मला दिलं त्यातून मुलीला सासर कित्ती महत्वाच वाटत हे अजून एकदा कळल मला आज'. तीच म्हणन हेच

" मंदाताई , आपण लग्न कशासाठी करतो ? नवरा मिळावा म्हणून कि सासर मिळाव म्हणून ? मला नवरा तर मिळालाय …. पण सासर नाही . मी तरी अजून किती दिवस असं एकतर्फी प्रेम करत राहणार ? कुणाचही मन असो . प्रेमाच्या परतफेडीची अपेक्षा प्रत्येकाला असते. आणि मोहनच्या त्या एका वाक्याने मन चिरत गेलं ग माझं . 'तू तरी अशी किती दिवस राहिली आहेस त्या घरी ' . 

मंदाताई , मोहनसाठीच त्याच्या बरोबर त्याच्या सोबतच सावली सारखी फिरायेत ना ग मी ? आणि प्रत्येक वेळी प्रेम हे सहवासानेच उत्पन्न होण गरजेच नाही . मी नात्याने कुणीच नाही का माझ्या घरच्यांच्या ? शेवटी कसय …… मी मुलगी पडले ग . पुरुषांना असे प्रश्न फार सहज सोडवता येतात . भावनांचा गुंता त्याच्या जागी निसर्गानेच कमी जन्माला घातलेला असतो . मुलीने एकदा एखाद घर , एखाद माणूस आपलं म्हटलं की त्याची पाळमूळ फार घट्ट गेलेली असतात . प्रेमाचा हा गुंता इतक्या सहज सुटणारा नसतो . 

माणसांना जीव लावला इतकाच काय तो माझा दोष " 

मनातलं बोलून ती शांत झाली . डोळ्यातला पाऊस एव्हाना गालांच्या कोमलतेवर कोसळून रिकामा झाला होता . गजाआडच्या वाऱ्याच शिंपल्याच सजवलेलं अस्तित्व खरच खूप देखण आणि सुरक्षित असत . खिडकी बाहेरची वावटळ त्याला कधी पाचोळ्यासमान उडवून लावेल कुणी सांगू शकत नाही . फुलाच्या  सुगंधावर प्रेम करण हाच त्याचा गुन्हा !!!!!  




पण तो घरी नसतो तेव्हा ?

तो आहे ना . करेल तो , पाहील सगळ …… हे अगदी नेहमीचे शब्द . पण तो घरी नसतो तेव्हा ?

काहीतरी कारणाने एखाद्या दिवशी खरंच तो घरी नसतो …. घर खायला उठत राव !!!



सकाळपासून ३ वेळा तरी उघडलंच दार , माहीत आहे तो नाही येणार आज
पण मग पायऱ्या चढणाऱ्या त्याच्या पावलांचा कुठून आला आवाज ?
धुक्यापासून ते उन्ह डोक्यावर येईतोवर ८ फोन तरी झालेच की  हो करून
तरीही त्याचा तो आवाज मला असा का बसलाय घेरून ?
घर आज पहिल्यांदा इतक शांत शांत वाटतंय
२ दिवसांचाच तर प्रश्न , तरीही आठवणींच वादळ दाटतय

रोजच्या जेवणात ही आज केलाय फक्त वरण आणि  भात
कसय …… त्याच्याइतकं चवी - रवीच घरी कुणीच नाही खात
रोजच्या त्या स्पेशल डिश मागे माझा वेळ नाही पुरायचा
दिवसभर नवीन पदार्थांनी कसा स्वयंपाक कट्टा भरायचा
आज सकाळी अर्ध्या तासातच आटपल की हो दिवसभराच गाण
वाटतंय , उपाशी ठेवणार मला त्याच हे असं जाण :(

दिवस कसाही सारून जाईल , रात्र सरेल तर खरी
पिल्लू दाराशी उभारून विचारतंय "बाबा अजून कसे नाही आले घरी ?"
पंचाईत झालीये हो सगळी , बिचाऱ्याला खंर सांगताही येत नाही
मुसमुसू लागेल "जाताना बाबा मला का नेत नाही  ? "
कसातरी करून थांबवलाय … पूर डोळ्यात त्याच्या दाटलेला
डोळे बाबाच्या  वाटेवर , पतंग हातात धरून फाटलेला

रात्रीचा दुधाचा पेलाही थांबलाय बाबाच्या घोटासाठी 
अन कपाळावरचा गोड पापा , अजून जागतोय बाबाच्या ओठासाठी 
खेळून खेळून , घालून धिंगाणा , इटुकली पावलं शेवटी विसावली 
बाबाची चादर कवटाळून गच्च , गादीभर पसावली 
येईलच की २ दिवसात तो , समजावणार कोण या कृष्णाला
आठवणीने जीव कसा हा इतका कासावीस झाला  

घरी असतो तो …. कोपरा न कोपरा वसंतासारखा असतो जिवंत
सगळचं कसं थंडावलय आज , पहाटेच्या पहिल्या झुळुकीलाही त्याच्या नसण्याची खंत 
इतक्या पहाटे दारावरची बेल ????  तो एका दिवसातच आला परत ????
नाही रहायचंय एकट्याला मला …… म्हणाला टपोरे डोळे भरत    
तो आलाय ना , करेल तो , पाहील की सगळच ……. पुन्हा एकदा सावलीत त्याच्या शांत निवांत वाटलं 
अन हसर खेळत घर माझ , त्याच्या भरल्या डोळ्यात नटलं 






  

