जाता जाता ... काय समजायचं ?

आज  ३१ डिसेंबर ! म्हणता म्हणता अजून काही क्षणांत २०१४ ला निरोप द्यायची अन २०१५ चे स्वागत करायची वेळ येउन ठेपेल .

बरच काही घडलय या गेल्या वर्षात . खरतर घडून गेलंय ! 

अपरिवर्तनीय बदल झालेत . खूप काही शिकायला मिळालंय . समृद्ध होतानाचा अनुभव अविस्मरणीयच .

पण नेमक काय समजायचं ?

सुरवातीचा शेवट की पुन्हा नव्याची सुरुवात
विझत आलेला नंदादीप की अखंड तेवणारी वात 
नव्याने चमकणारी लकाकी की मागे टाकून दिलेली कात 
पहाटेचे किरण पहिले की सरत आलेली रात  

नेमक काय समजायचं ?

अनाकलनीय वळण की नवी पाऊलवाट
काळवंडलेल्या आठवणी की सुरुवातीचा जरीकाठ  
मनातला उसळणारा समुद्र की किनाऱ्यावर शांत झालेली लाट 
सोडून दिलेली वीण की नव्याने बसणारी गाठ 

नेमक काय समजायचं ?

मागे राहिलेली घराची सावली की पायाखालची बर्फाची नवी शाल 
खुणावणार क्षितीज की उंबरठा जो ओलांडला होता काल 
कोडी , सोडवलेली सगळी की कुणाची अजून एखादी चाल 
कुठलातरी जुना घंटानाद की आपलस करू पाहणारा अनोळखी ताल   

नेमक काय समजायचं ?

नव्याने ओळख झालेला मनमोकळा संवाद की घरच्यांशी राहून गेलेल्या गप्पा
बंद कुपीतील अत्तर की त्यासाठी उघडलेला अजून एखादा कप्पा 
नवा कोरा संकल्प की गेल्या वर्षीच्या पचलेल्या थापा
अंगणात वाट पाहणारा मोगऱ्याचा दरवळ की श्वासात जपलेला चाफा   

नेमक काय समजायचं ?

पुढ्यात मांडलेल पक्वान्नाच ताट की आईचा राहून गेलेला मायेचा घास 
गावाच्या मातीचा बेधुंद वास की सातासमुद्रावरचा नवा प्रवास 
दोन पावलांवरचा आपल्यांचा गलका की पुन्हा एकाकीपणाचा भास
कडेला बांधून ठेवलेल अनुभवाचं गाठोड की काहीतरी नवं शिकण्याची लागलेली खरीखुरी आस  

नेमक काय समजायचं हो ?

हा  ३१ डिसेंबर म्हणजे … 

थोडासा गोंधळ ,बरीचशी हळहळ
एखादी लपवलेली कळ ,आतल्या आत भळभळ 
संकल्पामागे झालेली आपली विनाकारण पळापळ :) 

 पण उद्याची पहाट अवर्णनीय …। 

नशिबाने वाढवून दिलेला  अजून एक श्वास
ओंजळीत नव्याने दरवळणारा जुनाच एखादा सुवास :) 






चिमुकल्याची शाळा ……


२५ वर्षांपूर्वीच आपल्यावेळचं गणित फारच वेगळ होत . १ ते १० अंक , २-३ कविता आणि ' बबन कमळ बघ ' हे शिशुवाचनातील पाहिलं पुस्तक न अडखळता वाचता आलं की आपल्या आई बाबांसाठी हा आपण बालवाडीत मेरीट मध्ये आल्याचा आनंद असायचा. पण आता अस नाही हो …

वर्ष पुढे सरकत गेली तसे दिवस बदलले . आता १० अंकांवर आणि २ कवितांवर काही भागत नाही . माझा मुलगा जेमतेम ३ वर्षांचा आहे . त्यावरून सांगते . तो आणि त्याच्या वयाची इतर मुले सर्वांनाच यापेक्षाही पुष्कळ काही येत हो . Nursery rhymes च अख्ख पुस्तक तोंडपाठ, प्राणी , पक्षी , अवयव , फळ , फुलं इ . यांची नावं हे अगदी ओघाने आलंच .  एखाद दुसरी स्टोरी ही सांगतात हे चिमुरडे आणि ते ही अगदी हावभावसहित. वर्तमानपत्र समोर आलं की लहान लहान शब्द वाचायचा प्रयत्न करतात . चार-चौघात गेलं की ओळख असो व नसो , संभाषण सुरु करतात . 'भाषा' हा अडसर कधीही त्यांना जाणवत नाही .

माझ्या मुलाला इथे जर्मन kindergarten मध्ये सोडताना मला हीच एक भीती होती . इतरांशी हा कसा संवाद साधणार ? पण जेमतेम ३ आठवड्यात ही माझी भिती त्याने पळवून लावली . आता घरी येउन आई बाबांना शिकवतो नवीन भाषा बोलायला . ह्याचं सगळ श्रेय त्याच्या शाळेला . जर्मन भाषा येत नाही माहित असूनही एकही इंग्रजी शब्द न बोलत शिकवण महादिव्य म्हणावं लागेल . वयाच्या तिसऱ्या वर्षी इंग्रजी म्हणजे काय हे ही माहित नसावं कदाचित मला . पण ह्याला बोलताना ऐकल की वाटत ऐकत रहावं :)  

त्याची ही शाळा म्हणजे माझ्यासाठी एक वेगळाच अनुभव आहे . भारतातील शाळांपेक्षा इथली शिक्षण पद्धती फारच वेगळी आहे . कुणालाही कमी लेखायचा इथे उद्देश नाही . पण दोन्ही गोष्टी फार जवळून पाहील्या की तुलना ओघाने आलीच . 

लिहिण्या वाचण्यासारख्या मुलांना जाचक वाटणाऱ्या गोष्टींचा इथे kindergarten शी काहीही संबंध नाही . जे काही लिहायला सुरु करायचं ते इयत्ता पहिलीपासून . kindergarten  म्हणजे आपल्या रोजच्या जगण्यातल्या गोष्टी आई बाबा घरी नसताना / कुणाच्याही मदतीशिवाय करायला शिकवणारी एक सुंदर जागा . आणि ह्याची सुरवात शाळेच्या गेट पासूनच . 

गेट स्वतः उघडणे , आपली सायकल आपण लावणे , फक्त आपल्याच ग्रुपची बेल वाजवणे . शाळेत पाऊल टाकल्यावर आपल्या कपाटातील शाळेत घालायचे शूज स्वतः बदलणे ( मला इयत्ता दुसरी पर्यंत माझ्या बुटाची नाडी बांधता आली नाही ) . जाकेट , टोपी जगाच्या जागी . आपली प्लेट घेऊन खायला dining table वरच आणि खाऊन झाल्यावर खुर्ची परत होती तशी , आपली जागा होती तशी स्वच्छ करून ठेवणे , सगळ अगदी व्यवस्थित . कुणीही सांगायला नसतानाही . म्हणजे शिस्त आणि नीटनेटकेपणा लहानपणापासून अंगात आपोआप भिनतो . 

जबाबदारी घेत यावी यासाठी इथे प्रत्येक मोठ्या मुलाला एक लहान मुलगा जोडून दिलेला असतो . त्या लहान मित्राचं अगदी सगळ ही मोठी पाहतात . गरज पडल्यास कपडे बदलतात , खायला खेळायला शिकवतात , लहानांचा खेळण्याचा पसारा आवरतात. त्यांना हाताला धरून जिन्यावरून उतरवतात . आणि हे सगळ अगदी हौसेने . प्रत्येक वर्गाबाहेर या अशा जोड्यांचे फोटो लावलेले पाहिलेत मी .   



अभ्यासाव्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी असतात इथे . वर्गातील मुलांसाठी लागणारा आठवडी बाजार ट्राफिकचे सगळे नियम पळून दुकानातून घेऊन येतात ही मुलं . त्याचा हिशेब लावताना अंकगणित आपोआप शिकतात .  स्वयंपाक घरासाठी मुली - मुल हा भेद इथे नाही . kindergarten च्या kitchen मध्ये या चिमुकल्यांना पदार्थ बनवायलाही शिकवतात . आठवड्यातून एकदा शाळेबाहेर शहरातील एखाद्या ठिकाणी खरेदी म्हणजे व्यवहारज्ञान. शाळेतील छोट्या छोट्या इवेन्ट्सची जबाबदारी म्हणजे व्यवस्थापन , स्वच्छता करणाऱ्या मुलांचा ग्रुप वेगळा , हिशेब ठेवणारे वेगळे , हजर - गैरहजर याची नोंद ठेवणार कुणीतरी एखादा . बाथरूमची स्वच्छता , फ्लश होइतोवर थांबणे , आपला इतरांना त्रास होणार नाही याची खबरदारी . आणि सगळ घड्याळाच्या काट्यावर . वेळ कुणीही मोडत नाही इथे .  आणि हे सगळ वयाच्या तिसऱ्या वर्षापासून . 

यांचे शाळेचे ड्रेस तर कित्ती रे बाबा ……. आमचा एकाच असायचा , गणवेश . त्यावर सगळ व्हायचं खेळ , अभ्यास ( इतर काही नसायचच म्हणा ) यांचा रोज बागेत जातानाचा ड्रेस वेगळा , बर्फातला वेगळा , रंगरंगोटी शिकतानाच वेगळा , चप्पलचही असच. प्रत्येक ग्रुपच चपलांच कपाट वेगळ . वर्गातून बाहेर येतात रांगेत जो पहिला असेल त्याने ते कपाट आणायचं आणि सर्वांचे चप्पल बदलून झाले की जो रांगेत शेवट असेल त्याने  नेवून जागी ठेवायचं. कुठेही गडबड नाही गोंधळ नाही . इथे कुणीही रांग मोडताना पाहील नाही मी . आई समोर दिसली तरीही माझा मुलगा रांग मोडून धावत येत नाही :) छान वाटत तो सगळ स्वतः हून करताना पाहताना .      

यांची शिक्षिका स्वतः गिटार वाजवून कविता म्हणायला शिकवते . मुलानाही म्हणायला उत्साह येतो . जो कोणी उत्तम म्हणेल त्याला आपली गिटार वाजवायलाही देते :)  माती चिखल खेळायला देतात , बर्फात खेळायला देतात , धान्यात खेळायला देतात , रंगात खेळवतात , अंघोळ करायाल देतात पण तरीही शाळेतून परत येताना मुलं स्वच्छ आणि सुंदर असतात .   

घरी आल्यावर माझा चिमुकला गणपती बाप्पासमोर डोक टेकून काय मागतो माहित आहे ???

" चांगली बुद्धी आणि भरपूर गोड गोड मित्र "

म्हणतात ना आपलं घर शेवटी आपलं असत . मला हसायला येत . जर्मनीतील मित्र मिळायला भारतातल्या देव्हाऱ्यातल्या बाप्पा समोरच वाकावं लागत. 



Unrecognized superwoman

After हाउसवाईफ this is one more post about HER .




Man may work from sun to sun , but woman's work is never done. 