ती माहेरी गेली की


रात्री गच्च लावून ठेवलेला पडदा, पहाटेच्या वाऱ्याने अलगद सळसळला   
नुकतंच जन्मलेलं सूर्याच किरण पापण्यांशी जवळीक करू पाहत होत 
आजच्या दिवसाचा पहिला-वहीला, एक मोठ्ठा श्वास घेवून कवटाळल उशीला 
ती मिठी सैल होण्याआधीच,  शेजारी पडलेला फोन , तिच्या आवडीच्या तालावर वाजू लागला  
स्क्रीनवरचा तो हसरा चेहरा पाहण्यासाठीच, जणू माझा पुढचा क्षण.. क्षणभरासाठी थांबला 
आणि तिचं ते फोनवरच पहिलं वाक्य … 
" इतके मोठे श्वास नका घेत जाऊ सकाळी सकाळी . छातीजवळ कवटाळलेली  उशी दिवसभर नाही सोडायची तुम्हाला "
:)   :)
ती माहेरी गेली  …… 
          की माझं हे ' असंच ' होत   


मग सुरु होते कपड्यांची शोधाशोध , रोज कश्या ठरल्या जागी असायच्या घड्या 
सगळ आवरून आरशासमोर उभारलो तरी काहीतरी रिकाम रिकाम वाटायला लागल  
पण कळतच न्हवत  …… नेमकं काय हरवलंय माझं ?
तिने लिहून ठेवलेली चिठ्ठी , अगदी अनपेक्षितपणे … रुमालाच्या घडीत सापडली   
" बाबा , पिल्लाचा गोड गोड Bye राहिलाय गालावर . 
भरपूर दिवस पुरेल इतका साठवून ठेवलाय त्याने मधाच्या बरणीत . 
रोज एक चमचा … न चुकता , पिल्लासाठी "
:)   :) 
ती माहेरी गेली  …… 
          की माझं हे ' असंच ' होत    

पाठीला Bag अडकवून दारापर्यंत गेलो , पण पावलं काही पुढे हलेनात
इतक्या शांतपणे घरून निघायची सवयच मोडली होती ना …. ती घरात आल्यापासून 
किल्ल्यांच्या जुडग्याजवळ तिने बांगड्या अडकवल्या होत्या , तिच्यासारख्याच मंजुळ किणकिणल्या 
आता जरा बरर वाटलं .  सकाळ पासून खायला उठलेली शांतता मोडली तिने  
" अहो , संध्याकाळी लवकर या . मी वाट पाहतेय " जणू  कुणीतरी हात उंचावून सांगत होत
पायऱ्या उतरत , छानसं हसून … मी ही नेहमी प्रमाणे " हो … " म्हटलं 
:)   :)
ती माहेरी गेली  …… 
          की  माझं हे ' असंच ' होत  


बसची पायरी चढताना आठवलं …. अरे रे , आजही विसरलो भिशितले सुट्टे आणायला 
खरंतर होत लक्षात , पण …… नाही उघडावी वाटली आज भिशी पिल्लाची :( 
म्हटलं जाऊ दे…… मोडावी एखादी नोट . पिल्लाचं मन कशाला मोडा ?
जाताना सांगून गेलाय ना …… " बाबा , बेबी आणायचं आहे . संपवू नका माझे पैसे :) "  
तोवर तिचा मेसेज 
" एक तिकीट माझ्याकडे उरलं होत. तुमच्या उजव्या खिशात ठेवलंय. 
माहीत होत मला …… नाही घेणार तुम्ही पिल्लाचे "
:)   :) 
ती माहेरी गेली  …… 
          की माझं हे ' असंच ' होत


शेवटी न राहवून अजून एक फोन केलाच तिला …… 
"अर्धा तासही नाही निघत आहे मला एकट्याला . 
कसा राहणार इतके दिवस ? तुझ्याशिवाय  :( "
एक मुल पोटात वाढवलं की सगळ समजवायची ताकद येते मुलीला , हेचं खंर 
पाचचं मिनिट बोलली माझ्याशी … पण बसमधून उतरताना आता एकट वाटत न्हवत
ओळखीचे वाटायला लागले , आजूबाजूच्या गर्दीतले चेहरे 
आणि ऑफिस संपेतोवर दिवसभर, मी घड्याळाकडे लक्ष ठेवून होतो 
दाराच्या चौकटीला रेलून , बांगड्यांचा आवाज करत 
कुणीतरी माझी वाट पाहत उभं होत …… दिवसभर 
:)    :)  
ती माहेरी गेली  …… 
          की माझं हे ' असंच ' होत   



एक प्रवास ..... जगाच्या पाठीवर


२ वर्षे १३ दिवस उलटून गेले या गोष्टीला . पण अजूनही आठवण आली की शहारून येत अंग. ' विसरणं निव्वळ अशक्य ' च्या यादीतील ही एक घटना .  

टर्मिनल २ गेट नंबर ५ …… बोर्डिंग पास हातात गच्च धरून शेवटचं एकदा दाराकडे पाहील . पहिलाच श्वास कंठापर्यंत येवून थांबला . आई बाबा इवलासा चेहरा करून माझ्याकडे पहात होते . डोळ्यातलं पाणी लपवायचा होईल तितका कसोशीचा प्रयत्न सुरु होता त्यांचा . मला सासरी  पाठवतानाही इतकी घालमेल नसेल झाली त्यांची . पण दोघानाही आज काहीही सुचत न्हवत. बाबा तर नजरेनेच मला धीर द्यायला पहात होते . इतका मोठा प्रवास , एकटीने करायचा आणि तो ही दीड वर्षाच्या चिमुकल्याला घेऊन ……. 

मोठ्या दिरांनी काचेमागुनच हात हलवून निरोप घेतला . दीर कसले …… मित्र जास्त आहेत माझे . पापणी ही हलत न्हवती त्यांची आम्हाला जाताना पाहून . त्यांची ही अवस्था मी प्रथमच अनुभवत होते . दोन पावलं चालून पुढेही यायचं धाडस नाही झाल त्याचं . मी ही जबरदस्ती हात उंचावून निरोप घेतला . पिल्लाला हाताला घट्ट धरलं आणि पटापट आतल्या दिशेने चालायला लागले . शक्य तेवढ वळून पाहणे टाळत होते . कारण माहीत होत , मी जर आत्ता परत वळून पाहील आली बाबांच्या डोळ्यात पाणी दिसलं तर मला एकही पाऊल पुढे टाकायला होणार नाही . आईच्या हुंदक्याची रेष ओलांडयाची शक्ती माझ्यात न्हवती . आणि टाचा उंचावून पिल्लाकडे पाहणाऱ्या दिराचा पुन्हा एकदा हात उंचावून निरोप मला नसता घेता आला .  

आदल्या दिवशी आईच्या घरी भेटायला आलेल्या मैत्रिणीने केलेला प्रश्न … " आम्रे , काहीच कसं वाटत नाही ग तुला ? सगळ्या आपल्या माणसाना सोडून जाताना इतकी कशी शांत राहू शकतेस तू ? " … उत्तर देण टाळण्यासाठी दिलेलं खोट स्मितहास्य मला आठवलं . कोपऱ्यात बसून रडून रडून डोळे लालबुंद करून घेतलेल्या लहान बहिणीचा रागाचा स्वर …. "दीदी , रडू कसं  नाही ग येत तुला ? आठवण नाही का ग येणार आमची तिकडे ? खरंच इतकी वाट पहात होतीस या दिवसाची ? " :) आता काय देणार मी तिला या अशा प्रश्नांची उत्तरं .… बाबांचा आवंढा गिळत काळजी पोटी डोक्यावर हात ठेवत दिलेला दिलासा …. "जाशील न एकटी नीट ? घाबरणार नाहीस तशी तू माहीत आहे मला … पण तरीही काळजी घ्या बाळाची . आणि तुझीही " . 

घरातून बाहेर  पडताना आईकडे तर मी पाहिलंच नाही . इतकी धीट नाही झालीये अजून की माझ्या डोळ्यातील पाणी तिच्याही समोर वाहणार नाही . आजी , आजोबा , काका , काकी सगळ्यांना नमस्कार करून घरातून बाहेर पडताना खांद्यावर शेवटचा हात जाणवला . लहान भाऊ …… "दीदी , नीट जा . पोहोचलीस की फोन कर . तू नको काळजी करू इथली . " :) आज फार जबाबदारीने बोलत होता . माझ्या लग्नादिवशीही ह्याच्या जवळ येउन असंच बोलला होता तो "भाऊजी , काळजी घ्या तिची . " 

माझी पावलं जसजशी  गेट च्या दिशेने चालायला सुरु झाली तसं हे सगळ डोळ्यासमोरून झर झर …. सरकून गेल आणि माझ्या  बद्दलच्या सगळ्या समजुती खोट्या ठरवत अश्रू मोकाट झाले होते .  शेजारी बसलेल्या ६० एक वर्षांच्या आजोबांनी विचारलं "बाळ , पहिल्यांदाच जाते आहेस का घरापासून दूर ? " त्यांची नजर चुकवत  , पिल्लापासून लपवत "हो…. " म्हणत डोळे पुसले गडबडीने . आई रडतेय कळल तर हा चिमुकला ही सुरु होईल रडायला हाची भीती 

जस जसं विमानाने जमीन सोडली तशी मनात जाणवणारी पोकळी वाढायला लागली . कुठेतरी अधांतरी लटकतोय आपण , जमीन सरकलीये पाया खालची ही  भावना . थोड्या वेळा पूर्वी आजोबांनी विचारलेल्या प्रश्नाने डोक्यात थैमान घातलं . खरंच आज मी घरापासून दूर जातेय ? हजार फुटांवरून खाली पाहिल्यावर माझ्या घराचा एक कोपराही दिसेना मला . पण मग मी जातेय ते ही माझंच घर आहे की . एका घरापासून दुसऱ्या घराकडे 

पण हा प्रवास जीवघेणा होता . पहिलं घर , माणस सगळ सगळ मागे पडलं होत . आणि दुसर अजून बरंच लांब होत. 

पिल्लाला छातीशी कवटाळून बराच प्रयत्न केला झोपण्याचा पण काही केल्या डोळा लागलाच नाही . ११ - १२ तासानंतर ढगात वाटणारा अधांतरीपणा कमी झाला . हिरवळ , थोडा बर्फ , उंचावरून झार्यासारख्या दिसणाऱ्या नद्या … आत्ता कुठे काहीतरी नजरेस पडायला लागलं होत . जीवात जीव आला . डोळ्यातील पाणी हलकेच टीपत सगळ्यावर एक स्वच्छ नजर टाकली . नवा निसर्ग , नवीन देश , भरभरून वाहणाऱ्या नद्या …… त्या ही माझ्याच सारख्या वाटल्या . रिसीव्ह करायला येणाऱ्या सागराच्या ओढीने वेगात वाहणाऱ्या  

" अहो " आमच्या येण्याआधीच विमानतळावर पोहोचले होते . लेकाच्या ओढीने जीव कासावीन झाला होता बाबाचा . दीड वर्षाचं पिल्लू आपली आपली सामानाची bag हौसेने ओढून आणतंय हे पाहून फार कौतुक वाटलं ह्यांना . दोघेही एकमेकांना धावत येउन बिलगले . काल आई बाबांना सोडून  येताना जे चित्र होत बरोबर त्याच्या उलट हे चित्र . ह्यांना पाहून माझ्या डोळ्यात पुन्हा एकदा पाणी आलं . कुशीत शिरून आत्ता मनसोक्त रडून घेतलं .  

हाताची मिठी घट्ट करत ह्यांनी विचारलं "आठवण येतेय का घरच्यांची ? "  ज्याचं उतरं मला त्या दिवशी देता आलं नाही . डोळ्यातून वाहणाऱ्या पाण्याकडे पाहून ह्यांनी जे समजायचं ते समजून घेतलं . आणि या  गेल्या २ वर्षात दर वेळी हे अन्नुतरीत पाणी समजून घेतलं . 