Women are born to work and get unrecognized . Their domestic work , contribution towards family always remains invisible. As per what our grandpa and grandma says ....If work is blessing , do we feel same about housework ? If your answer is YES, is it a blessing for woman only ?  

Its just 5 AM and your alarm is beeping . You too need 5 more minutes sleep but you are not allowed . You too don't want to come out of your sweet dreams but you are not allowed . You are a woman.

You are in kitchen preparing a meal for your family . Your hands are working as faster as they can. You just don't want to say BYE to your husband with empty stomach and without lunch box. You are about to take a sip of tea and you hear something. Yes...... its your baby , calling you from bed. Baby is screaming for your attention. Your little angel don't want anyone other than Mom :) You are a bucket of love for him. Now you have to forget your sip of tea. .....and it happens daily. 

Your sink is overflowing with dirty utensils. Bucket of clothes is waiting for you in bathroom. You house is dirty with socks thrown here and there . By the way, you know who!!!!

It is unnoticed unless it is left undone.     

The clock is running faster than wheels of your baby's school bus. In a day you have to go to market, ,handle your husband's bank accounts,attends your in-law's medical appointments, have to take care of a man who sometimes behave like a stranger !!  and many things.  Now you are rushing back home to check on children , clean your house one more time, and trying to fix a cup of tea at least this time.

Your man will probably sit with legs up on sofa that you just cleaned , with mobile in his one hand and newspaper in other, asking you to prepare something special to eat with tea.

Society has placed value to work done outside home that is measured by salary. That work get paid and celebrated . This same society thinks a good woman should work without asking anything in return, should handle her pressures without raising her voice, without loosing her evergreen nature. 

I believe if you ask man to pay or a society to pay just negligible amount, they wont do it. Rather it will be a source of conflicts. 

Women do far too much than get appreciated . Call her 24 hours working machines, she will just smile. Try to find out meaning behind her smile.

Man , you may not realize it but these everyday activities are causing back pain.If she is  saying "My back is hurting!", is does not mean she is complaining. If she is asking you to do something , it dos not mean she is avoiding her responsibilities. You are the only one to whom she can ask for help and she want to tell everything. Try to understand her.  

She loves you. She loves your family too. She is taking care of your baby without any rest . She is not demanding anything from you other that your love and care. One tight hug, a word of appreciation, a touch of love is enough for her. Because she know 

Without her managing at home, its impossible for you to go out and earn. And without you , it will be hard for her to manage at home. 

:) 

If you find her constantly trying to prove her value to you, she have already lost. Try to value your superwoman . 


आईची गौराई




गेले १ तास फेर धरलाय आम्ही आणि माझी आई …झिम्मा न मोडता एकसारखी गाणी सांगतेय . "कराड कोल्हापूरच्या गौरी " पासून ती सुरु करते

गौराई आलीया पावनी
तिच्या बापानं देखिली
वडील माझ्या बापा काय देशील लेयाला ?
जोडवी पडल्यात तबकात
घे ग चिलीम …. काढ ग कुलूप
जागा मामाच्या मंदिरी
आरसा ठेविला सामोरी
सोनियाचा करंड कुंकू लेतिया कपाळी
असमाने चढविल , वारा जरीची चोळी
सार लेण झाल खंर
दुधा तुपाच ताट म्होर
उद्या शंकर यील की
एका रातीची वस्ती करून म्होर घालून न्हील की
गौराई आलीया पावनी .

माझ्या दीदीच हे आवडीच गाण .  

गौरीदिवाशी ती अगदी गौरीसारखी नटायची . ही गौराई नटायला जरा जास्तंच वेळ घ्यायची  पण आईन हे गाण सांगायला सुरु केल की सगळा शृंगार अर्ध्यावर टाकून झिम्मा धरायला आलीच धावत ……. नाकातील नथ हातात राहिली तरी चालेल पण या गाण्याला ती चुकवत न्हवती

तिला गौराई म्हणायचं कारण म्हणजे आमच्या शेजारच्या काकू . त्या म्हणतात "अंजू , तुझी थोरली गौरी आणि धाकटी गंगा आहे बघ " (गौरी बडबड करते , खेळते आणि गंगा शांत राहते …… म्हणजे गाणी सांगताना :) )

आईने हे गाण आज सांगायला सुरु केल्या बरोबर तिची आठवण झाली . लग्न होऊन सासरी गेली तशी आमच्या घरच्या गौरीच्या खेळाचा रंग उतरला . तिच्या इतक्या हौसेनी महिना महिना अगोदर पासून डाव नाही रंगत आता अंगणात . हो पण गणपतीच्या ५ दिवसात रंगतो आणि तो हि तिच्यामुळे .

तिच्या सासरच्या गौरीला नटवून थटवून , जेवायला घालून , भानुरा वाजवून तिला झोपवून गौरीच्या रात्री दीदी तिच्या सासूबाई बरोबर दरवर्षी येते . माहेरची गौरी जागवायला :) 

तिचं त्या दिवशीच माहेरी येण अगदी पाहण्यासारखं असत . मला तर हसायलाच येत बाई . आणि मी काही तिला चोरून वैगरे हसत नाही . फक्त काकीच्या पदराचा आडोसा घेते इतकंच :P  

मग ओठांची कमान एका बाजूने दाबून वाकवत , कपाळाला आठ्या पाडत,  मान नको इतकी हलवून लगेच ती म्हणते कशी "लग्न होऊन सासरी जाशील तेव्हा कळेल मी का धावत येते उंबर्यापर्यंत :) " घोड्यावर स्वार होवून आल्यासारखी धावतच घरात प्रवेश करते . घरातल्या  गौरी-गणपतीला डोकं टेकून नमस्कार करते . तिच्या मते ' प्रत्येकाच्या घरची गौराई हा जगातील सगळ्यात  जागृत देवी . कोणाचीही इच्छा अपूर्ण ठेवत नाही . शेवटी माहेरवाशीण आहे ती . माहेरी भरभरून देवून जाते :) ' मग आज्जीला , बाबांना , आईला , काकीला नमस्कार करते . हो …… आमच्या घरची रीत आहे . वयाप्रमाणे नमस्कार करायचे :) . वाहिनीच्या आणि तिच्या काय खाणाखुणा चाललेल्या असतात ते फक्त त्याच दोघींना माहीत .  

गौरीच्या दिवशी ती सासरी जेवत नाही . सकाळपासून उपवास करून आमच्या घरी म्हणजे माहेरी आल्यावर गौरीला ठेवलेल्या नैवेद्याच्या ताटातलीच वडी, कढी,  भाजी भाकरी खाते . आणि हे करण्यापासून तिला कधीही कुणीही अडवलं नाही . आजीची शिकवण आहे ही . घरातली मुलं बाळ जेवली की देवाला नैवेद्य पोहचला अस समजायचं . देव देव्हाऱ्यात बसून राहत नाही . तुमच्या मुलांच्यात मनसोक्त खेळत असतो तो . रांगायला यायला लागल्या पासून मी ही देव्हाऱ्यातील साखरेची वाटी आज्जीची बाप्पाची आरती करून झाल्याझाल्या संपवायची :)

दीदीपेक्षा मी लहान असल्याचा एक तोटा म्हणजे गौरी घरी आणतेवेळी मला तिच्या बाजूला फक्त उभं राहावं लागायचं . माझ्या हातात कधीच नाही दिलं तिने . "मी लग्न होऊन गेल्यावर घेशिल की तूच गौराई घरात " असं म्हणायची . तो मुहूर्त आज आला :) 



हळदी कुंकवाची बोट लावलेली , पोवत घातलेल्या गौरीच्या डहाळ्याचा तो गार , ओला स्पर्श ज्यावेळी तुमच्या हाताला , कमरेला होतो त्या क्षणापासून तिच्याबद्दल आपुलकी आणि प्रेम वाटायला लागत . या वर्षी पहिल्यांदा जाणवलं हे मला . दीदी नेहमीप्रमाणे आजही घरी धावत आली तर हसायला नाही येणार मला . ही गोष्ट फारच साहजिक आहे .      

पण आज अजून नाही आली . बराच उशीर झालाय तिला .  आईचं ही लक्ष खेळापेक्षा उंबऱ्याकडेच जास्त आहे .

" आईची गौराई आली  ……."

वरच्या मजल्यावरून चोरून चोरून गौरीचा खेळ पाहत बसलेला माझा भाऊ बोलला … (खेळ पाहतोय कसला ???? टिंगल टवाळ्या करत असेल  ……  
" तुझ्या काय अंगात येत काय ग गौरीचं खेळताना ? " या आमच्या बंधुराजांच्या  गोड (????) प्रश्नावर दीदीच नेहमीच उत्तर "होय , का ? येतोस लिंबू द्यायला . की अंगारा द्यायला बसतोय ? माझा असिस्टंट म्हणून :P " ) 

माझ्या भावाने अगदी हळू आवाजात बोललेलं "आईची गौराई "हे वाक्य बरोब्बर आईच्या कानात पडल्या पडल्या तिचा गाणी सांगायचा सूर बदलला . 

" गौराई आलीया पावनी "तिने अर्ध्यावरच सोडलं . झिम्म्याच्या टाळ्या आपोआप जोरात पडायला लागल्या . आमच सगळ अंगण एका क्षणात नव्याने जिवंत झाल्यासारख वाटायला लागलं . 

काकीने घागर आणून ठेवली . वाहिनीची खडे शोधायची अन जोडाव्या काढायची गडबड …… घागर वाजली पाहिजे ना :) आजीने घरातल्या गौरीच्या समोरचं नैवेद्याच्या ताटात अजून चार वड्या आणि अर्धी भाकरी आणून ठेवली .

एकदम उत्साह आल्यासारखं आईने नवीन गाण्याला सुरुवात केली . 

" उप्परमाळी सांडल्या तुरी 
वेचता वेचता दमल्या पोरी 
आज गौराई आली खरी " 

 आईची गौराई आली  ……. :) 


सर्वपित्री


फोटो सौजन्य : गुगल

आज सर्वपित्री अमावस्या. तिच्या घरचा म्हाळ . रिकाम्या भिंतीवर नजर खिळवून ती नुसतीच बसून होती . नेमकं आपल्याला काय होतंय हे तिचं तिलाही कळेना . डोळ्यातील पाणी खाली सांडू नये म्हणून चाललेला कसोशीचा प्रयत्न . 

कधीही न पाहिलेल्या सासू - सासऱ्या बद्दल तिला वाटणाऱ्या आपुलकीची आणि एकटेपणाची कुणीतरी चेष्टा करेल किंवा तिच्या त्या भावनेबद्दल शंका व्यक्त करेल या भीतीनेच ….तिने हि तगमग कोणाजवळ ही बोलून दाखवली नाही   

तसं पहायला गेलं तर एकदा …. हो फक्त एकदाच…तिच्या आईजवळ बोलली होती ती हे सगळ 
"इतरांना सासू सासरे असतात म्हणून अडचण आणि मला नाहीत म्हणून "  

यानंतर तिच्या आईने तिला जे काही समजावलं . त्यानंतर हा विषय तिने कधीही कोणाजवळ ही काढला नाही . आभाळभर रिकामेपणा साचलेल्या लेकीच्या छपराला तिने कोणत्या शब्दात आसरा दिला हे फक्त त्या माउलीलाच ठाऊक . याच शब्दांच्या शक्तीवर आणि आधारावर सासू सासऱ्याविनाच सासर तिच्या लेकीने आजवर पेललंय . 