हे सगळ आठवण्याचं कारण एकच …… सहज डोक्यात विचार आला , हा प्रवास उलटा करण्याची वेळ आली तर ह्यापेक्षाही अवघड जाईल कदाचित :)

गणपती बाप्पा …… बळ दे रे पुन्हा एकदा

View Facebook Comments

तूच माझा valentine





नमस्कार !!!

कदाचित तुम्ही मला ओळखत असाल . पण तरीही मी माझी ओळख करून देतोच … कसं आहे, ओळख असलेली बरी . कधीतरी अचानक तुमची अन माझी भेट झाली तर " तू कुणाचा रे ? " असं नको ना विचारायला कुणी

मी ( यांना नाव सांगू कि नको माझं) ……… जाऊ दे नाव कशाला हवंय तुम्हाला ???  मी माझ्या आईचं लाडकं पिल्लू आणि बाबांचा ठोंब्या . इतकीच ओळख माझी :) पुरेशी आहे ना ??  
वयानी थोडा लहानच आहे मी . तीन-साडेतीनच वर्षांचा आहे पण मला बडबड करायला आवडते .आईच तोंड दुखायला लागलय माझ्या प्रश्नांची उत्तरं देऊन देऊन म्हणून म्हटलं आज जरा तुमच्याशी बोलावं  .

मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे …… हो पण कंटाळणार नसाल तरंच बंर का . सांगू ??? 

आज मी एकदम खुश आहे …. म्हणजे किती माहित आहे का ? एवढा (…. ) या बॉल एवढा , नाही अजून जास्त त्या ……. ढगाएवढा… खूप म्हणजे खूप म्हणजे खूप जास्त  …… आभाळाएवढा . 

आता विचारा " का खुश आहेस ? " विचारा ना ……राहू  दे मीचं सांगतो तुम्हाला

गेल्या काही दिवसांपासून मला स्वतःलाच थोड मोठ झाल्यासारख वाटतंय . हो थोडंच बंर . जास्त मोठा झालोय असं सांगितलं तर लगेच एखादी गोष्ट सांग पाहू आम्हाला किंवा कविता म्हणून दाखव , तुझं नाव लिहून दाखवं अशी प्रात्यक्षिक करून घ्याल माझ्याकडून . म्हणून थोडं ..च मोठ झाल्यासारखं वाटतंय असं सांगतोय 

आता यालाही एक गोड गोड कारण आहे . दादा म्हणणारी बहीण आलीये ना आता मला . .
अहह… अहो नाही नाही माझ्या घरी नाही काही , माझ्या मावशीच्या घरी . कित्ती छोटी आहे माहिती आहे का ती ? तिला अजून दातच आले नाहीत . शू शू पण पँट मधेच करते ती .बोलताही नाही येत तिला . पण मी फोनवरून हाक मारली की काहीतरी बोलायचा प्रयत्न करते . मावशी म्हणते ती "दादा …. " म्हणते . असेल बुवा , फक्त मावशीलाच कळते तिची अ , उ ,आ ,ए  ची भाषा . हो पण ही डॉक्टर काकांकडून ही बहीण आणून बरेचं दिवस झाले आता . मी खुश असायचं कारण वेगळंच आहे हो …

आता मी दादा झालो म्हटल्यावर थोडं शहाण्यासारखं , मोठ्या सारखं वागलं पाहिजेच ना . तर आता मी मोठा झालोय . त्यामुळे मोठ्या दादासारखं वागायला पाहतोय . स्वतःच्या हाताने पोळी भाजी खातो . चमच्याने भात खातो ( अहो हाताने खाल्लं की माझ्या टीचर स्पूनने खायला शिकवतात ना म्हणून ) . काल आईला सांगितलं संत्र्याचा ज्यूस नको करत जाऊ आता . मी सोलून खाईन आपल्या हाताने . :) 

शाळेतही  माझ्या माझ्या सायकल वरून जातो . ती सायकल हो …… त्यावर उभं राहून एका पायाने चालवायची असते ती . माझ्या शाळेत सगळे फ्रेंड्स अशीच सायकल घेऊन येतात . पाठीला दप्तर लावून बर्फातून वाट काढत काढत सकाळी सकाळी शाळेत जायला मज्जा येते . आई माझ्या कडेकडेने रस्ताभर पळत असते तेव्हा खूप गोड दिसते . 

मी आणि माझा बाबा तसे आम्ही रोजच एकत्र बाहेर पडतो जायला पण बाबा  ऑफिस ला जातो आणि मी शाळेत . दोघेही सायकलवरूनच . बाबाची सायकल मोठी आहे . बाबाएवढीच. कधी कधी मलाही फेरी मिळते या सायकलची पण फक्त सुट्टी दिवशीच . 

पण आज काय झाल माहित आहे ??????  माझा बाबा त्याची सकाळची ऑफिसची मिटींग रद्द करून माझ्यासोबत शाळेपर्यंत आला . म्हटला "चल , आज रेस लावू दोघे . कोण पहिला येईल तो मोठा . " 

कित्ती बरं वाटलं मला . खूप खूप वेगात चालवली आज सायकल मी . बाबाला हरवायचं होत ना . इतका मोठा आहे माझ्यापेक्षा पण माझ्या इतकी वेगात नाही चालावता येत त्याला त्याची सायकल . फार मागे पडला होता माझ्या . आणि मी पहिला पोहोचल्यावर मागे उभा राहून जोर जोराने टाळ्या ही वाजवत होता :)

बाबापेक्षा पुढे गेल्यावर मला खूप मस्त वाटल , कळल जिंकल्यावर कित्ती छान वाटत ते . …… मावशीने बाळ आणल्यावर वाटलं होत त्यापेक्षाही जास्त …

तेवढ्यात  मला काहीतरी आठवलं …… रात्री आई बाबा valentines day की काय असं काहीतरी बोलत बसले होते . मला काही फारसं कळल नाही त्यातलं पण मी आईला विचारलं " valentines day म्हणजे काय ग आई ?  काय करायचं असत ? " मग तिने मला हेच सांगितलं की जर आपल्याला कुणी खूप खूप आवडत असेल म्हणजे कित्ती माहिती आहे का ?? त्या …. ढगाएवढ तर मग आपण त्याला सांगायचं की तू मला खूप आवडतोस आणि जर वाटलंच तर छान छान फुलं द्यायची ….   बस एवढंच  

माझ्या आई बाबांचा असा एक फोटो आहे माझ्या घरी … पाहिलाय एकदा मी . बाबा फार आनंदात दिसत होता त्या फोटो मध्ये . पण आज त्यापेक्षाही जास्त आनंदात दिसत होता आज . माझ्याबरोबरची रेस हरून सुद्धा . मला जरा गंमतच वाटली .

बाबा टाळ्या वाजवत होता तेव्हा मी धावत त्याच्याकडे गेलो . त्याच्या शर्ट ला धरून त्याला खाली ओढलं . आणि हळूच कानात सांगितलं  " बाबा …… तू मला खूप आवडतोस . तूच  माझा valentine. आज आपल्या दोघांचा फोटो काढू . " आणि एक गोड गोड पाप दिला .

कित्ती आनंद झाला म्हणून सांगू  बाबाला……. त्याने मला वर उचललं आणि आभाळभर गोल गोल गोल गोल फिरवल . कित्ती छान वाटलं . जणू काही मला आज उडताच येत होत त्या पक्षासारख . आभाळाला हात पोहोचतात का हे बघत होतो मी .

आणि गम्मत म्हणजे खरंच आज हात आभाळाला पोहोचला …… बाबाने वर उडवलं तेव्हा :)

माझा बाबा मला त्या आभाळाएवढा आवडतो……

या ३ वर्षात त्याने मला ३००० वेळा तरी सांगितलं असेलच कि मी त्याला कित्ती आवडतो ते …… पण आज मी पहिल्यांदा सांगितलं त्याला आणि आभाळातला पाउस त्याच्या डोळ्यात उतरताना पहिला . आणि आईच्या डोळ्यातून तो कोसळताना    :)

शाळेतून घरी आलो तर माझ्या खेळण्यांची टोपली गुलाबाच्या फुलांनी भरली होती . आणि बाबा ऑफिसला दांडी मारून घरी माझी वाट पाहत होता .  

View Facebook Comments




रघु - भाग ३

रघु - भाग १

रघु - भाग २




नवीन घराच्या वास्तुशांतीचा मुहूर्त होता त्या दिवशी . सगळ अगदी साधेपणाने चालू असलं तरी लगबग ही होतीच . गंगा आजी एका कोपऱ्यात बसून इलाश्याच्या बायकोला सगळ्या रिती सांगत होती . घर उभं करण्या आधी इलाश्याने एक गायही घेतली होती . याच कारण एकचं, रघुला घरचं ताजं ताजं दुध मिळावं . नवीन घराच्या परसदारी त्या गायीचा गोठा . 

सगळी पूजा - अर्चा  आटोपल्यावर गंगा आजीने इलाश्याच्या बायकोला गायीचा नैवेद्य भरायला सांगितला . केळीच्या पानावर एका बाजूला तूप भाताची मुदी , वरून जाडसर वरण , सुगरणीच्या हाताच्या कापसाहून मऊ लुसलुशीत पुरण पोळ्या , बेदाणे घालून केलेली शेवयाची खीर , तोंडी लावायला आंब्याच लोणचं , आमसुलाची चटणी , पापड , नेहमीप्रमाणे नैवेद्यात ठरलेली बटाट्याची भाजी , जोडीला मटकीची उसळही , काकडीची कोशिंबीर …… अगदी व्यवस्थित नैवेद्य भरला होता तिने . कुणालाही जेवायला बसायची इच्छा व्हावी असा जेवणाचा बेत. 

एका हातात नैवेद्याचं पान अन दुसऱ्या हातात पळीपंचपात्र , डोक्यावरचा पदर सावरत ती गायीचा नैवेद्य घेऊन जायला निघाली. पायऱ्या उतरून खाली आली तोच तिच्या लक्षात आलं की तिने चुलीवर दुध गरम करत ठेवाल होत . आल्या वेगानेच ती परत चुलीजवळ धावली पण ती जायीतोवर निम्म्याहून जास्त दुध उतू गेल होत . गंगा आजी समोरच बसली होती पण तिने भांड उचलून बाजूला केलं नाही . का ? हे रघूच्या आईलाही कळेना . 

शेवटी तिच्या चेहऱ्यावरच्या   प्रश्नाचं उत्तर देत गंगा आजी म्हणाली "पोरी नवीन घर बांधल आहेस . नवा संसार आहे . ज्या चुलीने इतका गोड घास दिला पहिले तिला तृप्त करावं . कधी काही कमी पडत नाही . आणि तसही शुभ कामावेळी दुध उतू जाण चांगल असत असं म्हणतात . काहीतरी चांगली बातमी घेऊन नशीब तुझी वाट बघत बसलंय " . रघुची आई नुसतीच हसली . तिला हे सगळ मनापासून पटलं होत आणि मनातल्या मनात देवाचे आभार मनात होती . 

घरात जेष्ठ व्यक्ती असण याच कारणासाठी महत्वाच असत . या अशा गोष्टी फक्त त्यांनाच माहित असतात . आपण जितका आपल्या भल्याचा विचार करतो त्याहूनही जास्त ही मोठी लोकं आपल्यासाठी प्रार्थना करत असतात . असं म्हणतात की आई बाबाची पुण्याई मुलांच्या कमी येते हे कदाचित खरंच असेल आणि ते ही यामुळेच . 