खर पहायला गेल तर जीव ओवाळून टाकावा इतका चांगला दीर आणि कधीही कोणाही जवळ तक्रार करू नये इतका गुणी नवरा साथीला होते तिच्या . पण म्हणतात ना 'ज्याची त्याची दुखणी ज्याची त्यालाच माहित असतात . आणि ती एकट्यानेच सहन करायची असतात…करावी लागतात  '

कुणाच्या घरी कधी हळदी कुंकवासाठी ती गेली की कोपऱ्यात नटून बसलेल्या त्या घराच्या सासूबाईकडे बघून तिला अगदी हेवा वाटायचा . हळद कुंकू कुठल्या बोटाने लावावं ? नारळ ओटीत घालताना कसा घालावा ? विड्याच्या पानच टोक कोणत्या बाजूस अन देठ कोणत्या बाजूस असावं ? अशा बारीकसारीक गोष्टी हक्काने सांगायला तिच्याही घरी कोणीतरी जेष्ठ व्यक्ती असायला हवी होती अस सारखं वाटायचं . अंगणात एकट्याच खेळणाऱ्या तिच्या बाळकृष्णाला गोष्टी सांगायला , गालावरून हात फिरवत कडकड बोटे मोडायला त्याच्या वाट्याला आजी आजोबा असायला हवे होते हे जाणवायचं  

पण हे वाटण , जाणवण सगळ मनातल्या मनात . ओठांच्या पाकळ्या उघडून आजपर्यंत एकही शब्द बाहेर पडला नाही . तिचा हा संवाद एकटीचाच असायचा . स्वतःपुरता मर्यादित . "ओरडणाऱ्या का असेनात पण मला सासूबाई हव्या होत्या , ज्यांच्या नजरेला चुकून जरी नजर मिळाली तरी भीती वाटावी इतके कडक का असेनात पण मला सासरे हवे होते " 

कधीतरी तिच्या माहेरवाशिणी मैत्रिणी एकत्र जमायच्या . त्यांच्या रंगलेल्या गप्पा ' सासू ' या विषयावर येउन नेहमी थांबायच्या . मग त्या एकमेकीना सांगत राहायच्या घराच्या ' त्या ' दोन व्यक्तींमुळे होणारी अडचण , त्रास , अवघडलेपणा …… आणि बरच काही . हिच्याकडे पाहून कुणीतरी अगदी सहज बोलून जायचं  "बरंय बाई  तुझ. हे असले प्रकार तुझ्याकडे नाहीत " या वाक्यावर तिच्याकडे खोट्या हसण्याव्यतिरिक्त काहीही उत्तर नसायचं . ज्या भावनांचा कल्लोळ तिच्या मनात उठायचं ते वादळ तिच्या मैत्रिणींना समजणार न्हवत .     

मी ही सहजच केला होता आज तिला फोन . तिच्या पहिल्याच वाक्यात आवाज खोल गेल्याचा जाणवला . गळ्यात दाटलेल्या हुंदक्यामुळे तिला धड बोलताही येईना . "काय झालंय ग ???" न राहवून शेवटी विचारलंच मी . "आज सर्वपित्री " इतकच बोलली ती यावर . 

तिला काहीही न समजावता मी फोन बंद केला . बाप्पाजवळ हात जोडून उभी राहीले आणि एकचं मागण मागितलं 

"हवं तर सगळ वैभव लुटून ने पण कोणाची जिवाभावाची माणसं नको नेत जाऊ अशी ज्यांची जागा उभ्या आयुष्यात दुसर कुणीही नाही घेऊन शकत . "

मुर्तीतला देव मुका का असतो ?? हे आज कळल मला :) 


गणपती बाप्पा मोरया




रायाच्या घरात बाप्पाची इवलुशी मूर्ती . आणि त्याच्याभोवती त्याने पूर्ण टेबलभर केलेली भलीमोठी आरास . त्याच्या कोकणातल्या घरातला गणोबाही मोठा असेल त्याहून .  पण आता तो गणोबाही दूर आणि कोकणही .

नोकरी निमित्ताने त्याने देश सोडल्या दिवसापासून तो काही गोष्टी अजूनही न चुकता करतो . काचेच्या पेल्यातून  का होईना पण सूर्याला अर्घ्य देतो . पांढऱ्या शुभ्र रंगाच जानवं हाताच्या दोन्ही बोटात एका विशिष्ठ पद्धतीने अडकवून सूर्याला दाखवून मगच परिधान करतो . ऑफिस मधून परतल्यावर न चुकता संध्या . आणि सकाळी उठल्यावर गणपती बाप्पाचं स्तोत्र .

घरातून बाहेर पडताना उंबऱ्याजवळ आईच्या पायाशी आशीर्वाद घेण्यासाठी वाकला अन आईला पावलांवर ओलसरपणा जाणवला . हनवूटी वर केल्यावर त्याच्या भरल्या डोळ्यात तिला एकटेपणाच आभाळ दिसलं . ती तशीच आत निघून गेली . लगबगीने काहीतरी पदरात झाकून आणल . अन त्याच्या हातात ठेवत म्हणाली "कित रडतला ???? ह्यो बाप्पा …… तुले सोबत करीन " .  हीच ती बाप्पाची इवलुशी मूर्ती . जी रायाने इथे आलेल्या दिवसापासून पुजली . मिळेल त्या सामानाची पूजा मांडली . शेवटी भाव महत्वाचा

लोकं परदेशी राहायला जातात म्हणजे नक्की काय होत हो ? फुलपाखरू हातातून सुटताना बोटांवर रंग सोडून जात तसंच काहीसं होत असावं त्याचं . देश सुटतो पण संस्कार आणि सण सावलीसारखे जगभर घेऊन फिरतात . जगाच्या पाठीवर कुठेही जा …… "गणपती बाप्पा ……. " ओरडल्यावर "मोरया " ची आरोळी देणार नाही असा एकही भारतीय शोधून सापडायचा नाही .

आज गणेश चतुर्थी …. गेले आठवडाभर रायाची एकट्याची जी धावपळ दिसत होती ती यामुळेच . ६ खोल्यांच्या घरी एकटाच राहतो  असं नाहीच म्हणता येणार . कारण एक खोली त्याच्या बाप्पाची आहे . छोटस टेबल त्यावर ती देखणी मूर्ती . २१ च मोठ होईल म्हणून ५ च वस्त्र . हळद , कुंकू , अक्षता , धूप  आणि साखरेची वाटी . बसं …… इतकंच  असत तिथे . संकष्टीला दिव्यांऐवजी २ मेणबत्या पेटवून आरती मात्र नक्की करतो .  ऑफिसच्या कामातून त्याला आरास करायचं सामान शोधायला वेळ नाही मिळत आणि तसही तो जिथे राहतो तिथे मिळतही नाही फारस काही . बाप्पाच्या पूजेसाठी लागणार सगळ तो घरी आल्यावर स्वतः तयार करतो . पुठ्ठ्याची गुलाबाची फुलं , कोल्ड कॉफी चे रिकामे राहिलेले पेले कापून बनवलेली फुलपाखर जी त्याच्या भिंतींवर अगदी खऱ्या सारखी वाटतात . कॉर्नफ्लेक्स चे बॉक्स एकमेकावर रचून त्याने त्याच्या बाप्पाच्या आसनाची तयारीही केली . काय सुरेख चौरंग बनवला होता त्याने …… आणि त्यावरच्या चंदेरी कागदामुळे तर तो अजूनच छान वाटत होता .


काल घरी परत येताना त्याने गुलाबाची मिळतील तितकी सगळी फुलं विकत आणली . बाप्पाची खोली घमघमत होती सुगंधाने . रायाच्या इथल्या बाप्पाला नवीन नवीन फळ नैवेद्याला मिळतात . म्हणजे कोकणातल्या सारखं पेरू , सीताफळ नाही मिळालं इथे म्हणून चेरी , प्लम , रासबेरी , लिची अशी इथल्या हंगामाची फळ त्याने पूजेसाठी आणून ठेवली

रोज ७ चा गजर बंद करून ८ वाजता उठणारा राया आज ५ च्या ठोक्याला अंथरुणातून बाहेर ……. बाप्पाची ओढ दुसर काय . अभ्यंग आटोपून तो पूजेला बसला . राया पूजा करायला बसला की कुणीही नुसतं पहात राहावं त्याच्याकडे असा दिसतो . राया गणपतीसामोर हात जोडतो तेव्हा पाहावं . त्याच्याकडे पाहताना खुद्द गणपतीला काय वाटत असेल ?? वक्रतुंड महाकाय म्हटल्याशिवाय घरातून पाऊलही बाहेर न काढणाऱ्या लेकरासाठीच सगळ देवपण घेऊन किती समाधान वाटत असेल . बाप्पाची कुठेही कधीही कोंडी नाही केली त्याने . सुखं  मिळाल ते बाप्पाच्या आशीर्वादाने आणि दुखः पूर्वजन्मीच उरलेलं माप म्हणत वेळोवेळी त्याने बाप्पाची सुटकाच केली अस म्हणावं लागेल . राया पूजा करणार म्हटल्यावर बाप्पा आसनावर आपणच विराजमान होत असेल . आपल्याला या गोष्टी कशा दिसायच्या ?