उतू गेलेल्या दुधाकडे समाधानाने पाहत नैवेद्याचं ताट हातात घेऊन ती गायीच्या गोठ्याकडे निघाली . गाय , गोठा , ताजं दुध या सगळ्या गोष्टींची किमया फक्त त्यालाच कळते ज्याने ती अनुभवली आहे . सकाळी सकाळी ऐकू येणारा गायीचा हंबरडा , तिच्या शेणाने रोज सरावल जाणार अंगण , त्यावर उठून दिसणारी ती सुरेख , देखणी , पांढरी शुभ्र रांगोळी . गायीला चारा घालताना तिच्या डोळ्यात दिसणारा आपलेपणा , प्रेम . रोज दुध काढताना तिच्याशी चाललेल्या गप्पा , अंघोळ घालताना पाठीवरून हात फिरवल्यावर एक वेगळ्याच प्रकारे हलणारी तिची त्वचा ……सगळ अगदी जवळून पाहील्याशिवाय न उमगणारी गोडी . तिला थोड्या दिवसांनी जनावर म्हणायलाही जीभ धजत नाही इतकी मिसळून जाते ती आपल्या कुटुंबात . कुटुंबाचा एक सदस्य बनून जाते 

याचं गायीला  रघुची आई रोज चार घालायची . ती खाई तोवर मायेने पाठीवरून हात फिरवत रहायची .देत होती  रघूची आई चारा घेऊन येताना दिसली की ही गाय हंबरायला सुरु करायची . पण आज चित्र वेगळच होत . रघुची आई येताना दिसली तरी तिने तिच्याकडे पाहून अगदीच दुर्लक्ष केल्यासारखी मान वळवली . कारण काय समजावं म्हणून नैवेद्याचं ताट हातातच घेऊन रघुची आई गोठ्यात पाहण्यासाठी खाली वाकली आणि तिने जे काही पाहिलं त्यानंतर तिला काहीच सुचेना . 

महिन्या  - दीड महिन्याच एक गोंडस कन्यारत्न गायीच्या शेपटाशी खेळत गोठ्यातल्या भाऱ्यावर निवांत पडून होत . अन ती गाय तिला उन्हापासून आडोसा  
देत होती. कुणाचं होत ते बाळ , कुणी आणून ठेवलं काहीच समजल नाही .   

पण त्या दिवसापासून रघुला एक बहिण मिळाली - भद्रा … गोठ्यात सापडली म्हणून तिचं हेच नाव ठेवल गेल . बेटी  म्हणजे धनाची पेटी याचाही प्रत्यय आला इलाश्याला . घर , शेत  सगळ दुध दुभात्यान , धान्याच्या राशीने भरून गेल   

दोन्ही मुलं नावारूपाला आली . आता दोघे मिळून एक संस्था चालवतात . ज्या वयस्कर लोकांकडे त्यांच्या मुलांनी तोंड फिरवलं अश्या लोकांना आसरा म्हणून आणि ज्या लहानग्यांना आई वडील म्हणजे काय हे कळायच्या आधीच दुरावतात त्यांना कुटुंब म्हणून . 

माळावरच्या झोपडीच एका मोठ्या इमारतीत रुपांतर झालाय . आणि त्या झोपडीत जन्माला आलेला त्या इमारतीत जवळ जवळ पन्नास लोकांच कुटुंब चालवतो . गळ्यात एक डोरलं, पाठीचा ताठ कणा  आणि मनगटात बळ इतकचं सोबतीला घेऊन सुरु केलेल्या संसाराला समाधानाची फळ लगडलेली असतात . आता इलाश्या , त्याची बायको आणि गंगा आजी तिघे मिळून मुलांच्या प्रगतीची प्रार्थना करतात . 

।। इति श्री रघु कथा संपूर्णम ।।

:) 

तुम्हा सर्वाना आवडली असेल ही अपेक्षा …  





रघु - भाग २

रघु - भाग १


संध्याकाळची दिवेलागणीची वेळ  , पाऊस तर नुसता धो धो कोसळत होता . कोपऱ्यावर एक वयस्कर बाई कंदील घेऊन उभी .  पाय मोकळे करायला म्हणून बाहेर पडली आणि पावसात अडकली .  दूरवर एका झोपडीत तिला बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला . पण कुणीही दिसेना .

झोपडीच्या एका फटीतून थोडासा प्रकाश दिसला . वात विझण्याच्या वाटेवर होती . हातातला कंदील वर करून तिले पाहायचा प्रयत्नही केला पण तेवढ्यात ती वाऱ्याशी भांडत इतका वेळ तग धरून बसलेली वातही विझली . काळाकुट अंधार , माळाच्या दुसऱ्या टोकाला एखाद्या कुत्र्याचा आवाज . बसं … बाकी कुणीच नाही .

म्हातारीला काय करावं सुचेना . पुढे जाऊन पहावं तर भितीने हात कापायला सुरु झाला . अन काही ऐकलंच नाही असं समजून पुढे रस्ता धरावा तर लेकराचा आवाज मागे तिला ओढत होता . बराच वेळ ती नुसतीच बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकत उभी राहिली . माळावरच्या भुताखेताच्या बऱ्याच गोष्टी आजवर ऐकल्या होत्या त्या वय झालेल्या कानांनी .  कुणी सांगावं खऱ्या असतीलही …… की खरंच कुणा तान्ह्या जीवाचा हंबरडा असेल हा .

शेवटी न राहवून तिने झोपडीच्या दिशेने पहिलं पाऊल धाडसाने उचललं . इवल्याश्या कंदिलाच्या प्रकाशात तिला पायाखालचा रस्ताही धड दिसत न्हवता . हळू हळू थोडा अंदाज घेत ती झोपडीच्या दाराजवळ येउन थांबली आणि बाहेरूनच आवाज दिला "कुणी आहे का आंत ??? का रडतंय बाळ इतकं ? " . पलीकडून कुणीही उत्तर देईना .