पूजेसाठी आसनावर बसल्या क्षणापासून रायाचे ओठ हालत असतात . लखलखणाऱ्या मखरासमोर पाठीत किंचित झुकून हात जोडून मस्तकी टिळा  लावून बाप्पाकडे एकटक पाहणारी रायाची नजर . त्याचा तो कोकणस्थ ब्राम्हणाचा गोरा वर्ण ज्योतीच्या प्रकाशात पिवळसर दिसायला सुरु होतो. मूर्तीला पंचामृताच स्नान घालताना आज त्याच्या डोळ्यातून पाणी वाहत होत . घराच्या गणपतीची आठवण कासावीस करत होती  त्याचा जीव . गणेश चतुर्थीच्या दिवशीही माझ्या गणपतीला दुर्वांची जुडी आणि आगाड्याच पान नाही मिळालं म्हणून चुटपूटत होता . आता येशुसमोर मेणबत्या पेटवणाऱ्या देशात कुठून उगवेल दुर्वा आणि आगाडा  

पण त्याची नैवेद्याची तयारी पाहून लंबोदर आज खरच भरपेट जेवेल अस वाटण साहजिक होत . स्वयंपाक खोलीत मोदक उकडताना पौरुष्याचा अहंकार त्याला कधीही शिवला नाही . उलट तो म्हणायचं "अन्नपूर्णे इतकं कुठलही काम अवघड नाही . चव उतरावी लागते हाताची त्यात . नुसतं सामान पुरेस असून नाही चालत "त्या मोदकासाठीही त्याला कष्ट घ्यावेच लागले . मोदकपात्र नाही , चाळण नाही . उकडीच्या मोदकाची झाली ना पंचाईत . जिथे लोकं ब्रेड आणि बटर शिवाय दुसर काहीच खात नाहीत तिथे कुठून मिळणार मोदकपात्र आणि चाळण . पण रायाचा गणपती बाप्पा उपाशी पोटी त्याच्या समोर पान मांडून बसला होता …… उकडीच्या मोदकाची वाट पाहत . त्याचं मन मोडवेल तर राया कसला ???? एक स्वछ रुमाल घेऊन त्याने एका भांड्याला घट्ट बांधला आणि केले त्यावर उकडीचे मोदक :) बाप्पा खुश , राया खुश 

कोकणातल्या बाप्पाच्या आरतीलाही तो सकाळी संध्याकाळी हजर राहायचा .पूर्वी  गावी असताना रायाच्या हातात टाळ आणि घंटा असायची आणि आता हातात फोन घेऊन उभा असतो . त्याची आई घराच्या गणपतीची आरती सुरु झाली कि रायाला फोन करते .  तो ही इतक्या लांबून बाप्पाच्या आरतीला टाळ्या वाजवतो . आरती संपली की  त्याच्या घरातल्या  इवलुश्या मूर्तीसमोर "गणपती बाप्पा मोरया " म्हणून एकटाच जोर जोरात ओरडतो . कोकणातल्या बाप्पाच्या मखराचा  लखलखाट रायाच्या घरी अन चेहऱ्यावरच तेज रायाच्या तोंडावर दिसायला सुरु होत . अन मग अजून एखादा थेंब त्याच्या डोळ्यातून वाहत खाली येतो … 

नेमके त्याचवेळी त्याचे बाबा बाप्पाच्या नैवेद्या भोवती पळी पंचपात्र हातात घेऊन पाणी ओवाळत होते . आता त्यात पळी पंचापात्रातील पाणी किती आणि रायाच्या डोळ्यातील पाणी किती हे त्या बाप्पालाच ठाऊक …….  बाप्पाच्या डोक्यावरच लाल गुलाबाचं फुलं त्याच्या उजव्या पायाशी येउन पडलं . नैवेद्य , आरती पूर्णत्वास आली . 

आई डोक्यावरचा पदर सांभाळीत ओठातच पुटपुटली "रायाने मनापासून नमस्कार केला असणार माझ्या . पोहोचला बाप्पा पर्यंत "

 !! गणपती बाप्पा मोरया !!  !! मंगलमुर्ती मोरया !!

प्रेम - पैशाने विकत न घेता येणार


मधुरा …… या कथेची केंद्रबिंदू . पुढची सगळी गोष्ट हिच्या भोवती फिरत राहते . तिचं आयुष्यही असंच तिच्याभोवती गोल गोल फिरतंय . अगदी वर्तुळाकार . म्हणजे कुठेही मनाला बोचेल असा ९० अंशांचा कोन नाही की पोटात खड्डा पडावा असा अर्ध वर्तुळाकार लुप्त झालेला चंद्र नाही . सारं काही अगदी कोरल्यासारख . हो ……. पण हे वर्तुळाकार चित्र नियतीने कोरलंय . केंद्रस्थानी मधुरा असली तरी मार्ग ठरवणारी लेखणी तिच्या हाती नाही .

मधुरा हे तिच्या आईचं अगदी आवडीच नाव . आई म्हणायची मधुरा नावाच्या मुली फार गोड असतात . देवाच्या कमंडलूतून आई बाबाच्या ओंजळीत पडलेल्या अमृतासारख्या. त्यामुळे मधुरा आईच्या पोटात असतानाच तिचं हे नाव घरच्यांनी ठरवून ठेवलं होत . आणि तिच्या नावाप्रमाणे ती खरंच नावारूपाला आली .

शाळेत प्रथम क्रमांक कधीही सोडला नाही तिने . वक्तृत्व स्पर्धा तर तिच्या डाव्या हाताचा मळ असावा इतक्या सहजपणे जिंकायची . त्यामुळे शिक्षकांची चांगलीच लाडकी होती . शाळेतून बाहेर पडले की बरेचसे तारे निरभ्र आकाशात हरवून जावेत तसे लुप्त होऊन जातात . त्याचं पुढे काय झाल हे कोणालाच माहीत नसत .

पण मधुराच तसं नाही . शाळेबाहेरही तिने आपल तेज टिकवून ठेवल. बोलण्यात तोच बाणेदारपणा , स्पष्टपणा , आपल्या अभ्यासाशी प्रामाणिकपणा यामुळे बऱ्याचश्या प्रेझेन्टेशन्स बरोबर कॅम्पस इंटरव्हीयु मधेही तिने बाजी मारली . नाही नाही म्हणत एका महिन्यात ३ किल्ले सर केले . आणि सगळ्या मोठ्या पगाराच्या .

 आई हीच तिची सगळ्यात जवळची मैत्रीण  

जॉब निमित्ताने बेंगलोरमध्ये राहायला लागली . मनाची घालमेल बाजूला ठेवून लेकीच्या करियरसाठी आईने होकार दिला . "कोणी असेल तर सांगा ह ……. माधुरासाठी बघतोय आता " हे सांगायची वेळच नाही आली तिच्या बाबांवर . गुरुजींच्या भाकिताप्रमाणे " पदरात घातलेला पहिलाच नारळ लग्नाची ओटी समजायची " . आणि अगदी झालही तसंच .

तिला हवा तसा , तिला अनुरूप , तिच्याही २ पावले वरचढ नवरा आमच्या मधुराला मिळाला . सासर बेंगलोर नसल तरी नशिबाने तो बेंगलोरमध्ये स्थायिक असल्याने तिला नोकरी सुरु ठेवता आली . अगदी करियरच्या मागे लागणाऱ्यातील जरी ती नसली तरी आयुष्यभर अभ्यासू असणारी इतक्या लवकर नोकरी सोडायला तयार होणारी न्हवती . त्यामुळे बेंगलोरचा मुलगा म्हटल्यावर तिनेही लगेच होकार कळवला  


झालं …… डोक्यावर अक्षता पडल्या एकदाच्या पोरीच्या म्हणत तिचे घराचे सुस्कारा टाकतात तोच तिच्याकडून गोड बातमी समजली . :) सासूबाई म्हटल्या " पहिल्या अंगाऱ्याचा गुण आहे बंर हा ……. " लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाआधीच तिचं पिल्लू आल होत :) अगदी सगळंच कसं जुळून आल्यासारखं  झाल . पण या एका वर्षभरात बरंच काही घडून गेल राणी सरकारांच्या आयुष्यात

राजा राणी दोघेच राहायचे बेंगलोरमध्ये .  या ही अवस्थेमध्ये बराच शारीरिक त्रास सहन करत तिने आपला जॉब सुरु ठेवला होता पण ७ व्या नंतर डॉक्टरनी ताकीद दिली आणि मग नाईलाजाने तिला राजा मजूर करून घ्यावी लागली ( त्यातही बरीचं  दिव्य झालीत . आयत्या वेळी कोण नको का हिची जागा घ्यायला ऑफिस मध्ये ? ) . त्या दिवशी ऑफिसमधून पाय बाहेर टाकताना तिच्या मनाला हा विचार स्पर्शूनही गेला नसेल की हा माझ्या इथला शेवटचा दिवस असेल . परत हे सगळ मला कधी अनुभवता येईल ?  

देवदयेने गोंडस कन्यारत्न जन्माला आलं . ३ महिने आनंदात गेले . पण आता रजा संपत आली होती . काहीतरी कारणाने तिने ती वाढवून घेतली अजून ६ महिने . झाल त्या दिवसापासून तिच्या डोक्यात चक्र सुरु झाल . आजचं मरण उद्यावर ढकललय . पण उद्याचा सूर्य उगवायचा थोडीच राहणार आहे ? काहीतरी एक ठाम निर्णय घेण तिला भाग होत .

तिच्या नवरदेवानीही  तो निर्णय घेण्याची पूर्ण मोकळीक दिली होती तिला . आता तिला जास्तंच जड जात होत . कारण तिला नेमक काय हवाय हेच ठरवता येत न्हवत . नाही …… तसं पाहील तर काही अपरिहार्य कारणांमुळे सासूबाई आणि आई दोघीनाही तिच्या घरी येउन राहण जमणार न्हवत . पण तिच्यावर घराच्या कुणीही नोकरीचा दबाव आणला नाही .

आता जॉब सुरु ठेवायचा म्हटलं तर तिच्यासमोर एकाच पर्याय शिल्लक होता . पाळणाघर ……. ज्याला आताच्या आयांनी एक सुधारित नाव दिलय Day  Care Center ……. सकाळी ८ पासून रात्री ८ पर्यंत सुरु असत म्हणे तिच्या घराशेजारच पाळणाघर . बाकी मुलांना जेवण बनवून द्यायचीही तसदी नाही . सगळंच पाहतात ते लोकं ( ते काय पाहात असतील याची तुम्हा आम्हा सर्वाना कल्पना आहेच की हो )  मुलांना खेळवंतात , झोपवतात , जेवू घालतात , अभ्यास सगळ एकाच ठिकाणी ……. म्हणजे एका दगडात सगळे पक्षी मारल्याचा घरच्यांना आनंद :-|

पण ह्या पर्यायावर मधुराने साफ नकार दर्शवत एक मोठी फुली मारून टाकली . तिच्या मुलीला तिला त्या Day  Care Center मध्ये ठेवायची अजिबात तयारी म्हणती . मग त्यासाठी तिला काहीही किंमत मोजावी लागली तरी चालेल . तिच्या मते , लहान मुलाला पाळणाघरी ठेवण म्हणजे  आपल्या आई बाबांना वृद्धाश्रमात ठेवण्यासारखाच आहे . म्हणजे असं …… की दोघेही अशा वयात असतात की त्यांना आपली गरज असते …… आपली म्हणजे आपल्या असण्याची , सहवासाची , सोबतीची . आणि नेमके त्याच वेळी आपण पैसा किंवा करियरच्या मागे धावत या गोष्टी जमेतच धरत नाही .  

पण सगळ्या गोष्टींचा सारासार विचार झाल्यावर मधुराचा निर्णय पक्का झाला . तिने जॉब सोडून दिला . तिच्या या यातना तिच्या तिलाच माहीत . काय कमी दुखः झाल असेल काय त्या पोरीला . इतक्या गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडायची म्हणजे एक पाय कोणीतरी कापून अपंग झाल्याची  भावना . वर तिचा निर्णय म्हटल्यावर धड उघड उघडपणे मनाची सलं सांगताही येईना कोणाला . म्हणजे सल ही फक्त आर्थिकच होती असं नाही पण स्व-अस्तित्व नावाचा प्रकार फार महत्वाचा आणि तो टांगणीला लावायचा म्हणजे महादिव्य .