कंदील कानाजवळ येईल इतका वर करून तिने झोपडीचा मोडकळीस आलेला दरवाजा उघडला आणि सोमर हे पाहून ती दारातच थांबली . नुकतंच जन्माला आलेलं एक लेकरू अन त्याची माय एकमेकांना बिलगून बसले होते . त्या मुलाचा बाप म्हणवणारा गडी , लेकराला आणि बायकोला आडोसा देऊन उभा होता . कोसळणाऱ्या पावसापासून बचावं करत . तिघेही थंडीने कपात होते . त्या मुलाच्या अंगावर तर एक फाटकी चिंधी कापडही न्हवत . चार ठिकाणी ठिगळ लावलेल्या साडीच्या पदराने त्या माउलीचा त्याला कसबस लपेटून घ्यायचा एक अयशस्वी प्रयत्न सुरु होता .

म्हातारी हे पाहून हबकलीच . आजच्या जमान्यात कुणा तान्ह्याचा जन्म असाही होऊ शकतो ? जन्माला आल्या आल्या जगण्यासाठी लागणाऱ्या उबीसाठीही  संघर्ष करावा लागावा . कसलं नशीब घेऊन जन्माला घातलंय वरच्याने याला . पण पुढच्याच क्षणी ती त्याच्या जवळ गेली . अंगात घातलेलं स्वेटर काढून तिने त्या मुलाच्या अंगावर लपेटलं . हातातली काठी समोर उभ्या असलेल्या , म्हातारीकडे आश्चर्याच्या नजरेने पाहणाऱ्या बापाकडे दिला . वेदनेत कन्हनाऱ्या  त्या आईला आपल्या थरथरनाऱ्या हाताने आधार देत उभी केली . बाळाला कुशीत घेतलं आणि एवढंच बोलली "चला . माझ एवढ मोठ घर रिकाम पडलेलं असताना या मुलाला मी पावसात नाही सोडणार "

मुलाचा बाप तिच्यासमोर हात जोडून उभा राहिला . ते पाहून ती म्हणाली "बाबा रे …… एका मुलाचा बाप आहेस आता तू . हात जोडून काय उभा आहेस . छाती आनंदाने भरून आली पाहिजे ." हा हात जोडून उभ राहिलेला ईश्वर म्हणजे  इलश्या. आई वडिलानंतर आयुष्यात पहिल्यांदा कुणासमोर तरी हात जोडून , मन खाली घालून उभा होता .   

म्हातारीने ईश्वरच्या लेकाला आपल्या घरी नेलं . कडकडीत पाण्याने अंघोळ घातली . आपलं वापरून मऊ झालेलं लुगड चारपदरी अंथरून त्यात त्याला गुंडाळून त्याच्या आईच्या कुशीत झोपवल . स्वतःचा पलंग त्या दिवसापासून तिने ईश्वरच्या बायकोला देऊन टाकला . " बाळ झाल्यानंतरच्या विश्रांती साठीचा पलंग आईने द्यायचा असतो . म्हणून हा माझ्याकडून तुला ग पोरी " म्हणत तिने न कळत एक नवीन नातंही जोडून टाकलं . 

 पेठ्यारात कुठेतरी जपून ठेवलेला एक सोन्याचा जुना तुकडा काढला . चमचाभर मधात बुडवून तिने त्या सोन्याच्या तुकड्याने बाळाच्या जिभेवर ॐ काढला .  म्हणे असं केल्याने बाळाच्या वाणीवर आयुष्यभर सरस्वती वास करते . :)  बाळाच्या तोंडात पाण्याचा पहिला घोट या म्हातारीने घातला म्हणून तिचं  नाव गंगा आजी

त्या दिवसानंतर जवळ जवळ २ वर्ष ईश्वरच कुटुंब गंगा आजीच्या घरीच राहत होत . ईश्वर आणि त्याची बायको दोघेही दिवसभर पाटलांच्या घरी कामासाठी जायचे . तेव्हा या गंगा आजीनेच सांभाळ केला त्याच्या मुलाचा . " रघु " हे नावही तिनेच ठेवलंय .   रघु - म्हणजे भगवान श्रीरामाचे कुटुंब . रघुच्या जन्मावेळी त्याचे माय बाप झोपडीत राहायचे म्हणून गंगा आजीने त्या श्रीरामाच्या कुटुंबातील गोंडस पिल्लाला रघु हे नाव दिलं .  

पुढे पाटलांच्या मदतीने इलश्याच गावात एक छोटस घरही झालं . रघु तेव्हा जेमतेम ३ वर्षांचा होता . गंगा आजीच्या हाते त्या घराच्या पायाभरणीची पूजा झाली म्हणून इतकी भरभराट झाली असं इलश्या  आणि त्याची बायको अजून सगळ्या गावाला सांगतात .   

क्रमशः ………  





रघु - भाग १

Anuvin-Siddheshwar03


पायातील पायतानाचा कर्र…. कर्र आवाज करत रघु घराबाहेरच्या कट्ट्यावर येउन बसला . तोंडाला लावलेला पाण्याचा तांब्या त्याने तो संपल्यावरच खाली ठेवला . एवढा मोठा कांदा एका बुक्कीत फोडून चुलीवरच्या गरम भाकरी सोबत खायलाही सुरु केला . 


हो...... पण रोजच्या प्रमाणे न चुकता पहिला घास गंगा आजीला . :)

चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कधी खोट बोलत नाहीत . गंगा आजीचा तो सुरकुतलेला चेहरा सांगायचा त्या एका घासातल समाधान . 
इतका मोठा झाला तरी रघुच्या गालावरून हात फिरवत गंगा आजीने आजही कडकड बोट मोडली . अंधुक झालेल्या नजरेतूनही तिला रघुच्या कपाळावरची आठी दिसायची . त्याला असं बोट मोडून प्रेम करणं आवडायचं नाही .