 बाकी मार्केटमध्ये परत प्रवेश करायचा म्हटलं तर resume वर किती मोठा gap दिसतोय कोणास ठाऊक हि भीती वेगळीच . नॉलेज जुनपुरण होणार नाही याचीही काळजी तिलाच घ्यावी लागणार होती . ज्या मुलीने आयुष्यभर पहिला नंबर नाही सोडला तिच्यासाठी हा प्रकार म्हणजे फुलपाखराचे पंख गळून पडल्याचा प्रकार होता . त्त्यातही भर म्हणजे आपला समाज …… "तुझी बायको फार दिवस नोकरी करेल असं वाटल न्हवतच ." किंवा मग " काय करणार …… सगळे कष्ट वय गेल न ग तुझे . वाटल होत पुन्हा जॉईन होशील पण नाही जमल तुला " असे शालुतून जोडे होतेच तयार .

खरच रिझाइन केल तेव्हा तब्बल १ आठवडा रडून काढला पोरीने …… आणि तो ही एकटीने. अवघड जागेच दुखण . सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशी अवस्था . तिच्या नवऱ्यालाही समजेना हिला कसं आणि काय समजवावं .  

बरोबरीला तिचा मैत्रीण परिवार होताच …… ज्या सगळ्या या सगळ्यातून "तो " सोयीस्कर पर्याय निवडून स्वतःला तारुन नेल्या . मग तिला अजूनच भांभावाल्यासारख व्हायचं . "मी करतेय ते चूक की बरोबर " असं कितीतरी वेळा तिने स्वतःलाच विचारलं असेल . तिची घालमेल तिची तिला जाणवत होती पण बाळाच्या हक्काली आई तिला तिच्या करियरवर बळी चढवायची न्हवती . आणि हे तीच स्वतःपुरत मत होत . बाकी सगळ्या मैत्रिणी आयाच असल्या तरी प्रत्येकीने वेगळ्या परिस्थितीतून वाटचाल केली असणार हे नक्की . तिच्या पायवाटेवर तिला तिचा हा निर्णय योग्य वाटला

आपल्या करियरचा आलेख इतक्या वेगाने वर चढत असताना ते सगळ कुणासाठीतरी सोडावं लागण फार महाभयंकर . पण जे कोणी तिला खरंच ओळखत होते , ती काय करू शकते याची कल्पना असणाऱ्या सर्वांनी तिच्या या निर्णयाच मनापासून कौतुक केल .

पुढे काय करू काय नको या विचारात असतानाच तिच्या नवऱ्याला एक छानशी संधी चालून आली . आता मधुरा सध्या कुटुंबासोबत US  मध्ये असते . तिच्या पिल्लासोबत मजा करतेय . पिल्लाला त्याची हक्काची आई मिळाली आणि मधुराला तिचं हक्काचं आईपण . आता तिच्या Salary अकाउंटमध्ये स्वतःचे काहीही जमा होत नसले तरी रोज एक गोड गोड पापाने सुरु होणारी सकाळ , भरपूर प्रेम , आनंदाचा एखादा डोळ्यातला थेंब आणि खूप सार समाधान न चुकता जमा होतंय तिच्या मनात

खुश आहे आता ती . पण याचा अर्थ तिने सगळच सोडलाय असा होत नाही . दिवसातून जेमतेम १ ते १ १/२ तास रिकामा मिळत असेल तिला . पण त्यातही तिने स्वतःचा गायनाचा छंद जोपासलाय . ज्या platform वर ती काम करायची ( अहो ती ही software  engg  आहे ) ते सगळ updated  राहावं म्हणून घरूनच छोटे मोठे प्रोजेक्ट करत राहते .  


भारताबाहेर , घरापासून दूर राहून बरच काही शिकायला, पाहायला मिळतंय तिला . नवीन प्रकारची माणस , त्यांचे स्वभाव , वागण्याची पद्धत नी बरच काही . नाती जपण्याची कला , नाती तयार करणारी गालावरची एखादी खळी , एखादा प्रेमाचा स्पर्श , भले मग समोरच्या व्यक्तीची भाषा न समजणारी का असेना , हे आणि असं बरंच काही ……

म्हणूनच सुरवातीला म्हटलं न …… तिचं आयुष्य वर्तुळाकार आहे पण मार्ग आखायची लेखणी तिच्या हाती नाही :)

रिकामा वेळ मिळाला विचार करायला की भावनांचे कल्लोळ अजूनही उठता मनात तिच्या. वर झेप घेणारा एक आलेख मागे सोडून आलेय खरी पण त्या बदल्यात बरेचशे आजूबाजूचे आलेख वर चढत आहेत तिचे . जे तिच्या कधी लक्षातच न्हवत आल आजवर . ओंजळ रिकामी करायचं धाडस असावं लागत …… खरच नवीन फुल आपोआप फुलून येतात रिकाम्या ओंजळीत . हे धाडस तिने केल .

अजूनही बरेचजण उलट सुलट प्रश्न विचारात राहतात तिच्या या निर्णय बद्दल . तिने आता उत्तर देण सोडून दिलय. स्पष्टीकरण मागणारे फुंकर घालायला कमी आणि खपली काढायलाच जास्त उतावळे असतात हे समजून चुकलय आता तिला

पण मागे सोडलेल्या " त्या " गोष्टीबद्दल तिला अजूनही खात्री आहे . अजुनही तिला वाटत की एखादी संधी पुन्हा उभी  राहील हात पसरून पुढे . ज्या दिवशी तिची , तिच्या पिल्लाच्या आयुष्यातली गरज कमी होईल तेव्हा पुन्हा एकदा नव्याने झेप घ्यायचं ठरवलंय तिने . बघू ……. कस कस जमतंय

पण मागे सोडलेल्या " त्या " गोष्टीबद्दल तिला अजूनही खात्री आहे . अजुनहि तिला वाटत की एखादी संधी पुन्हा उभी  राहील हात पसरून पुढे . ज्या दिवशी तिची , तिच्या पिल्लाच्या आयुष्यातली गरज कमी होईल तेव्हा पुन्हा एकदा नव्याने झेप घ्यायचं ठरवलंय तिने . बघू ……. कस कस जमतंय

कुणी विचारलं तर ती आता इतकंच सांगते …. माझ्या नियतीत उत्तम करियरपेक्षा उत्तम नवरा आणि पैशाने विकत न घेता येणाऱ्या प्रेमाला झुकत माप होत . अजून उभं आयुष्य पडलंय हरवलेलं पुन्हा शोधायला . पण माझा बाळकृष्ण रांगताना, बोबडे बोल बोलताना , पहिलं पाऊल टाकताना , पहिल्या दिवशीच्या शाळेतून पळत येत घट्ट मिठी मारताना मला परत कधीच पाहायला मिळाला नसता . आयुष्याची सगळी कमाई बाप्पाच्या पायावर ओतली तरी दिवस उलटे फिरून जाऊ शकत नाहीत . त्यापेक्षा थोडावेळ विश्रांती घेतली तर काय चुकल ?



   

अनामिक वाचक

                                                    Deva-kṣa.png


" मी क्ष ,

अमृता , फार उत्तम लिहितेस ग तू . वेड  लागेल कुणालाही वाचून . सरस्वती नाचते का तुझ्या वाणीत आणि लेखणीत ? कसं सुचत ग तुला ?  एखाद पुस्तक का नाही ग publish करत तू ? अग खर सांगू का ……. बऱ्याच वेळा वाचताना वाटत राहत , हे माझ्याही बाबतीत झालाय …. हिला इतक कस अचूक लिहायला जमत ? पाठ चेपनाऱ्याला आपली दुखरी नस सापडावी अगदी तसंच काहीसं लिहितेस बघ …… कुणाच्या मनात काय बोचतंय हे अजून जाणतेस :) अशीच लिहित राहा ……… "

अहो ……… इतकी प्रेमळ comment नसली जरी आली आजवर माझ्या ब्लॉगवर येतात थोड्याफार प्रतिक्रिया ……. आणि हो आवडतात वाचायला मला त्या . मी कितपत कुणाच्या मनात उतरू शकले याच गणित मांडता येत ना मला . नाहीतर मग " शून्य प्रतिक्रिया " म्हटलं कि गोळाबेरीज चुकते सगळी …… 

बर , आता तुम्ही म्हणाल "हिला post  जास्त महत्वाची की त्यावरच्या इतरांच्या प्रतिक्रिया ?" तर याच अगदी प्रामाणिक उत्तर तयार आहे माझ्याजवळ . हा ...........आता ज्यांना आधीपासूनच भरभरून प्रतिक्रिया येतात ते करू शकतात माज.  " मला कुणाच्या प्रतिक्रियेशी जास्त लळा  नाही . मी माझ्यासाठी लिहितो . कुणा दुसर्या साठी नाही . वगैरे वगैरे " 
 पण मी मात्र लिहिते ……. स्वतःला सुचत म्हणून कागदावर उतरवते आणि तुम्हा सर्वांना  वाचायला आवडत म्हणून इथे publish करते . आणि हो त्या क्षणापासून वाट पाहत राहते , प्रतिक्रियांची …… काय आहे , गणित मांडायचं असत न आपल्याला .....मनाच्या उंचीच आणि खोलीच :)

आणि ज्या सगळ्या प्रतिक्रिया आजवर मिळाल्या त्यात एक वाचक आहे ……… त्या वाचकासाठी ही माझी post " अनामिक वाचक " क्ष . 
हो क्ष ……. आता ज्याच नाव नाही माहित त्याला काय नावं ही ठेवता येत नाहीत आणि धड नावजताही येत नाही :)  

या क्ष बद्दल थोडस …… 
अस मी काहीही म्हणणार नाही . अहो मलाच काही माहित नाही तर थोड थोडक तरी काय म्हणून ओळख करून देणार ? ओळख इतकीच की आजवरच्या माझ्या बऱ्याचश्या  post वर " Anonymous " अशी प्रतिक्रिया देणारी एक व्यक्ती . 

त्रास होतो हो फार . एखाद्या माणसाला आपली ओळख लपवाविशी का वाटत असेल ? काय कारण असेल या मागे ? नाही …… तस पाहील तर प्रतिक्रियाही छान लिहिलेल्या असतात आणि मनापासूनच्या असतात . मग हा नावाचा लपंडाव कशासाठी ? मला कळल तरी हवं ना इतक्या आवडीने कोण वाचताय माझं लिखाण   

तसही या अनामिकपणाचा मला राग येतो .शाळेत असल्यापासून सहन करतेय हो मी . गणितामध्ये कोणत्याही आकड्याला " क्ष " मानताना मी चिडायची . 
म्हणजे कस …… "या जागेचे क्षेत्रफळ क्ष मानू " किंवा मग "तिसऱ्या खांबाची उंची क्ष मानली तर दुसऱ्या खांबाची ३. ५ क्ष असेल " असंच काहीस . 
YUKK...... म्हणजे हे कस झालाय माहितीये का ? तुम्ही चिंचेच्या बुटुकाच वजनही "क्ष"च मानणार अन त्या तांदूळ भरलेल्या पोत्याचाही . कसं  शक्य आहे राव ????? म्हणून मला हा " क्ष " प्रकार नाही आवडत . 

" माणसाने कसं काचेसारख पारदर्शी आणि आरशासारख स्वच्छ असावं . " इतक्या सभ्य शब्दात मी माझी नाराजी व्यक्त करायला मी काही संत बिंत नाही . कोल्हापुरी खेळते माझ्या जिभेवर म्हणून जरा स्पष्टच बोलते " ताकाला जावून भांड लपवू नये माणसाने " 

बाकी ……… तुमची इच्छा 

नावासहित ओळख करून दिलीत तर आभार . नसेल द्यायची तर माझी काही ……… हरकत नाही . आजही तितक्याच आवडीने वाचेन तुमचे प्रतिक्रियेचे शब्द . चूक भू माफी असावी . 

वाट पाहतेय ……. प्रतिक्रियेची

क्ष ही चालेल बंर मला . माझ्या ओळखीतल नवीन नाव समजेन मी :)  

काय करणार ……. गणित मांडायचं तटलय हो :)  

जित्याची खोड मेल्याशिवाय थोडीच जाणार आहे :)

आपल्या प्रतिक्रियांबद्दल मी आपली आभारी आहे 
     

Golden boy

गोड या शब्दाचा गोडसरपणा मला याआधी कदाचीत कधी कळलाच नसावा .कुणी इतकं गोड कसं  असू शकत ?   माझीच  नजर तर नसेल ना लागत कधी ? पापणी लववावीशीच नाही वाटत . एकटक नुसत पाहत राहावं त्याच्याकडे . 

किती आणि कुठून सुचतात तुला इतके सगळे प्रश्न ? कुठल्या मातीचा बनवलाय तुझा मेंदू देव बाप्पाने ? डॉक्टर काकांनी डिलिव्हरी रूममध्ये तुझं  ठेवलेलं नावाचं योग्य आहे अगदी  " Golden boy …….  दसऱ्या दिवशी देवबाप्पाच्या घरून चालत आलेलं सोन आहे हे :) " हो …… अगदी असंच म्हणाले होते .  

तुझ्या  सोनेरी पावलांनी आजीच घर भरून टाकलस तू . अन बाबा तर काय ……. स्वर्ग सुख अनुभवत असतात तुझ्यासोबत . 




सांगू का बाबांना …. तुमच्या लाडक्या लेकाने रडून गोंधळ घातला म्हणून . बंर …… कारण काय असावं तर तुझ्या आणि बाबांच्या लग्नात मला का नाही नेलं  बरोबर :) :) कसले भारी प्रश्न पडतात रे तुला …… आता काय उत्तर देऊ ??????

हो ……. आणि तुझ्या Cockroach fly ची गम्मतही सांगितली बर मी सगळ्यांना . Butterfly … fly करत म्हणून त्याला Butterfly म्हणतात तर Cockroach ला Cockroach fly का नाही म्हणत ? आई शप्पथ सांगते …. २५ वर्षांच्या या आयुष्यात मला हा प्रश्न कधीही पडला नाही . खरंच …… म्हणूनच त्या दिवसापासून तुझ्या आई बाबांसाठी Cockroach fly हेच बरोबर 

आता त्या दिवशीचच घ्या ना . 10 Little Fireman म्हणत बसला होता एकटा एकटाच . मध्येच काय झालं धावत आला स्वयंपाक खोलीत "आई, Fireman काय करतात ग ? " त्याला समजेत अशा शब्दात मी त्याच्या प्रश्नच समाधानकारक उत्तर दिलं . (माझ्या बाबांनी मला १० वेळा सांगितलंय . त्याच्या प्रत्येक प्रश्नच समाधानकारक उत्तर तुला देता आलं पाहिजे. ते जर नाही जमलं  तर तुझी सगळी प्रशस्तिपत्र वाया … हो अगदी UT सुद्धा  :) ) माझं  वाक्य पूर्ण होण्याआधी त्याचा पुढचा प्रश्न " Postman आपली letter post करतो ना . मग म्हणून तो postman . मग fireman चूक आहे ……. त्याला waterman म्हटलं पाहिजे . तो fire विझवतो . लावत नाही काही . त्या book  वाल्या काकांना काही ……. कळत नाही . " आता झाली न रावं पंचाईत . २ मिनिटासाठी वाटलं  जर आता नाही उत्तर सुचल तर गेली ……. माझी सगळी बुद्धी वाया गेली आज  :)  

आई चिडली तर तिला कसं शांत करायचं याचही टेकनिक आहे त्याच्याकडे . इतक्या वेळा समजावूनही एके दिवशी तो आईच्या औषधाच्या स्ट्रीपकडे पाळला  . मी सूर चढवला "पिल्ला …कित्तीवेळा सांगितलंय ???? दुसऱ्यांच्या औषधाला हात लावायचा नाही " माझ्या डोळ्यांपेक्षा मोठे डोळे करत जवळ आला आणि म्हणाला "दुसऱ्याची मम्मा आहेस तू ? मम्मा माझी … मग ते औषधही माझंच झाल ना . " एकदम impressive उत्तर दिलं पठ्ठ्याने :)




झालय काय माहिती आहे का … जर्मनीमध्ये आला तेव्हा खूपच लहान होता ना हा बाळकृष्ण . पण आता लागलाय Chaou , Tschüss करायला . इंडिया ट्रीप ही कारणा कारणानेच होते म्हणा ना . म्हणजे इथे आल्यापासून २ वेळाच . पहिली मामाच्या लग्नासाठी आणि दुसरी काकाच्या लग्नासाठी . त्यामुळे त्याला वाटत आजीकडे जायचं ते फक्त लग्नासाठीच . कुणीही विचारा "आता कधी येशील परत ?" पटकन उत्तर देतो "आता लग्नाला " :) 

मामाचं लग्न झाल्यावर मामी घरी आली. काकाने काकी आणली . मला म्हणतो कसा "का ग ……. मामी , काकी आता तिच्या आईकडे नाही राहणार ? त्या दोघांना आवडल्या त्या म्हणून घेऊन आलो आपण त्यांना आपल्या घरी ?" मी ही तितकंच सहज उत्तर दिलं "हो ……… आवडल्या म्हणून आणल्या . " झालं …. दिवसभर डोक्यात हेच चक्र सुरु होत दिवसभर साहेबांच्या . निरभ्र आकाश पाहत संध्याकाळी मी गच्चीत उभी असताना मला त्याचा आवाज आला . म्हणजे तो बोलत होता कोणाशीतरी . " आता तुझ आणि माझ लग्न झालंय . तू मला आवडतेस . मी घरी घेऊन जाणार तुला . आजपासून तू माझ्या बरोबर रहायचास . आई राहते न बाबाच्या घरी … तशीच " मला रहावेना . मी पटकन डोकावून पाहील तर हा त्याच्या आवडीच्या गाडीशी बोलत होता :) बाबांनी वाढदिवसाला गिफ्ट दिलेली कार एकदम प्रिय बंर आम्हाला :) तांदळाचे चार दाणे घेऊन तिच्यावर उधळत होता . 

आकाशाची निरभ्रता फिकी वाटावी इतकी स्वच्छ असतात ही चिमुरडी मनं . कुणीतरी आवडलं की घरी आणायचं असेल तर लग्न करायचं इतकच माहीत त्याला :) . मग मी ही सामील झाले  त्याच्या या खेळत . टाकले मी ही चार दाणे अक्षता म्हणून . कित्ती आनंद झाला म्हणून सांगू त्याला . पळत येउन इतका छान बिलगला मला . म्हणतात ना … जगातील सगळी सुखं एकीकडे आणि आई होण्याच सुख एकीकडे . त्याची तुलना कशाशीही नाही . :) 

View Facebook Comments



दिस शेवटचा


वाहून गेले सारे , घट्ट रोवलेली माती 
थांबवावे कुणी कुणाला असा एकही बांध राहीला नाही 

कोसळून भिजवायचा चिंब , आता मुसमुसतो त्या ढगात  
लपवावा ओलावा गालाचा इतका पाऊसही शांत राहीला नाही 

तुझ्या अंगणाशी झुकली रातराणी पण गंध राहीला नाही 
अन ती हुंगण्याचा मलाही आता छंद राहीला नाही 

सुटली आता गाठ , पुन्हा जुळणे नाही 
ऱ्हदयाला पडावा पीळ असा बंध राहीला नाही 

गेल्या विरून साऱ्या काळजातल्या जखमा 
आठवणीची उठावी कळ, असा वारा मंद राहीला नाही  

सरती मागे पाऊले , पुन्हा त्याचं भीतीने वेदनेच्या  
बेधुंद घ्यावा श्वास , इतका विश्वास नितांत राहीला नाही  

शब्दांच्या खेळात कधीचेच झाले बंद तुझे येणे 
कुठल्याच भावनेशी का तुझा संबंध राहीला नाही ?

गेली का सांग राहुनी , सरती भेट ही ती शेवटची 
बरंय …… दिस शेवटीचा म्हणून कुणी निंद्य राहीला नाही 

लाख झाल्या चुका , लाख गुन्हे केले 
पण …… 
सगळ्या पोटात घालण्याइतका मोठा एकदंत राहीला नाही 

सुखी तुझ्या घरी तू , मी आनंद माझ्या घरचा 
वळाव्या वाटा मागे , असा स्पंद राहीला नाही   

गोकुळ नांदते घरी बाळकृष्णाच्या पायी 
देवकी यशोदेचा कुठेही आता नंद राहीला नाही 

भरून आलेलं आभाळ



तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच त्याने गाडी सुरु केली सुद्धा . रागाच्या भरात गेला असेलही …… पण तिचं न ऐकून घेता तो निघून गेला यायचं तिला दिवसभर वाईट वाटत होत . 

काहीतरी गहिवरून आलंय …… मन भरून आलंय म्हणून होता तो तिचा सकाळी सकाळी झालेला गडगडाट.  पण काळवंडून आलेल्या आभाळाकडे दुर्लक्ष करत ढगाच्या आवाजालाही कुणी जुमानत नाही याचं शल्य मनात घेऊन त्या पावसाने धो धो कोसळाव ……. अगदी तशीच रडतं राहिली ती दिवसभर ……. एकटीच 

संध्याकाळी तो घरी आला तर घराची अवस्था पाहवत न्हवती त्याला . एकही वस्तू आज जागेवर न्हवती गेली . कचराही नावापुरताच काढला असावा . कागदाचे कपटे खोलीच्या कोपऱ्यात रचलेले . वावटळ येवून गेल्यावर अंगणभर पालापाचोळा पसरतो ना …. तसा हा अवतार . 
गणपतीच्या मूर्तीसमोर तिचं लिहायला बसायचं नेहमीच ठिकाण . म्हणे ……. मन मोकळ करायला कुणी नाही मिळालं तर या गणपतीबाप्पाशी गप्पा मारत ती तिचं  मनाचं मळभ कागदावर उतरवते . त्या खोलीची खिडकीही उघडीच पडली होती . सायंकाळच्या वाऱ्याने तिच्या डायरीची पानं फडफड करत होती . 