म्हणायचा ……

"आज्जे कशाला माझ्या नावाने रोज बोट मोडतीस . त्या बदल्यात अजून एखादी भाकरी थाप माझ्यासाठी  . का थापू मीचं ? तुझ्या हातात आता कितीसा जीव उरलाय ?"
तो तिचा सगळा स्वयंपाक स्वतःच करून द्यायचा. हे असं रोजचं चालायचं . तिचं जेवण करून द्यायला तो दुपारी ११ च्या ठोक्याला तिच्या दारात हजर असायचा . अगदी न चुकता.

गंगा आजीची इतक्या मायेने विचारपूस करणारा गावातला हा एकटाच असावा . कारणही   होतचं म्हणा त्याला ……. 
अगदी २ दिवसांचा असल्यापासून गंगा आजीने त्याला जीव लावला . तेलाने चोळून अंघोळ , काजळाचा टिळा , रोज सायंकाळी त्या किलकिल्या डोळ्यांची , पिटुकल्या गोजिऱ्या रुपड्याची दृष्ट . .त्याला घातलेला पहिला वहीला धूप . उभ्या आयुष्यात त्याला मिळालेला एकुलता एक दागिना , गंगा आजीने दिलेला चांदीचा करदोडा

 शेजारी राहत असली तरी सख्ख्याहून जास्त माया लावली तिने . आई शेतावर गेली की त्याला स्वतःच्या घरी घेऊन येउन दिवसभर मायेने  रघुची काळजी घेणारी ही एकटीच . रघुला ना मामा होता न मावशी न कुणी जवळचा काका .  आजी आजोबांचा तर चेहराही न्हवत पाहीला त्याने कधी . तसे ते नुसते नावाचेच आजी आजोबा होते असं म्हटलं तरी काही वावग ठरणार नाही .

इलश्या , रघुचा बाबा . खरतर त्याच नाव ईश्वर होत पण पाळण्यात नाव ठेवल्यानंतर त्याला या नावाने कुणीच हाक नाही मारली . " इलश्या " सोपं वाटायचं म्हणायला,  मग तेच नाव पडलं त्याचं .

या ईश्वरालाही टाकीचे घाव सोसावेच लागले देवपण यायला .

लेकाची, रघुच्या बाबाची,  थोडी पडती बाजू आल्यावर पोटाशी कवटाळणाऱ्या आई बापाने रघुच्या बाबांना घराचा अन गावाचा रस्ता कायमचा बंद करून टाकला .

गळ्यात एक डोरलं, पाठीचा ताठ कणा  आणि मनगटात बळ इतकचं सोबतीला घेऊन त्याच्या बायकोने  सासरचा उंबरा पुन्हा ओलांडला …… परत कधीही न ओलांडण्याच्या निश्चयाने  . पुढे पाऊल टाकताना तिने अन ईश्वरने एकदाही मागे वळून पाहिलं नाही . पुढचा रस्ता अवघड होता . मागचा कधीच तुटला होता.

रघुची आईचं म्हणून नवऱ्यापाठी इतक्या खंबीरपणे उभी राहिली . बायको इतर वेळी बायको असली तरी नवरा कोलमडून पडल्यावर ती आईच्या मायेने जवळ घेते याचा अनुभव इलश्याला या काळात बऱ्याच वेळा येउन गेला . 

एक लेकरू पोटात असताना उघड्या माळावर झोपडी बांधताना नारळाच्या झावळ्या ओढून आणणारी बायको पाहीली की  इलश्याच्या पोटात गोळा यायचा . आतड तुटायचं तिची अवस्था पाहून पण त्याच्यापुढे पर्याय न्हवता .तीन दगडांची चूल मांडून सुरु केलेला नवा संसार कुठवर काठाला जाईल याची काळजी कधीच नाही केली त्या माउलीने.उन्हाळ्यात निरभ्र आकाशात रात्रभर चांदण्यात काहीतरी शोधत जागी असायची . पावसाळ्यात पावसाच्या धारा पाहत आणि थंडीच्या दिवसात इलाश्याच्या कुशीत ऊब शोधत बिलगून रहायची   

पण म्हणतात तसंच झालं . . . वाईट दिवस जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगात निघूनही जातात . प्रश्न उरतो तो फक्त आपण कितपत तग धरू शकतो हाचं. 

माळावरच्या झोपडीतही समाधानाने राहणाऱ्या  इलश्याला गावच्या पाटलांच्या शेतावर काम मिळालं . आणि त्याच्या बायकोला पाटलांच्या घरचं . अंगात रग होती ती सगळी इलश्याने कामात ओतून दिली . पाटलांच्या माळ्याला फुलवायचं काम मनावर घेतलं होत त्याने . धुणी भांडी करायची सवय असल्याने त्याच्या बायकोलाही काहीच अवघड गेलं नाही  .डोक्यावर दिवसभर छत मिळालं हेच फार होत या दिवसात तिच्यासाठी .जोडीला काम संपवून घरी येताना पाटलीणबाई काही ना काही खायचं बांधून द्यायच्या . दिवसाही काहीबाही सुरूच असायचं त्याचं आणि सगळे पदार्थ चवीला हिला आणून द्यायच्या  . तिच्या पोटातल्या बाळाचा भुकेचा टाहोचं जणू ऐकू यायचा पाटलीनीला.

ईश्वर बाभळे . या आडनावाप्रमाणेच इलश्याच्या आयुष्याची कहाणी . जी बाळाच्या जन्मानंतर पार पालटली .
असं म्हणतात की काही मुलं आई बाबाचं नशीब तळहातात घेऊन जन्माला येतात .

पाहता पाहता नऊ महिने संपले

माळावरच्या झोपडीत जन्माला आला एक चिरंजीव .

कुमार . रघु ईश्वर बाभळे .

क्रमशः.......

View Facebook Comments