स्वयंपाक घरात जाऊन पाहिलं तर आज शेगडीही थंडच . काहीच शिजवलं न्हवत दिवसभर कदाचित तिने आज . उपाशी आहे का ती ? त्याच्या मनात पटकन काहीतरी डोकावून गेल्यासारख झाल . पण आहे कुठे ? गेली कुठे ती ? या वेळी अशी न सांगता कधीही नाही जात घराबाहेर . अजून चिडली असेल का ?  ऐकून घ्यायला हवं होत का मी सकाळी ? कमीत कमी विचारायला तरी हवं होत ……. का इतकी अस्वस्थ आहेस ? कशाचा त्रास होतोय तुला ?  २ मिनिट बोललं तिच्याशी की होते ती शांत लगेच .     

त्याने पटकन तिला फोन लावला पण तो गादीवरच वाजत होता . ती तिचा फोन घरीच विसरून गेली होती . विसरली की ठेवून गेली होती ? 

त्याच्या मनाची घालमेल वाढतच होती . रागाच्या भरात वाद घालणारी असली तरी त्याला ती हवी होती … आत्ता या क्षणी , त्याच्या जवळ …… कुठे शोधाव काहीच सुचेना …. आल्या पावली तो तसाच घराबाहेर पडला तिला शोधायला …

तळयाकाठच्या गणपतीचं मंदिर तिचं आवडीच ठिकाण . पण तिथेही न्हवती ती …… मंदिरात जाऊन बाप्पासमोर हात जोडायची हिम्मतही होईना त्याची . फक्त येता येता तिला मागून घेतलं बाप्पाकडे त्याने ……. पुन्हा एकदा 

पुन्हा एकदा म्हणजे …… ज्या दिवशी तो तिला लग्नासाठी विचारायला गेला तेव्हाही या मंदिरात येउन गेला होता …. ती हो म्हणावी म्हणून साकड घालायला …… आणि त्या गणपतीने इतका चांगला नवरा पदरात घातला म्हणून तो तिच्या आवडीचा झाला ……. त्याला म्हणायची नेहमी ती … तुझं ऐकतो मग माझाही ऐकतच असेल ना सगळ ? माझी बडबड ऐकायला याची मूर्ती पुरेशी आहे मला 

गणपतीच्या शिखराला पापण्यानीच नमस्कार करून तो धावत सुटला . पण कुठे धावायचं हेच कळेना …….  पण त्याचं मन सांगत होत इथेच असेल ती . एकट वाटलं की गणपती बाप्पाशीच वाद घालते वेड्यासारखा …. " कुणालाही हेवा वाटावा इतकं सुखं दिलंस मला पण मन मोकळ करायला अजून एखाद जवळच माणूस ठेवायला हवं होतंस "

मंदिरामागच्या तळ्याकडे त्याची पावलं वळली . कुणीच न्हवत तळ्याकाठी . सगळ काही शांत …… निश्चल . पण मग हा पाण्यावरचा तरंग कुठला ? वाराही वाहत न्हवता म्हणावा तितका . मग तरंग कसा उठला ? कुणालाही दिसणार नाही याची काळजी घेत ती तळ्याचा कोपऱ्याशी पाण्यात आपलाच चेहरा पाहत बसली होती . तिच्या गालावरून ओघळणाऱ्या थेम्बाने जलाशयावर उठवलेला हा तरंग 

एका क्षणासाठी त्याच्या मनात येउन गेल …… एवढा मोठा जलाशय , तिच्या एका थेम्बाने हलला आणि मला जाणवलं ही नाही ती दिवसभर रडतेय ? एकही तरंग माझ्या मनात नाही उठला ? का ? 

खरंच…. एकटी आहे ती ? मी असून नसल्यासारखा ……. घरातल्या गुलाबाला कधी कळी येते आणि फुल कधी होत याचं काहीच माहित नसत मला . आणि ती … कळीच फुल होइतोवर रोज फोटो घेत एक मस्त पोस्टर बनवलंय घरी . माझ्या झाडाचं पाहिलं फुलं …… 

तो तिच्या जवळ गेला …… शेजारी जाऊन बसला . काहीच नाही बोलली ती . गालावरच पाणी आणि डोळ्यात उतरलेला लालसरपणा लपवायचा एक  अयशस्वी प्रयत्न चालला होता तिचा . चटकन तळ्यातल्या थंड पाण्याचे हबके मारून घेतले तिने चेहऱ्यावर . चेहरा रडून भिजला होता हे लपवायला . त्याने रुमाल पुढे केला . आपल्या पदरानेच पुसून घेतला तिने चेहरा . 

जागेवरून उठली . "चल …… एकट आहे घर माझं केव्हापासून . गुलाबाचं फुलही कालच उमललय . भूक लागली असेल ना तुला . अजून काहीच नाही बनवलं आज . देवासमोर दिवाही लावायचा आहे . तुळस वाट पाहत असेल . उठतोस ना ?"

हातात हात घेत त्याने तिला बसायला सांगितलं . "२ मिनिट …… शांत वाटेल तुला "

एक औपचारिकता म्हणून हसली ती . "मी शांत होईन हिचं भीती वाटते मला ." आणि घराकडे निघून गेली . 

बाप्पाची आरती सुरु झाली वाटत . मंदिरातल्या घंटेचा आवाज साऱ्या परिसरात घुमत होता . त्याच्या शिखराकडे एक नजर टाकली त्याने . सगळ आभाळ रिकाम होत . एकही ढग नाही . गडगड आवाज नाही . वारा नाही . क्षितिजा पर्यंत फक्त शांतता . 

बाप्पाच्या प्रसादाच पंचामृत घेऊन जाणाऱ्या आजींनी विचारलं "लेका …. काय पाहतो आहेस इतका निरखून आभाळात ?"     

"ढग शोधतोय …… एखादा ओळखीचा "

"आला होता रे सकाळी भरून . पण कोसळला दिवसभर …. त्याची रिपरिप मी ऐकली.  आता रिकाम झालंय हे आभाळ . आता कोसळून गेल्यावर ढग शोधून काय उपयोग ? त्याच्या गडगडाटाला मोकळ भिजायला तुझा खांदा मिळाला असता तर लवकर शांत झालं असतं .……. जा घरी . पाउस काय …. आज कोसळला तसा पुन्हा कधीतरी येईल … गेलेला दिवस आणि तिचा एकटेपणा नाही परत यायचा "    

View Facebook Comments





तराजू मे तोलने का गजब उससे हो गया …….


कमरेची कळ आतापर्यंत खांद्याला पोहोचली होती . बस …… एकदा आईचा हात फिरवा पाठीवरून असं  राहून राहून वाटत होत. डोळे झोपेने किलकिले झालेच होते पण मिटायला तयार न्हवते . रात्रीचे ११ वाजले आणि या डोळ्यांचा असहकार …….


एक थेंब तिच्या गालावरून ओघळत शेजारी कुशीत निवांत झोपलेल्या तिच्या बालकृष्णाच्या गालावर पडला . आईच्या डोळ्यात दाटलेला पूर पाहून तो अजूनच बिलगून झोपला तिला . काय कळल त्या चिमुरड्याला कोण जाणे ? पण ती मात्र रात्रभर जागी ……. खिडकीच्या फटीतून आत येणाऱ्या रस्त्यावरच्या डांबाच्या प्रकाशझोताकडे पाहत


रात्रभर तिला तिचा बाबा आठवत होता . हो ……… ती तिच्या बाबाला ' ए बाबा ' अशीच हाक मारायची . शेजारची काकू नेहमी म्हणायची "बापाला एकेरी नावाने हाक मारायचे हे कसले संस्कार आहेत ??????" त्यावर तिचा बाबा छाती फुगवून सांगायचा "माझ्या मुलीचा मी पहिला मित्र . ती मला अहो बाबा म्हणून का बोलावेल ? माझी मैत्रीण आहे ती :)" आणि खरच त्याने ते नात आयुष्यभर जपलं 


तिच्या डोळ्यासमोरून बाबाची छबी काही केल्या हलेना . सगळे जुने दिवस झर झर डोळ्यासमोरून सरकत निघाले होते 


- रात्री ८ वाजता दमून घरी आला तरी तिला बागेत घेऊन जाणारा तिचा एव्हर ग्रीन बाबा 


- आईला सोबत म्हणून तिची कादंबरी वाचून होइतोवर रात्री उशिरापर्यंत काम करत बसणारा बाबा. का तर आईला कादंबरी वाचायला आवडते पण दिवसभर वेळ मिळत नाही . आणि एकांत आवडतो तिला यावेळी …… पण एकाकीपणा नाही :) म्हणून ही सोबत    


- मुलीच्या फीसाठी पैसे साठवताना नवीन बुटाची टाळाटाळ करणारा बाबा . आणि कारण काय तर नवीन बूट घातले की टाच  दुखते माझी . मी अभ्यंकर घालतो तेच ठीक आहे ( बरेच दिवस टिकत न ते )  


- बायकोचा मणका दुखतो पण तिचा दिवस दारात रांगोळी काढल्याशिवाय नाहीच सुरु होत , म्हणून ती उठायच्या आधी भल्या पाहते अंगण धुवून ठेवणारा बाबा .  


म्हणतात ना  ' घर दोघंचं असत , दोघांनी सावरायचं . एकाने विसकटल की दुसर्याने आवरायचं . ' पण तिच्या बाबाला हे ही माहित होत की घर नेहमी एकानेच आवरायचं असा नसतं :)


अशा कित्तीकती आठवणी आणि कित्तीतरी कारण बाबाची आठवण यायला .


त्या बाबाची लाडकी लेक तीच पाहिलं प्रेम आणि दुसर प्रेम तोलू पाहत होती . हो …… आयुष्यात ती ज्याचा पहिल्यांदा प्रेमात पडली असा पहिला वहिला पुरुष म्हणजे बाबा आणि दुसरा तिचा नवरा . दोघांना तिने तराजूच्या दोन बाजूना बसवलं होत . तोलू पाहत होती तिच्यासाठीच दोघांच प्रेम 


आणि तिचा हा वेडेपणा तिला झोपू देत न्हवता . बाबाचं पारड जड होत होतं नेहमी . तेच खाली जात होतं . डोळ्यातले विचार पाचोळ्यासारखे उडायला सुरु झाले होते. " माझा नवरा माझ्या बाबापेक्षा कमी प्रेम करतो का माझ्यावर ? तो त्याच्यासारखा का नाही ? " हे आणि असे अनेक …… 


पण तिला कोण समजावणार ……. 


बाप बाप असतो. मुलीच्या सुखासाठी तो तिच्या जन्मापासून झुकतच आलेला असतो .  तिच्या बालपणासाठी तो लहान होतो . तिच्या तारुण्यात तो तिचा मित्र होतो आणि लग्नानंतर तिच्या एका छबीसाठी आसुसलेला जीव . बापाचं पारडच काय ……. मुलीसाठी बाप नेहमीच झुकलेला असतो 


आणि नवरा …… बायकोच्या सुखासाठी ताठ कण्याने उभा राहतो तिच्या मागे . तिच्या सोबतीसाठी :)


म्हणून तिच्या तराजूत बापाचं पारड खाली आणि नवऱ्याच पारड वर जातं . 


आणि मी म्हणते ……. कोण सांगितलंय  तराजू हातात धरायला ? दोन्ही बाजूनी प्रेमाची उधळण तिच्यावरच होतेय ना ???? :) 


नांदा सौख्य भरे …… 


View Facebook Comments

वाटत … सगळ मागे टाकून


वेळच न्हवता जात आज दुपारी म्हणून सहजंच उघडला कप्पा
ते assignment papers , काळवंडलेला  खोडरबर , टोक तुटलेली पेन्सिल
गुण्या ……. एक टोक मोडलेला , तुटलेलं टोपण , शाईने भरलेलं कापड
ग्रंथालयाच पुस्तक , आयकार्डची लेस , बसची जुनी तिकीट
चुरगळून गेलेलं वेळापत्रक ,  कँटिनच बिल , पट्टी … अंक पुसट झालेली
झेरोक्सवाल्याचे द्यायचे राहून गेलेले २ रुपये  
हे आणि अस बररच काही …………
आणि या गर्दीतून बाहेर डोकावणारी  एक पक्की गाठ
तू बांधलेल्या फ्रेन्डशिप बॅंड ची ……….

बाहेर काढायचा माझा तो प्रयत्न , बऱ्याचश्या गोष्टीत अडकला होता तो धागा
पण का कोणास ठाऊक ……  मनगटावर येण्यासाठी शोधत होता जागा
कप्प्याच्या टोकाशी ठेवलेल्या कुंकवात बुडून एक टोक झाल होत लालबुंद
आपल्या दोघींच्या त्या गजऱ्याचा अजूनही येत होता त्याला गंध
पिनेच टोकही त्यातच अडकलं होत  आणि तू दिलेली अंगठी सुद्धा
ही  गाठ सुटणार नाही …… असाच म्हणायचा ना ग तुझा दादा ?

तुझ्या अक्षरात लिहिलेली आपली नावं , अजूनही तितकीच ठसठशीत
अन तुझ्या कपाळावरची चंद्रकोर , अजूनही त्यामागे तशीच
टिकली हरवली तर ही लावत जा म्हणत चिकटवली होतीस त्या मागे
मी आजही जुळवायला धडपडतेय , तुझे माझे हरवलेले धागे
खूप आठवण आली तुझी हे सगळ पाहून
बऱ्याचश्या गोष्टी आपल्या करायच्या गेलेत राहून

डोक्यावर चार तांदूळ टाकायलाही न्हवतीस तू हजर
तुझ्या पुढच्या वळणावरच आहे बघ माझ नवीन घर
बाळकृष्ण तरी माझा कुठे पाहीला आहेस तू अजून
मावशी …… म्हणायला शिकलाय तो आता गालातल्या गालात लाजून
तू दिलेली कुड्यांची जुडी लग्नाच्या पुजेदिवाशी होती घातली
सासूबाई म्हणाल्या …… बघा माझी गौराई कशी नटली  

वाटत …………
सगळ मागे टाकून एक दिवस तुझ्या घरी याव
पुन्हा एकदा मला तू तसंच मिठीत घ्यावं
गच्चीत तुझ्या पुन्हा एकदा कॉफी प्यायला बसू
येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकावर काहीतरी बोलून हसू
जमेल का ग आता आपल्याला 'ते' गाण म्हणायला  सुरात ?
इतक्या दिवसांनी दार ठोठवल्यावर घेशील ना मला पुन्हा घरात ?
:)




 

जबरदस्तीचा राम राम


त्याचही तिच्यावर प्रेम आहे , तिला उगीचच वाटायचं
आवडतो त्याला गजरा म्हणून , दरवेळी त्याच्या मनासारखं नटायचं
बायको असूनही प्रीयसीसारखी, ठरलेल्या वेळेआधीच नेहमी पोहोचायची ती भेटायला
lucky girl असल्याचं, लागलं होत पुन्हा पुन्हा  वाटायला
सगळ कसं भोवती तिच्या फुलून आलं होत
पण कशावरून सोनंच असेल चकाकणार प्रत्येक नात ?

" तू चीडशील या भीतीनेच रोज येतो मी तुला वेळेत भेटायला "
मोरपीस फिरावं चेहऱ्यावरून , तो इतका अलगद बोलून गेला
पुढच्या क्षणी संपला ही हा विषय त्याच्यासाठी
पण तिच्या डोळ्यात ओल्याचिंब झाल्या, आजवरच्या सगळ्या भेटी
नको इतक्या भावनांचा कल्लोळ तिच्या डोळ्यासमोर दाटला
आज  हातात धरलेला तिचा हातही भीतीपोटीच असावा , असाही संशय वाटला

आवडतो म्हणून त्याने आणलेला , न्हालेल्या केसांवर तो माळलेला गजरा
पहिल्यांदा मिठीत आल्यावर , दोघांच्याही खाली झुकलेल्या नजरा
तिच्या हिरव्यागार चुड्याच्या किणकिणाटाने,  भरलेलं त्याचं देवघर
त्याचा तो थरथरणारा हात, पहिल्यांदा कुंकू कोरताना तिच्या कपाळावर
कायकाय म्हणून त्याने यातलं केल असेल घाबरून ?
त्याला पाठमोरा बघूनही , उगीचच आज काळीज येतंय भरून

ओझं व्ह्यायचं तिला म्हणून पोटातल्या बाळाला त्याने हाताने दिलेला आधार
झोपमोड नको तिची म्हणून , कितीतरी वेळा आवाज न करता लोटलेलं दार
साध्या सर्दी खोकाल्यासाठीही तिच्या , त्याने ऑफिसला मारलेली दांडी
अंगातल स्वेटर काढून द्यायचा तो … कारण काय तर तिला वाजतेय जास्त थंडी
कायकाय म्हणून त्याने यातलं केलं असेलं घाबरून ?
खांद्यावर ओझं जाणवतंय आज , उगीचच इतकं प्रेम घेतलं करून

 स्वतःची हार स्वतः जवळच मान्य करताना , तिच्या पापण्या झाल्यात जड
चौकटीचाच हललाय दगड , पुढे कसा पेलायचा हा अख्खा गड ?
कित्तीतरी प्रश्न , न संपणारा काळोख , दाटलाय तिच्या डोळ्यात
या सगळ्याच्या भीतीने , आलेला हुंदकाही  अडकलाय गळ्यात
कायकाय म्हणून त्याने आजपर्यंत केलं असेलं घाबरून ?
मी आपल उगाचच कवटाळत बसलेय ,
हा तर जबरदस्तीचा राम राम आहे ……. आणि तो ही दुरून :)

View Facebook Comments



शब्द...... आणि पंख गळलेली परी



सगळी कडूनच दाटून आलंय आज , पावसाची रिपरिप ही झालीये सुरु 
कळतच नाहीये ' तिच्या ' गोष्टीची सुरुवात कशापासून करू ?
असाच होतास न रे कोसळत पावसा , जेव्हा घरातून ती बाहेर पडली 
चिंब भिजवण्याआधी तिच्या हुंदक्यांची तू द्रुष्ट का नाही काढली ?
अश्रूत भिजलेला तो अस्पष्ट आवाज , तेव्हा शेवटचा होता रडत
तिलातरी कुठे होत माहीत ……. 
तुटेल ही वीणेची तार ……  जर अजून ताणली रागाने छेडत 

ती आणि तिचा तो ……… 

' ती ' म्हणजे गडगडणार आभाळ आणि ' तो ' मंदिरातला घंटानाद 
ती म्हणजे अखंड बडबड आणि तो म्हणजे पोवाड्यालाही स्मितहास्याची दाद
ती म्हणजे झरा खळखळणारा, तो तिला शांत करणारा डोह 
तरीही …तोच होता तिचं जग आणि ती म्हणजे त्याच्यासाठी कुणीही प्रेमात पडाव असा मोह

संभाषण दोघांचं नेहमी एकेरीच व्ह्यायचं, ती जागाच द्यायची नाही त्याला बोलायला 
त्यानेही नाही थांबवलं कधी तिला , नेहमी जवळ मात्र असायचा हातात हात घालून चालायला 
त्याची कधीच तक्रार न्हवती , त्याला ती मनापासून आवडायची
स्वतः बरोबर त्याच्याही आवडीची गाणी ती न कंटाळता त्याच्यासाठी गायची  

सकाळपासूनच त्या दिवशी ती जरा होती अस्वस्थ वाटत 
रात्र होई तोवर … पाझरणार पाणी गेलं डोळ्यात साठत 
कादंबरीतल्या कथेप्रमाणे …  त्याला नेमका आजच घरी यायला उशीर झाला
रडून लालबुंद झालेल्या तिच्या डोळ्यांनी नको इतका त्रागा केला 

एकदा जवळ ओढून त्याने , आजही केलंच होत तिला शांत 
पावसातच शमवायला बाहेर पडली ती, तिचा वेड्यासारखा चाललेला आकांत 
बस… रागाच्या भरात फक्त तिला , त्याला बोलायचं न्हवत काही
तिला एकटीला थोडा वेळ द्यावा म्हणून आज तो ही सोबतीला बाहेर पडला नाही 

कडेनेच चालत होती ती 

भरदाव वेगाने एक गाडी तिच्या पायाजवळ येउन थांबली 
कंठातून बाहेर पडणारी किंकाळी आज तिच्यासाठी कायमची लांबली 
जीवावरच आवाजावर निभावलं …… इतकचं काय ते सुख 
त्याला सोडून आज एकटी बाहेर पडली , हीच काय ती तिची चूक 

गोड आवाजाच्या शब्दांची माळ , ओठांची सांगत सोडून गेली 
अन त्याला आवडणारी तिची ती अखंड बडबड …… त्याच्यासाठी कायमची बंद झाली 
…………………. 



काही असेल बोलायचं , तर आता ती फक्त त्याच्याकडे पाहून हसते 
त्याला कधीही नको असणारी शांतता , त्या दोघांच्या मध्ये येउन बसते 
दिवसभर म्हणे आता …… ती एकटीच असते बसून 
चिमण्यांशीच काय ते तिचे मूक संवाद सुरु असतात , सार शांतपणे सोसून 

 रंगांच्या जोडीने भिंतीवरचा कोरा कागद , तिचं मन कसतरी करून रिझवतोय  
अन तिचा तो आवाज बस एकदा ऐकायला मिळावा म्हणून , ' तो ' सगळ्या देवळांच्या पायऱ्या झिजवतोय 

घड्याळाच्या टिकटिक शिवाय , काहीच नाही ऐकू येत म्हणे तिच्या घरी 
तिच्या बोलण्याच्या प्रेमात पडलेले सगळे म्हणतात ……. 
वार छातीत घेऊन फिरणारी , पंख गळलेली हीच खरी परी